आशुतोष बापट vidyashriputra@gmail.com

गढवाल हिमालय म्हणजेच देवभूमी, भटक्यांचे नंदनवन. गंगोत्री, यमुनोत्री, बद्रीनाथ आणि केदारनाथ या ठिकाणची चारधाम यात्रा अक्षय्य तृतीयेला सुरू होते. त्याची सुरुवात हरिद्वार किंवा ऋषिकेश इथून केली जाते. आपण प्रवासी कंपनीसोबत जात असाल किंवा स्वत:च्या वाहनाने जात असाल तरी ठरावीक तयारी करावीच लागेल. ही चारही ठिकाणे १०००० फुटांपेक्षा अधिक उंच असल्याने विशेष काळजी घ्यावी लागते. जास्त उंचीवर भूक न लागणे, मळमळणे, डोके जड होणे असे प्रकार होतात. त्यासाठी भीमसेनी कापूर जवळ ठेवावा आणि सतत त्याचा वास घ्यावा. त्यामुळे त्रास कमी होतो. या ठिकाणांना जाताना सगळे घाटरस्ते आहेत. त्यामुळे गाडी लागू नये यासाठीच्या गोळ्या घेणे अनिवार्य ठरते, शिवाय सोबत काही प्लास्टिक पिशव्या ठेवाव्यात. गंगोत्री आणि बद्रिनाथपर्यंत गाडी रस्ता आहे, मात्र यमुनोत्री आणि केदारनाथला चालावे लागते किंवा घोडय़ावरून जावे लागते. त्यासाठी आजपासूनच रोज नियमित चालण्याचा सराव करणे गरजेचे आहे. औषधे आणि गोळ्या, चॉकलेट, टिश्यू पेपर, कोल्ड क्रीम या गोष्टी आपल्या जवळच्या पाउच किंवा पिशवीत ठेवाव्यात. उंचावर कॅमेऱ्याची बॅटरी मंद होते. त्यामुळे आणखी एक बॅटरी लोकरीच्या कापडात गुंडाळून ठेवावी. पोन्चू किंवा रेनकोटसाठी वेगळी पिशवी जवळ ठेवावी. टोपी आणि गॉगल अनिवार्य आहे. आपल्यासोबत कोरडय़ा चटण्या ठेवाव्यात. चवबदल होण्यासाठी उपयुक्त असतात. जास्तीचे कपडे कोरडय़ा पिशवीत घेऊन ठेवावेत, कारण कपडे ओले झाले तर वाळत नाहीत.