वैद्य विक्रांत जाधव मधुमेह आटोक्यात ठेवण्यासाठी काही पथ्यांबाबत गेल्या लेखामध्ये माहिती घेतली. आणखी काही पथ्यांबाबत. मधुमेह व आवळा मधुमेहामध्ये आवळ्याला उच्च स्थान दिले असून आवळा सेवन अत्यंत गुणकारी ठरते. सकाळी उपाशीपोटी आवळाचूर्ण व हळदचूर्ण समभाग घ्यावा, तसेच आवळ्याचा रस व ओल्या हळदीचा रसदेखील सकाळी घेण्यास हरकत नाही. आवळ्याचे थंडीतील सेवन हे शरीराच्या विविध अवयवांची झीज भरून काढणारे आहे. हिरडा, बेहडा, आवळा, देवदारू, नागरमोथा यांचे समप्रमाण मिश्रण घेऊन त्याचा विधी प्रकाराने काढा तयार करावा. हा काढा मधुमेहींचे वजन कमी करण्यासही उपयुक्त ठरतो, असा अनुभव असला तरी वैद्यकीय सल्ल्याशिवाय हा प्रयोग निषिद्ध ठरतो. या काढय़ाप्रमाणेच हिरडा, बेहडा, आवळा, देवदारू, दारूहरिद्रा व नागरमोथा यांचे एकत्रित चूर्ण करून केलेल्या काढय़ाचे सेवन केल्याने मधुमेही रुग्णांची प्रतिकारक्षमता वाढते. कडूनिंबरस, शतावरीरस, प्रात:काळीच्या धारोष्ण दुधाचे सेवन असे इतर अवस्थानुरूप प्रयोग शास्त्रकारांनी वर्णन केले आहेत. व्यायाम प्रकारामध्ये कुस्ती, धावणे योगासनांमध्ये हलासन, नौकासन, चक्रासन, ताडासन, वक्रासन यांचा उत्तम उपयोग मधुमेहींना होतो. विडय़ाचे पान, कात, लवंग, जायपत्री, कंकोळ हे एकत्रित दोन्ही जेवणानंतर सेवन केल्याने फायदा होतो. विशेष लाक्षणिक पथ्य नियमित आहारात ओल्या हळदीचे व आल्याचे लोणचे सेवन करावे. गहू आणि सातूच्या पिठाच्या पोळ्या किंवा फुलके नेहमी सेवन केल्यास चांगला परिणाम दिसतो. केळफूल, कारली, कोबी या भाज्या सेवन करण्यावर भर द्यावा. ज्वारीच्या भाकरीमुळे लघवीचे प्रमाण कमी होते असा काहींचा अनुभव आहे. चवीसाठी तीळ, कारळे वा लसणाची चटणी नित्यनियमित आहारात ठेवावी. कुळथाचं पिठलं मधुमेहींची चव वाढवणारा आहार आहे. मधुमेहींना खूप वेळा गॅस, अंगजडत्व अशी लक्षणे दिसून येतात. भाजलेला ओवा खाऊन घोटभर पाणी प्यायल्यास फायदा होतो. मधुमेहींना भूक खूप लागते आणि सहनही होत नाही. अशा वेळी जड पदार्थ सेवन करण्यापेक्षा किंचित शेंगदाणे, कढीपत्ता, मोहरी यांची फोडणी देऊन केलेला साळीच्या लाह्य़ांचा चिवडा रुची वाढवणारा व मधुमेह कमी करणारा ठरतो. सलाड म्हणून गाजर, कोबी, कांदा खावे. ताज्या ताकात आलं, कोथिंबीर टाकून घेतल्यास बरे वाटते. लघवीचे प्रमाण वाढल्यास.. प्रमेहामध्ये साधारणत: लघवीचे प्रमाण वाढणे किंवा लघवी खूप वेळा होणे ही लक्षणे दिसतात. लघवी कमी प्रमाणात, जळजळ होऊन अडखळत होत असल्यास मूतखडा, प्रोस्टेट इत्यादीचे व्यवछेदन निदान करून पूर्वी वर्णन केलेल्या लघवीच्या तक्रारीमधील पथ्य पाळावे. मधुमेहामध्ये लघवीचे प्रमाण वाढून त्याची संख्याही वाढते. परंतु लघवीचे प्रमाण कमी होणे म्हणजे ‘मधुमेह कमी झाला किंवा बरा झाला’ असे विधान स्वत:हून करणे धाडसाचे ठरेल व आरोग्यास अहितकारक ठरेल. बेलाच्या पानाच्या रस, हळदीचा काढा किंवा ओली हळद उपलब्ध झाल्यास त्याचा रस २-२ चमचे दिवसभरातून ३-४ वेळा सेवन केल्यास प्रमाण कमी होते. (हे करत असता मूळ पथ्य पाळणे आवश्यक ठरते, विशेषत: पाणी कमी घेण्याचे.). आल्याचा रस व लसूण यांचे सेवन प्रमेहामध्ये लाभदायक ठरते. जांभळाचा शिरकाव किंवा जांभळाच्या बियांचे चूर्ण लघवीचे प्रमाण कमी करते. जांभूळ बी चूर्ण जेवणानंतर ताकाबरोबर घेतल्यास फायदा होतो असे काही विद्वान मानतात. जांभळे खाताना ती काळीमिरी व दालचिनीसह खाल्ल्याने जास्त लाभ होतो. मधुमेह विहार आहाराइतकेच मधुमेहींच्या विहाराला महत्त्व आहे. दिवसा झोपण्याने मधुमेह वाढतो! मधुमेहाला ‘आढय़व्याधी’ म्हटले असून श्रीमंतीसारखे राहणीमान असणाऱ्यांना ही व्याधी होते. मग ती व्यक्ती श्रीमंत असो वा नसो, त्याचे राहणे, विहार तसा असावयास नको हे शास्त्र सांगते. आरामपूर्वक राहण्याने मधुमेह वाढतो. मधुमेहींच्या विहारामध्ये, पाण्यात राहण्याने मधुमेह वाढतो हे स्पष्ट केले असल्याने मधुमेही व्यक्तींनी पोहोण्याचा व्यायाम केल्यास वाढतो का, याचे संशोधन करायला हवे असे वाटते. एकूण पाण्यात नुसते बसू नये हे तर नक्की! मधुमेहींनी स्टीम घेऊ नये आणि रक्तमोक्षण वा रक्तदान करू नये. मधुमेही व्यक्तींनी नियमित व्यायाम व श्रम करणे आवश्यक असून अपवादात्मक दिवस नसावा. चालण्याने अवयवांनाही बल मिळते. उन्हात फिरणे लाभदायक असून पंख्याखाली बसणे, वातानुकूलित ठिकाणी अधिक काळ आरामपूर्वक बसणे टाळायला हवे. मधुमेहींना घाम जास्त प्रमाणात येतो व आयुर्वेदाला मधुमेह कमी करण्यासाठी हेच अपेक्षित आहे हे विशेष सांगावेसे वाटते. घाम येण्याने मेदाचे प्रमाण कमी होऊन मधुमेहींमध्ये होणारे त्वचेचे विकारही टळू शकतात. मधुमेही व्यक्तींनी अधिक थंड वा अधिक गरम पाण्याने स्नान करू नये हा शास्त्रीय सल्ला आहे.