गर्भावस्थेत महिलांना जर जीवनसत्त्व ‘अ’ पुरेशा प्रमाणात मिळाले नाही तर जन्माला येणाऱ्या मुलांना नंतरच्या आयुष्यात अल्झायमर आजार (स्मृतिभ्रंश) होण्याचा धोका अधिक असल्याचा इशारा एका नव्या अभ्यासात देण्यात आला आहे. शास्त्रज्ञांना गर्भात आणि बाळाचा जन्म झाल्यानंतर याबाबतची काही लक्षणे आढळून आली आहेत. जनुकीय पातळीवर उंदरावर केलेल्या अभ्यासात, नवजात अर्भकाला जीवनसत्त्व ‘अ’चा पुरेसा पुरवठा न झाल्याने त्याच्यामध्ये मेंदूशी संबंधित आजाराची लक्षणे संशोधकांना दिसून आली. गर्भावस्थेत जर जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता झाली तर त्याचा परिणाम मेंदूच्या विकासावर होतो. तसेच नंतरच्या आयुष्यात स्मृतिभ्रंशासारख्या आजाराला सामोरे जावे लागत असल्याचे आमच्या अभ्यासात स्पष्ट दिसून आले, असे कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठातील प्राध्यापक व्हिऑन्ग साँग यांनी म्हटले आहे. जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता आणि त्याचा मानसिक आरोग्यावर होणारा परिणाम यांचा परस्पराशी संबंध असल्याचे संशोधकांनी यापूर्वी अभ्यासात स्पष्ट केले आहे. जीनवसत्त्व ‘अ’ च्या कमतरतेमुळे अमॉलाइड बिटाचे उत्पादन वाढते. त्याचा स्मृतिभ्रंशावर परिणाम होतो. जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे शिक्षण आणि स्मृती यावरही परिणाम होत असल्याचे संशोधकांना यामध्ये दिसून आले. ३३० वृद्ध लोकांचे परीक्षण केल्यावर ७५ टक्के जणांमध्ये कमीअधिक प्रमाणात जीवनसत्त्व ‘अ’ची कमतरता असल्याचे दिसून आले. हे संशोधन अॅक्टा न्यूरोपॅथोलॉजिका नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.