‘बायकोत काय नसतं ते अशा मैत्रीणीत असतं? यांसारख्या अनेक प्रश्नांची उत्तरं कशी द्यायची? मैत्रीण जी हवीशी वाटते ती बायकोऐवजी हवी असते हा समज चुकीचा आहे. तिला बायकोनं स्वीकारणं ही गरज असते तसं झालं नाही की होणाऱ्या यातना या फक्त मैत्रिणीलाच समजतात. बायकोला समजत नाही. समजुतदारपणाच्या बाबतीत संसारातल्या साथीदारापेक्षा मैत्रीतला जोडीदार वरचढ ठरला तर होणाऱ्या यातना कधीही न संपणाऱ्या असतात.’ ‘वपुर्झा’ वाचताना त्यात वपूंनी लिहिलेले प्रत्येक शब्द त्याला पटत होते आणि तितक्याच प्रकर्षानं ते त्याला बोचतही होते. ‘किती खरंय हे’ तो स्वत:शीच पुटपुटला, मध्येच हसला अन् त्यानं पुस्तक बंद करून बाजूला ठेवून दिलं.

आज ‘फ्रेंडशिप डे’ ना! त्याला प्रकर्षानं तिची आठवण आली. ‘पण, संसारात रमलेल्या माणसानं त्यातून ज्याच्या बायकोला नवऱ्याच्या जुन्या मैत्रिणी आवडतच नाही अशा माणसानं मैत्रिणीची आठवण काढणं म्हणजे महापाप’ तो स्वत:ला समजावत होता. आता कसला आलाय ‘फ्रेंडशिप डे’ वगैरे. कॉलेजमध्ये होतं तोपर्यंत ठिक होतं, आता अंगभर bff, love you, friendship day असं काय बाई लिहणाऱ्या मुलं-मुलींकडे पाहून त्याला किव यायची. काय थिल्लरपणा आहे असं तोच म्हणायचा. पण, स्वत: मात्र कोणी ऐके काळी हाच ‘थिल्लरपणा’ केला हे मात्र त्याला कळायचं नाही.

लग्न होऊन वर्ष उलटलं होतं. मैत्री तुटूनही काही महिने लोटले होते. ‘ए तूला आठवतंय का रे ते पंधराएक वर्षांपूर्वीचे दिवस?’ त्यानं मनात स्वत:लाच प्रश्न विचारला. तिच्याघरी ‘फ्रेंडशिप डे’ची पार्टी करायची ठरली होती. म्हणजे सगळ्यांनी शनिवारी शाळेतून निघताना तसंच ठरवलं होतं. रविवारी सकाळी दहा वाजता तिच्या घरी सगळ्यांनी भेटायचं होतं. पण शनिवारी रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत होता. अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. रविवारी उजाडल्यावर तिच परिस्थिती होती. तेव्हा काय व्हॉट्स अॅप वगैरे नव्हते किंबहुना मोबाईल फोन ही देखील केवळ एक चैन होती. तिच्या घराचा लँडलाईन बंद होता. त्यामुळे फोन करण्याचा प्रश्नच येत नव्हता.
‘बाकीचे तिच्या आजूबाजूला राहतात म्हटल्यावर ते जातील आणि आपणच गेलो नाही तर तिला वाईट वाटेन ना.’ शेवटी भर पावसात त्यानं तिच्या घरी जायचा निर्णय घेतला. पाऊस अजूनही कोसळत होता, आईनं तर बजावलं होतं नको जाऊ पण तो ऐकतोय थोडीच. आदल्या दिवशी सगळ्यांना पुरेल एवढी पाच मीटर रिबिन त्यानं घेतली होती. चांगले दहा रुपये त्यानं एका मीटरसाठी मोजले होते. त्याला खात्री होती अशी सुंदर रिबिन कोणीच घेतली नसणार. आदल्या दिवशी साधारण अंदाज घेऊन त्यानं ती रिबिन कापून ठेवली. शेजारच्या दिगू कडून त्यानं रिबिनीच्या तुकड्यावर स्वत:चं सुंदर नाव लिहून घेतलं होतं . त्यानं त्या रिबिनी प्लास्टिकच्या पिशवीत गुंडाळून खिशात ठेवल्या.

‘अगं आई इथून ईस्टला तर जायचंय. दहा मिनिटांत पोहोचेन. तिच्याघरी ब्रेकफास्ट करायचं ठरलं आहे. ‘ एवढं सांगून तो निघाला. धो- धो पाऊस त्यातून वारा, रस्त्यावर एक चिटपाखरूही नाही. तिच्या घरच्या रस्त्यावर गुडघाभर पाणी साचलं पण तो वाट काढत पोहोचला. एव्हाना तो भिजून चिंब झाला. अखेर तिच्या घरी तो पोहोचलाच. सगळे आले असतील असं त्याला वाटलं मात्र कोणीही आलं नव्हतं. प्लान कॅन्सल झाला होता. ती हॉलमध्ये एका कोपऱ्यात प्रमेय सोडवत बसली होती. दरवाज्यात त्याला भिजलेला पाहून तिला आश्चर्य वाटलं

‘oh god i won’t belive that you are here’ ती म्हणाली. धावत दरवाज्यात आली. ‘अरे प्लान कॅन्सल झाला. एवढा पाऊस पडतोय तू का आलास वेड्या? बघ भिजलास ना!’
‘अगं त्यात काय, ठरलं होतं ना फ्रेंडशिप डे साजरा करायचा, मग?आणि तसेही सगळे हाकेच्या अंतरावर राहतात मला वाटलं येतील सगळे. म्हणून मी पण आलो.’
‘unfortunately तू सोडून कोणीही आलं नाही. पण तू आलास बरं वाटलं.’ तेवढ्यात तिचे आई बाबाही आले.
बाबा गंमतीनं म्हणाले ‘बघ हा तूझा खरा मित्र, याची मैत्री कधीही तोडू नको, पावसातही आलाय तुझ्यासाठी’ सगळेच हसले.
त्यानं तिच्यासह आई-बाबा आणि तिच्या भावालाही फ्रेंडशिप बँड बांधून टाकला. जून्या आठवणी मनात तरंगू लागल्या चेहरा उजळून गेला.
एवढ्यात चहाचा कप घेऊन बायको आली. ‘काय रे तूझं पुन्हा सुरू झालं. सकाळी सकाळी पुस्तक वाचत बसलाय? एखाद्या रविवारी बायकोला मदत केली म्हणून काही बिघडत नाही’ तिचा टोमणा त्याला कळला. तो फक्त हसला.
‘सांग पाहू काय मदत हवीय. तुला मदत न करून कसं चालेल’
‘तसं नाही रे मी मस्करी केली, आज फ्रेंडशिप डे आहे ना आम्ही सगळ्या मैत्रिणींनी भेटायचं ठरवलं आहे. मला लवकर आवरून निघायचं आहे.’
‘अच्छा’ तो किचनमध्ये वळला.
ती मागोमाग आली. ‘तूझा नाही का फ्रेंडशिप डे ? तूझ्या सो कॉल्ड फ्रेंड्सनं विश नाही केलं वाटतं तुला.’
पुढे ती काय बोलणार याचा अंदाज त्याला आलाच होता.
‘नाही सगळे बिझी आहेत आणि फ्रेंडशिप डे वगैरे साजरे करायला आपण काय कॉलेजमध्ये आहोत का? मोठे झालो आपण. ‘ तो बोलून गेला.
‘हो का बरं.. मित्र बिझी असतील मात्र तुझ्या जिवश्चकंठश्च मैत्रिणीनं तर नक्कीच मेसेज केला असेल.’ तिचा हा टोमणा आता मात्र त्याला खूपच लागला. बायकोशी वाद घालण्याची त्याची मुळीच इच्छा नव्हती.

‘अगं तूच म्हणालीस ना तिला मेसेज करू नकोस. एवढी निर्लज्ज माझी मैत्रीण नक्कीच नाही त्यामुळे मनात असूनही ती मेसेज करायची नाही.’ पटकन त्याच्या मनात आलं पण ओठांवर ते आलं नाही. रागावर आवर घालणंही कठीण होतं पण त्यानं कसंबसं आवरलं.
‘नि:स्वार्थी मैत्रीण मित्राचा संसार उधळला जावा पण, आपली मैत्री टिकावी अशी कधीच अपेक्षा करत नाही, पण ही धडपडही बायकोपर्यंत पोहोचत नाही. मैत्रीण मित्राच्या पत्नीची मर्जी आणि प्रतिष्ठा सांभाळते पण तो समंजसपणा बायको दाखवत नाही.’ वपूंची आणखी एक ओळ त्याला आणखी पटली.
खरंच मुलगा मुलीचा फक्त चांगला मित्र का नाही होऊ शकत? त्यांच्या मैत्रीपुढे ‘पण’, किंतु, परंतु येणं खरंच गरजेचं आहे का? असे झरझर अनेक प्रश्न त्याच्या समोर येऊ लागले. ह्याचं प्रेमप्रकरण वगैरे नाही आहे ना?, ती आणि तो एकत्र असताना किती जण विचारायचे. खरंच अगदी प्रेमालाही हेवा वाटावा इतकी घट्ट मैत्री दोघांत होती. प्रेम मरेल मात्र मैत्री कधी मरत नसते दोघंही अभिमानानं सांगायचे. मुलगा आणि मुलगी यात निख्खळ मैत्री कधीच होऊ शकत नाही कधीतरी मैत्रीचं रुपांतर प्रेमात होतं अन् मैत्रीतला जोडीदार मात्र कायमचा दूर निघून जातो असं दोघांनाही वाटायचं. म्हणूनच या दोघांनी अगदी ठरवून प्रेमात न पडण्याचं ठरवलं होतं.
त्यानं लग्न केलं, तिचं अजूनही लग्न व्हायचं आहे. लग्नानंतरही अनेक महिने मैत्री कायम होती. अगदी पहिल्यासारख्याच छोट्या मोठ्या गोष्टी दोघंही नित्यानं शेअर करत होते, बोलत होते, भेटत होते. आयुष्याच्या जोडीदारापेक्षा मैत्रीतलाच जोडीदार अनेकदा वरचढ ठरत होता, किंबहुना तो तसं मानत होता. पण, नवरा आपलं सोडून मैत्रीणीचं ऐकतोय हे कोणत्या बायकोला पटेल हो. सुरूवातीला तिनंही समजुतदारपणा दाखवला, मात्र तिचं मन समजून घ्यायला त्याच्याजवळ वेळही नव्हता अन् ती दृष्टीही.

तिला दोघांच्या मैत्रीविषयी तक्रार मुळीच नव्हती कारण, तिही एका मुलाची चांगली मैत्रीण होती. त्यामुळे गैरसमजावरून कोणाचीही मैत्री तोडू नये तिलाही समजत होतं. पण खरी मेख पुढे सुरू झाली.
मुलाची मैत्रीण एकवेळ हे नातं समजून घेता येईल मात्र मुलीचा मित्र हे नातं समजून घेणं तसं अवघड. जो समजूतदारपणा इतके दिवस बायको दाखवत होती, तो नवऱ्याला दाखवणं आता अवघड होऊ लागलं. बायकोनं आपल्या मैत्रीणीला स्वीकारावं अशी ‘माफक’ अपेक्षा त्याची होती. मात्र आपण तिच्या मित्राला स्वीकारावं इतकं विशाल हृदय त्याचं नक्कीच नव्हतं. बायकोची मैत्री अन् तिचा मित्रही त्याला खटकू लागला. अखेर नवऱ्याच्या मनाचा विचार करत नकळत आपल्या मैत्रीला तिनं तिलांजली दिली.

आता वेळ त्याची होती. पण मन मात्र मानत नव्हतं. शाळेपासूनच्या मैत्रीणीला असं सोडणं त्याला जमत नव्हतं. पण, बायकोचा मित्र स्वीकारण्याइतका मनाचा मोठेपणा आपण दाखवू शकत नाही मग आपली मैत्री ती का म्हणून स्वीकारेल? हे कळत होतं पण, वळत मात्र बिलकुल नव्हतं. नवरा काही मैत्रीण सोडत नाही म्हटल्यावर मग तिनेच थेट मेसेज केला, तुमची मैत्री संपली माझ्या नवऱ्याला काही यापुढे मेसेज करू नकोस.

ती बिचारी ठरली स्वाभिमानी, आपल्या मैत्रीमुळे नवऱ्या बायकोच्या नात्यात फुट पडते म्हटलावर तिच दूर गेली. आपण बायकोचा मित्र तिची मैत्री स्वीकारु शकत नाही मग तिच्याकडून अपेक्षा ठेवणं किती चूक आहे त्याचं त्यालाच कळलं. मात्र या असमंजसपणामुळे आपण आयुष्यातलं खूप सुंदर असं मैत्रीचं नातं कायमचं गमावलं याचं दु:ख मात्र त्याला कायम बोचत राहिलं.

आयुष्यातल्या सुंदर मैत्रिणीला पुन्हा आठवून तो स्वत:शीच पुटपुटला मी तुझा चांगला मित्र होऊ शकतो पण…
पण,… नकळत एक विचार चमकून गेला अन् त्यानं वाक्य अर्धवट सोडलं, कारण आता मैत्रीच्या नात्यात पण आला होता.

प्रतीक्षा चौकेकर

pratiksha.choukekar@loksatta.com