चालणं हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे असं म्हटलं जातं. मात्र बऱ्याच वेळा सतत चालल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीची चप्पल घातल्यामुळे टाचदुखी किंवा तळवेदुखीची समस्या निर्माण होते. इतकंच नाही तर काहींची ही समस्या वाढत जाते. परिणामी, टाचदुखीपासून सुरु झालेली समस्या गुडघेदुखीपर्यंत येऊन पोहोचते. अनेक विविध उपाय किंवा डॉक्टर्स केल्यानंतरही ही समस्या पाठ सोडत नाही. अशावेळी काही सहजसोपे घरगुती उपाय केल्यास नक्कीच आराम मिळू शकतो. चला तर पाहुयात टाचदुखीवर काही सोपे घरगुती उपाय.
१. टाच दुखत असल्यास कोमट पाण्यात खडेमीठ टाकवे. या पाण्यात १५ ते २० मिनीटे पाय टाकून बसावे. त्यामुळे पायांना शेक मिळतो आणि टाचदुखी काही प्रमाणात कमी होते.
२. घरच्या घरी करता येतील अशी सोपी आसाने किंवा व्यायाम करावेत. उदा. भिंतीला हात टेकवून पायाच्या बोटांवर उभं राहावं आणि टाचा वर उचलाव्यात. या अशा स्थितीमध्ये जागच्या जागी जॉगिंग करायचा प्रयत्न करावा.
३. टाचदुखी हा वाताचा एक प्रकार आहे. त्यामुळे अनेक वेळा हिवाळा किंवा पावसाळा या ऋतूंमध्ये टाचदुखीची समस्या मोठ्या प्रमाणावर जाणवते. त्यामुळे घरामध्ये असताना कायम मऊ चपल किंवा स्लीपरचा वापर करावा.
४. विटेचा एक तुकडा थोडासा गरम करुन त्यावर रुईचे पान बांधावे आणि त्याचा शेक टाच दुखत असलेल्या भागावर द्यावा.
५. गोडेतेल आणि मीठ एकत्र करुन हा लेप टाचेवर लावाला आणि टाच सुती कापडाने बांधून ठेवावी.