भूमध्यसागरी आहारामुळे ज्या रुग्णात मूत्रपिंड प्रत्यारोपण झाले आहे, त्यांना फायदा होऊ शकतो असे एका अभ्यासात दिसून आले आहे. भूमध्यसागरी आहारात जास्त प्रमाणात भाज्या, ऑलिव्ह तेल, प्रथिनांचा मध्यम प्रमाणात वापर या गोष्टींचा समावेश होतो. या आहारामुळे प्रत्यारोपण केलेली मूत्रपिंडे व्यवस्थित काम करतात. याबाबतचे संशोधन क्लिनिकल जर्नल ऑफ द अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून त्यात असे दिसून आले की, मूत्रपिंड प्रत्यारोपणानंतरच्या दहा वर्षांनी एक तृतीयांश रुग्णात मूत्रपिंडे काम करेनाशी झाली. नेदरलँडसमधील युनिव्हर्सिटी ऑफ ग्रॉनिंगगेनच्या संशोधकांनी मूत्रपिंड प्रत्यारोपण झालेल्या ६३२ रुग्णांची माहिती घेतली, त्यात त्यांना आहाराविषयी प्रश्न विचारण्यात आले होते. काहींनी भूमध्यसागरी आहार सेवनाचे पालन केले होते. ज्या रुग्णांनी भूमध्यसागरी आहार घेतला, त्यांच्यात मूत्रपिंड प्रत्यारोपण जास्त यशस्वी झालेले दिसून आले. भूमध्यसागरी आहारात मासे, फळे, भाज्या, डाळी, दाणे, बदाम, ऑलिव्ह तेल यांचा समावेश होतो. तसेच मांस व दुग्धजन्य पदार्थ कमी प्रमाणात घेतले जातात. ५.२ वर्षांच्या कालावधीत ११९ रुग्णांच्या बाबतीत मूत्रपिंड निकामी होण्याचे प्रमाण कमी होते. भूमध्य सागरी आहार सेवनात ज्यांना नऊ गुण होते त्यांची मूत्रपिंडे जास्त चांगली राहिली, ज्यांना दोन गुण होते त्यांच्यातही मूत्रपिंड निकामी होण्याची शक्यता ३० टक्के कमी झाली. भूमध्य सागरी आहार हा हृदयरोग व मूत्रपिंड विकारात उपयोगी असतो. अँतोनियो गोम्स यांनी सांगितले, की भूमध्यसागरी आहाराचे चांगले परिणाम असतात त्यावर आणखी एकदा शिक्कामोर्तब झाले आहे. असे असले तरी आहाराच्या मदतीने मूत्रपिंड प्रत्यारोपणास पूरक आहार ठरवताना आहारतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक ठरते.