What Foods Should Not Be Reheated : अनेकदा भूक नसेल म्हणून किंवा अगदी मित्र-मैत्रिणींना भेटायचा प्लॅन झाला की आपण काहीतरी खाऊन मगच घरी येतो. मग घरी आल्यावर पुन्हा जेवणाची इच्छा होत नाही, त्यामुळे वारंवार उरलेले अन्न फेकून देण्याऐवजी आपण दुसऱ्या दिवशी ते पुन्हा गरम करून खातो. पण, तुम्हाला माहिती आहे का की, काही पदार्थ पुन्हा गरम केल्याने ते विषारीसुद्धा बनू शकतात? त्या निवडक पदार्थांमध्ये असलेला पोषक घटक नष्ट होण्याव्यतिरिक्त, वारंवार गरम केल्याने कधीकधी कर्करोगासारखे आजार विकसित होऊ शकतात, त्यामुळे कोणते पदार्थ गरम करावे आणि कोणते पदार्थ गरम करू नये, याबद्दल माहीत असणेसुद्धा आवश्यक आहे.
चहा
चहा पुन्हा पुन्हा गरम करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक असू शकते. त्यात असलेले टॅनिन आणि फ्लेव्होनॉइड्स पुन्हा गरम केल्यावर आणखीन वाढतात, ज्यामुळे पोटात गॅस, आम्लता आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. वारंवार चहा गरम केल्याने चहाची चवदेखील कडू आणि तुरट होते, त्यामुळे शरीरात विषारी घटकदेखील वाढू शकतात.
पालक, बीट आणि मसूर
पालक, बीट आणि इतर नायट्रेटयुक्त भाज्या कधीही पुन्हा गरम करू नयेत. असे केल्याने त्यामध्ये असलेले नायट्रेटचे, नायट्रोसामाइन्समध्ये रूपांतर होते, जे कर्करोगजन्य मानले जातात; त्यामुळे या भाज्या सहसा ताज्या खायला द्याव्यात, विशेषतः लहान मुले आणि वृद्धांना.
भात
जर शिजवलेला भात खोलीच्या तापमानावर बराच वेळ ठेवला आणि नंतर पुन्हा गरम केला तर त्यात बॅसिलस सेरियस नावाचा धोकादायक जीवाणू वाढू शकतो. यामुळे अन्नातून विषबाधा, उलट्या आणि जुलाब होऊ शकतात, म्हणून उरलेला भात ताबडतोब फ्रिजमध्ये ठेवा आणि मर्यादित वेळेत खा.
पनीर
पनीर पुन्हा गरम केल्याने त्याचा पोतच खराब होतो असे नाही तर त्यात असलेले प्रथिनेदेखील हानिकारक स्वरूपात बदलू शकतात; यामुळे पचनाच्या समस्या आणि पोटात जळजळ होऊ शकते, त्यामुळे पनीरची भाजी असो किंवा त्याच्यापासून बनवलेला एखादा पदार्थ, तो नेहमी ताजा असतानाच खावा.
ब्रेड
जर ब्रेड वारंवार गरम केला तर त्यातील स्टार्च विषारी संयुगांमध्ये बदलू शकतो. मायक्रोवेव्हमध्ये किंवा तव्यावर गरम केलेल्या ब्रेडमुळे शरीराला कोणतेही पोषण मिळत नाही; उलट त्यामुळे अपचन, छातीत जळजळ आणि गॅसची समस्या वाढू शकते.
त्यामुळे निरोगी जीवनशैली टिकवून ठेवण्यासाठी खाण्याच्या सवयी आणि आपण घेत असलेले अन्न या दोन्ही गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. अन्न वारंवार गरम करणे ही एक सामान्य पद्धत असली तरीही त्यातील थोडासा निष्काळजीपणा दाखवल्यास तुम्हाला गंभीर आरोग्य समस्या होऊ शकतात, त्यामुळे शक्य तितके अन्न खा आणि उरलेले अन्न जास्त काळ साठवून ठेवू नका.