What Happens When You Don’t Eat Non Veg One Month: वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या मते, गेल्या काही वर्षांत विशेषतः युनायटेड स्टेट्स आणि युरोपमध्ये अनेकजण शाकाहार निवडत आहेत. उजाला सिग्नस ग्रुप ऑफ हॉस्पिटल्सच्या एमएससी (डाएटीशियन), डॉ एकता सिंघवाल यांनी सांगितले की, अनेक मांसाहारी लोक शाकाहारी किंवा Veganism कडे वळण्याची अनेक कारणे आहेत, ज्यात नैतिक आणि पर्यावरणीय समस्यांपासून आरोग्याच्या फायद्यांपर्यंत आणि वनस्पती-आधारित पर्यायांची वाढीव उपलब्धता या सगळ्यांचा समावेश आहे. भारतातही श्रावणाच्या निमित्ताने का होईना अनेक मांसाहारी तब्बल महिनाभर मांस- मच्छी वर्ज्य करतात. पण असं केल्याने तुमच्या शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे तुम्हाला माहित आहे का? एक महिना मांसाहार बंद करण्याचे फायदे, तोटे व एकूणच प्रभाव याविषयी आज आपण तज्ज्ञांकडून जाणून घेऊया…
डॉ. अथर पाशा, वरिष्ठ सल्लागार, केअर हॉस्पिटल्स, यांनी एक महिना मांसाहार बंद करण्याचे फायदे सांगताना म्हटले की, “यामुळे, जुनाट आजारांचा धोका कमी होतो तसेच शाकाहारातून शरीराला आवश्यक पोषक सत्व प्राप्त होतात, आणि अर्थातच, पर्यावरणीय स्थिरत्यासाठी हा सर्वोत्तम निर्णय ठरू शकतो.”
तर सिंघवाल सांगतात की, “वनस्पती-आधारित आहार सामान्यतः हृदयविकार, उच्च रक्तदाब, टाइप 2 मधुमेह आणि विशिष्ट प्रकारचे कर्करोग यांसारख्या दीर्घकालीन स्थितींचा धोका करण्यास मदत करतो”. तर पाशा सांगतात की, “तुमच्या आहारात विविध वनस्पती-आधारित पदार्थांचा समावेश करून, तुम्ही प्राण्यांवर अवलंबून न राहता तुमच्या पौष्टिक गरजा पूर्ण करू शकता.”
एक महिना मांसाहार बंद केल्यास होणारे फायदे
सुधारित पचन व नियंत्रित वजन
पाशा यांच्या म्हणण्यानुसार, वनस्पती-आधारित आहारामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनप्रक्रिया वेगवान करू शकते आणि यामुळे बद्धकोष्ठता दूर होऊ शकते. याशिवाय शाकाहारामुळे वजनावर सुद्धा नियंत्रण मिळवता येऊ शकते. वनस्पती आधारित डाएटमध्ये मुख्यतः कमी कॅलरीज असल्याने पोटभर जेवूनही तुम्हाला कॅलरीची चिंता करण्याची गरज रहात नाही.
जळजळीवर उपाय
सिंघवाल सांगतात की, शाकाहारी व त्यातही वनस्पती आधारित आहार हे पचनास तुलनेने हलके असल्याने यामुळे पोटात किंवा पचनमार्गात जळजळ होण्याचे प्रमाण कमी होते.
कोलेस्टेरॉलवर नियंत्रण
प्राणी-आधारित अन्न, विशेषत: ज्यामध्ये सॅच्युरेटड आणि ट्रान्स फॅट्सचे प्रमाण जास्त आहे, ते आहारातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण प्रचंड वाढवते. हाच मांसाहार वगळल्यास, रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी सुधारू शकते, ज्यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो
अँटिऑक्सिडेंटचे लाभ
अँटिऑक्सिडंटने समृद्ध, वनस्पती-आधारित आहार शरीराला ऑक्सिडेटिव्ह तणाव आणि सेल्युलर नुकसानापासून संरक्षण करण्यास मदत करू शकतो. फळे, भाज्या, शेंगदाणे आणि बियांचे सेवन शरीरातील अँटिऑक्सिडंट प्रमाण वाढवू शकते, ज्यामुळे संपूर्ण आरोग्याला फायदा होतो आणि जुनाट आजारांचा धोका कमी होतो.
ऊर्जा पातळीत बदल
पाशा यांच्या मते, वनस्पती-आधारित आहार शरीराला जीवनसत्त्वे, खनिजे आणि कार्बोहायड्रेट्सचा मुबलक पुरवठा करतात. यामुळे दिवसभर तुमची ऊर्जा टिकून राहण्यास मदत होऊ शकते.
मांसाहाराचा तोटा काय?
सिंघवाल सांगतात की, “मांसाहारी अन्न, विशेषत: प्रक्रिया केलेले आणि लाल मांस हे कर्करोगासह काही आजारांची जोखम वाढवतात.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) प्रक्रिया केलेले मांस, जसे की खारवून वाळवलेले डुकराचे मांस, सॉसेज आणि डेली मीट हे कार्सिनोजेन्स म्हणून वर्गीकृत केले आहे. हा मांसाहार कोलोरेक्टल कर्करोगाचा धोका वाढवू शकतो. तसेच गोमांस, डुकराचे मांस यासारखे लाल मांस देखील कोलोरेक्टल, स्वादुपिंड आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका वाढवतात.
हे ही वाचा<< रात्री झोपताना बेंबीत तुपाचे काही थेंब घालण्याचे ६ आश्चर्यकारक फायदे; स्त्री- पुरुष दोघांनाही कामी येईल
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की सर्व मांसाहारी पदार्थतुमच्यासाठी चुकीचेच किंवा नुकसानदायकच आहेत असे नाही. कारण चिकन अंडी यांसारखाय पदार्थांच्या सेवनातून मोठ्या प्रमाणात प्रोटीन मिळत असते. तसेच माशाचे सेवन हे डोळ्यांच्या आरोग्यास उत्तम असल्याचे सांगितले जाते. पण हे सगळं काही प्रमाणात केल्यासच तुम्हाला लाभ मिळू शकतो. मांसाहाराचा अतिरेक वरील फायद्यांना नुकसानात बदलू शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे. यास वैद्यकीय सल्ला समजू नये)