तंत्राचा मंत्र : उदयन पाठक वाहनांची गती तीन गोष्टींच्या संयोगातून निश्चित होते. इंजिनाची गती, निवडलेला गियर आणि चाकाचा व्यास ( (Wheel Diameter).). दुचाकीत सर्वसाधारणपणे पाच गियर असतात. पहिला गियर हा सामान्यत: स्थिर गाडीला गती देण्यासाठी, तीव्र चढावर किंवा उतारावरती वापरतात. नंतर गती आणि रस्त्याच्या समतलपणावर कोणता गियर वापरावा हे ठरते. साधारणपणे ० ते २० किमी प्रति तास गतीसाठी पहिला गियर, १५ ते ३० साठी दुसरा, २५ ते ३५ साठी तिसरा, ३० ते ४० चवथा आणि त्यानंतर पाचवा गियर वापरणं जास्त श्रेयस्कर. कमी गतीवर वरचा गियर जर वापरला तर इंजिनवर दबाव वाढून ते बंद पडते किंवा गाडी खडखड करत झटके देते. याउलट जर जास्त गती असताना खालचा गियर वापरला तर इंजिनाची गती वाढून इंधन जास्त लागते, तसेच इंजिनाचा आवाज आणि प्रदूषण वाढते. गियर बदलताना क्लच पूर्णपणे दाबून मगच गियर बदलावा. असे केल्याने गियरचा बदल सहजगत्या होतो. अन्यथा दोन गियरचे दात एकमेकांवर घासून खराब होण्याची शक्यता असते. तसेच क्लच, गियर आणि त्वरक (Accelerator) यांचे योग्य संतुलन साधले तर वाहन व्यवस्थित चालण्यास मदत होते. अनेकांना हे संतुलन साधणे कठीण जाते. कायनेटिक होंडा स्कूटरमध्ये स्वयंचलित गियर भारतात सर्वप्रथम आले. तांत्रिकदृष्टय़ा ते स्वयंचलित नसून दातांच्या गियरऐवजी त्यात व्हॅरिओ गियरचे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. मात्र क्लच दाबून गाडी चालवल्यास क्लचचे आयुष्यमान कमी होऊन तो बदलावा लागतो. त्यामुळे क्लचचा उपयोग फक्त गियर बदलताना आणि अपवादात्मक परिस्थितीत वाहन चालवताना करावा. त्याने वाहन सुस्थितीत राहते. लेखक : टाटा मोटर्सच्या पुणेस्थित अभियांत्रिकी संशोधन केंद्रात उपमहाव्यवस्थापक म्हणून कार्यरत आहेत.