नीलेश अडसूळ

कृषिप्रधान भारतात सध्या विज्ञान आणि तंत्रज्ञानाची झपाटय़ाने प्रगती होत आहे. एका बाजूला माणूस चंद्रावर पोहोचलेला असताना दुसऱ्या बाजूला जमिनीवरची आव्हाने अधिकाधिक गंभीर होत आहेत. यात सर्वात मोठा प्रश्न महाराष्ट्राला भेडसावतो आहे तो शेतीचा. पूर येऊ  दे नाही तर दुष्काळ पडू दे, पहिला फटका बसतो तो शेतीलाच. त्यामुळे स्वत:ची ओळख निर्माण करू पाहणाऱ्या, आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी होऊ पाहणाऱ्या तरुण वर्गापुढे करिअर म्हणून ‘शेती व्यवसाय’ हा पर्यायच उपलब्ध नसतो. डॉक्टरची मुलगी डॉक्टर होऊ  शकते, अभियंत्याचा मुलगा अभियंता  होऊ  शकतो, पण शेतकऱ्याची मुले शेतकरी होत नाहीत. कृषी क्षेत्रातल्या अशा अनिश्चित स्थितीत स्वत:ला निर्णयाअंती झोकून देणारी काही तरुण मंडळी आहेत. त्यांच्याविषयी..

Investment opportunities in FMCG
बदलत्या बाजाराचे लाभार्थी; ‘एफएमसीजी’मधील गुंतवणूक संधी
Kolhapur, MIM, Mahavikas Aghadi,
कोल्हापुरात ‘एमआयएम’कडे पाठिंबा मागितलेला नसल्याने स्वीकारण्याचा प्रश्नच येत नाही; महाविकास आघाडीच्या नेत्यांचे स्पष्टीकरण
Loksatta kutuhal Limitations of learning
कुतूहल: सखोल शिक्षणाच्या मर्यादा
Government Initiatives For Women's Safety
महिलांनो, तुमच्या सुरक्षेसाठी सरकारचे ‘हे’ उपक्रम ठरतात फायदेशीर; आपत्कालीन परिस्थितीत ही यादी जवळ ठेवाच!

कोल्हापूर, सांगली, सातारा भागांतील महापुरामुळे जर मुंबईसारख्या शहरांमध्ये दूध तुटवडा होऊ  शकतो, मग उद्या शेतकरीच नाहीसा झाला तर तमाम प्रगत आणि चकचकणाऱ्या शहरांवर उपासमारीची वेळ येईल. नेमके हेच सत्य तरुण मुलामुलींना बोचते आहे. आधुनिक शेती, सेंद्रिय शेती, सिंचनाच्या विविध पद्धती, शेतितज्ज्ञांचे सल्ले, परदेशी फळाफुलांची लागवड अशा विविध पद्धती वापरून शेती समृद्ध करता येते आणि सधनही होता येते, हे शेतीतली नवी पिढी दाखवून देत आहे. कृषी, वनस्पतिशास्त्र, बागकाम, फलोत्पादन या अभ्यासक्रमांचा विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे; यात अभियांत्रिकी, एमबीए आणि स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थीसुद्धा आहेत.

आज नोकऱ्यांअभावी बराच तरुण वर्ग शेतीकडे वळला आहे. हा तरुण वर्ग सुशिक्षित असून कौशल्याने समृद्ध आहे. त्यामुळे नोकरी करून काही हजार कमावण्यापेक्षा शेतीतून लाखोंचा नफा तरुण कमवत आहेत. शेतीसोबत आज रोपवाटिका व्यवसायातही तरुण मंडळी मोठय़ा प्रमाणात उतरत आहेत. तरुणांनी शेती करणे ही सध्या काळाची गरज आहे, असे मत कृषी अभ्यासक दीपक चव्हाण यांनी व्यक्त केले.

बाजाराचा अंदाज घेता आला पाहिजे

अभियांत्रिकी क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेतलेला रोशन केदार आज नाशिकमधील दिंडोरी तालुक्यात शेती करीत आहे. त्याच्या मते, शेतकऱ्यांनी पिकांचे उत्पादन घेण्याइतकेच त्यांच्या प्रक्रियेवर लक्ष द्यायला हवे. शेतकऱ्यांच्याच मालावर लोक श्रीमंत झाले आहेत. कारण बाजारात टोमॅटो दोन रुपये प्रति किलोने विकला जातो, तर टोमॅटो पावडर बाराशे रुपये प्रति किलोने विकली जाते. हीच तफावत प्रक्रियेद्वारे भरून काढता येते. याला ‘प्रोसेसिंग’ असे म्हणतात. याविषयी प्रशिक्षण देणारा ‘सितारा’ (ctara) हा उपक्रम ‘आयआयटी मुंबई’च्या वतीने राबविला जातो. यात आधुनिक तंत्रज्ञानाची जोड, शेतीमधून मिळणारा नफा, पिकांवरच्या प्रक्रिया याचा सखोल अभ्यास केला जातो. शेतीत रस असलेल्या अधिकाधिक तरुणांनी याची माहिती मिळवायला हवी. शेतकऱ्यांचे अंदाज आणि उत्पादनाचा कालावधी चुकल्याने आत्महत्येची वेळ येते; परंतु वेळेचे गणित आणि जे पीक घ्यायचे आहे त्याची माहिती परिपूर्ण असायला हवी. शेती व्यवसायाभिमुख करायची असेल तर बाजाराचा अंदाज घेतला पाहिजे.

मातीविषयी जिव्हाळा हवा

मुळात शेती करणारी व्यक्ती केवळ व्यवसायाच्या विचाराने शेती करू शकत नाही. त्यासाठी मातीविषयी प्रेम आणि जिव्हाळा हा असावाच लागतो. तितकीच महत्त्वाची असते कौशल्यांची आणि व्यावसायिक दृष्टिकोनाची सांगड. मुंबईची सृष्टी शिंदे इंटिरिअर डिझायनिंगचे शिक्षण घेतल्यानंतर शेतीकडे वळली आहे. प्रत्यक्ष शेतीसोबत तिने कृषिपर्यटनाचा पर्यायही स्वीकारला आहे. पंढरपूरजवळ असलेल्या तिच्या गावात तिने ‘सृष्टी कृषी पर्यटन केंद्र’ उभारले आहे. सुरुवातीला वर्षभर नोकरी केल्यानंतर सृष्टीने वडिलोपार्जित शेतीचा व्यवसाय स्वीकारला. आपल्याकडे जमीन आहे तर कसायला हवी, ती कल्पकतेने फुलवायला हवी या उद्देशाने सृष्टी मातीत उतरली. दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, वर्मी कंपोस्ट, बायोगॅस असे शेतीपूरक प्रकल्प उभे केले. गुरांना चारा आणि उपजीविकेएवढी रसद शेतात पिकायला हवी याची तरतूद केली. याशिवाय फळ-फुलझाडांची लागवड केली आहे.

शेतीत प्रयोग घडावेत

वनस्पतिशास्त्र विषयातून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणारी चित्रा म्हस्केसुद्धा वनस्पतिशास्त्राचे ज्ञान शेतीसाठी वापरत आहे. पारंपरिक शेतकऱ्यांनाही वनस्पतिशास्त्राचे ज्ञान मिळावे असे तिला वाटते. नैसर्गिक आपत्ती आणि आर्थिक गणितांमुळे शेती करणे हे आव्हानात्मक असले तरी विज्ञानाची जोड दिल्यास त्यावर मात करणे शक्य आहे. पण शेतीमध्ये वनस्पतिशास्त्राचे महत्त्व खूप आहे. शेतकऱ्यांना वनस्पतिशास्त्राचे मार्गदर्शन मिळाले, तर शेतीत नवीन प्रयोग घडतील. वाढती लोकसंख्या पाहता अन्नधान्याचा पुरवठा होणे गरजेचे आहे, असे ठाण्याची चित्रा सांगते.

कमी पाण्याची शेती

साताऱ्याचा शिवराज गलांडे मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर दापोली कृषी महाविद्यालयात शेतीविषयक शिक्षण घेत आहे. स्पर्धा परीक्षांचे ध्येय उराशी बाळगणाऱ्या शिवराजकडे अनेक पर्याय असतानाही त्याने शेती शिक्षणाचा पर्याय निवडला. साताऱ्यात एका भागात पूर आहे, तर दुसऱ्या भागात दुष्काळ. शिवराज दुष्काळी भागातला. त्यामुळे त्याला तिथल्या शेतीविषयक समस्यांची नेमकी जाण आहे. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या साह्य़ाने तो कमी पाण्याची शेती करीत आहे.