डॉ. किशोर कुलकर्णी / डॉ. सुरेश भागवत – response.lokprabha@expressindia.com

वटवाघूळ हा सस्तन वर्गातील प्राणी असून त्याच्या पुढच्या पायांचे रूपांतर पंखांसारख्या अवयवात झालेले असते. सस्तन वर्गातील सहज उडू शकणारा हा एकमेव प्राणी. भय, भूत-पिशाच या गोष्टींशी वटवाघुळांचा संबंध समाजाने जोडला आहे. त्यांच्याबद्दल अनेक गरसमज आहेत. हा प्राणी अनेक विषाणूंचे आगर म्हणून ओळखला जातो. रेबीज, हेंड्रा, मारबर्ग हे विषाणू पसरवणारे म्हणून वटवाघुळे कुप्रसिद्ध आहेतच, पण इबोला आणि निपाहला कारणीभूत ठरणाऱ्या विषाणूंचेही ते मूळ यजमान असल्याचे संशोधनाअंती सिद्ध झाले आहे. विषाणू हे सजीव आणि निर्जीव यांच्यामध्ये असतात. सजीवांप्रमाणे त्यांना जन्म आणि अंत असतो आणि त्यांचे पुनरुत्पादन (गुणन) होते. मात्र त्यांना स्वतचे स्वतंत्र अस्तित्व नसते. ते वेगळे असतात तेव्हा एखाद्या निर्जीव वस्तूच्या कणाप्रमाणे असतात. विषाणू पूर्णपणे परोपजीवी असतात, याचा अर्थ ते दुसऱ्या कोणत्या तरी सजीवाच्या पेशींना बाधा करून स्वतचे आयुष्य व्यतीत करतात. विषाणू लाखो प्रकारचे असतात. केवळ सस्तन प्राण्यांवर जगणारे विषाणू तीन लाख २० हजार प्रकारचे असावेत असा एक अंदाज आहे. विषाणू प्राण्यांवर, वनस्पतींवर जगणारे, इतकेच नव्हे तर जिवाणूंवर किंवा इतर सूक्ष्म जीवांवर जगणारेदेखील असतात.

Why did the intensity of sun rays decrease What is the research of meteorologists Pune print news
सूर्यकिरणांची तीव्रता का घटली? काय आहे हवामानशास्त्रज्ञांचे संशोधन?
generative artificial intelligence marathi news
कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यात डोकावताना…
peter higgs marathi articles loksatta,
पदार्थ विज्ञानातील जादूगार…
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?

विषाणूच्या कणाची एक विशिष्ट रचना असते. त्याच्या अस्तित्वासाठी आवश्यक एवढीच माहिती साठवलेला डीएनएचा रेणू आणि त्याभोवती असते प्रथिनाचे कवच. प्राण्याच्या पेशींना संक्रमित करणाऱ्या विषाणूंची आनुवंशिक माहिती डीएनएच्या रूपात किंवा आरएनएच्या रूपात असते. बहुधा वनस्पतीच्या विषाणूंमध्ये डीएनएऐवजी आरएनए या प्रकारचा रेणू असतो. विषाणू अत्यंत सूक्ष्म असतात. पिथोव्हायरस नावाच्या सर्वात मोठय़ा विषाणूचा कण पंधराशे नॅनोमीटर आणि पँडोराव्हायरस एक हजार नॅनोमीटर लांबीचा, म्हणजे एका मिलीमीटरच्या एकहजारांश एवढा असतो. सर्वसाधारणपणे त्यांचा आकार २० ते ४०० नॅनोमीटर यादरम्यान असतो. करोना विषाणूचा आकार १२० नॅनोमीटर एवढा असतो.

विषाणूच्या कणामध्ये दुसरे कोणतेही रेणू नसल्यामुळे त्यात कोणत्याही जैवरासायनिक क्रिया होऊ शकत नाहीत. विषाणू जेव्हा त्याचे लक्ष्य असलेल्या पेशीत शिरतो तेव्हा तो त्या पेशींच्या सर्व जैव रासायनिक क्रियांचा ताबा घेतो आणि पेशींच्या नेहमीच्या कार्या ऐवजी विषाणूंना लागणारे रेणूच फक्त तयार होतात, त्यापासून विषाणूचे शेकडो नवे कण तयार होतात, पेशी फुटून विषाणूचे कण बाहेर पडतात आणि प्रत्येक कण एका नव्या पेशीला संक्रमित करू शकतो. सगळेच विषाणू परोपजीवी असल्याने ते ज्या पेशींच्या आत वाढतात त्या पेशींचा नाश करतात आणि त्यामुळे ते रोगकारकदेखील असतात. देवी, पोलिओ, कावीळ, फ्लू हे सारे आणि आणखी किती तरी रोग वेगवेगळ्या विषाणूंमुळे होतात. वटवाघुळे १३७ प्रकारच्या विषाणूंचे निवासस्थान आहेत त्यापकी ६१ प्रकारचे विषाणू मानवांना बाधा करू शकतात. वटवाघुळांची प्रत्येक प्रजात ही सरासरीने जास्त प्रकारचे विषाणू बाळगते. रेबीज, सार्स, इबोला आणि निपाह या चारही रोगकारक विषाणूंचा उगम वटवाघुळांमध्ये आहे, असे आढळले आहे. वटवाघुळांच्या विविध प्रजातींत बरेच जास्त साम्य आढळते आणि वेगवेगळ्या प्रकारची वटवाघुळे मोठय़ा समूहांमध्ये जवळजवळ राहतात, त्यामुळे वटवाघुळांतील विषाणूंमध्ये एका प्रजातीतून दुसऱ्या प्रजातीत संक्रमण करण्याची क्षमता जास्त असावी, असे शास्त्रज्ञांना वाटते.

वटवाघुळे आणि मानवाचा थेट संबंध येत नसला तरी इतर जंगली श्वापदे, पाळीव प्राणी हे वटवाघुळे आणि मानव यांच्यातील दुवा बनत असावेत. या दुव्यांचा अभ्यास करून हा संपर्क टाळता येणे शक्य आहे. सध्याच्या करोना विषाणूच्या साथीचा उगम चीनमधील वटवाघुळे किंवा अन्य वन्यप्राणी मारून खाण्याच्या सवयीमध्ये आहे, असे म्हटले जाते. वटवाघुळांचे नसíगक निवासस्थान किंवा त्यांच्या अधिवासात माणसाने प्रवेश केला आहे, खासकरून उष्ण कटिबंधात हे घडतेय. मलेशियात वटवाघुळांचा अधिवास असलेल्या वन क्षेत्रात पिग फार्म म्हणजे डुक्कर संवर्धन केंद्र उभारले गेले आणि त्यामुळेच डुकराच्या माध्यमातून प्रथम निपाह हा विषाणू माणसात संक्रमित झाला.

विषाणू विशिष्ट सजीवाच्या पेशींच्या संपर्कात आल्यावर संक्रमित होतो, ती पेशी मरते आणि त्यातून बाहेर पडलेले कण आणखी पेशींना संक्रमित करतात. जोपर्यंत परिस्थिती विषाणूला अनुकूल असेल तोपर्यंत ही साखळी सुरू राहते. परंतु सजीवांची उत्क्रांती होताना त्यांच्या अंगी प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचीदेखील व्यवस्था निसर्गाने विकसित केली आहे. प्राण्यांच्या अंगी जी प्रतिकारशक्ती निर्माण होते तिच्यामुळे विषाणूंना ओळखून त्यांचा नाश केला जातो आणि संक्रमण आटोक्यात येते. प्रतिकारशक्ती निर्माण होऊन संक्रमणाचा नाश होईपर्यंत जे विषाणू कण तयार झालेले असतात ते वातावरणात मिसळून, ज्याच्या अंगी प्रतिकारशक्ती निर्माण झालेली नाही अशा व्यक्तीच्या संपर्कात येण्याच्या संधीची वाट पाहत असतात. ती संधी मिळताच तिथे संक्रमणाची सुरुवात होते. साधारणपणे प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा कालावधी इतका असतो की, संक्रमणामुळे त्या सजीवाचा मृत्यू होत नाही; परंतु त्या व्यक्तीची प्रकृती क्षीण असेल किंवा प्रतिकारशक्ती पुरेशी नसेल तर मृत्यू ओढवतो. तसेच वेगवेगळ्या विषाणूंची घातकता वेगवेगळी असते. केरळमध्ये निपाह विषाणूचा संसर्ग १८ जणांना झाला, त्यातले १७ लोक मृत्युमुखी पडले. मारबर्ग आणि इबोला विषाणूचे संक्रमण झालेल्या ९० टक्के रुग्णांचा मृत्यू झाला. रेबीज विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपकी ९९ टक्के लोकांचा मृत्यू संभवतो. करोना विषाणूच्या बाबतीत विविध ठिकाणी मृत्यूचे प्रमाण दोन ते चार टक्के असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.

वटवाघुळाच्या शरीरात इतक्या प्रकारचे विषाणू आले कसे आणि वटवाघूळ जर स्वतच्या शरीरात एवढे विषाणू बाळगते, तर त्याला स्वतला त्यांचा त्रास का होत नाही. वटवाघुळांचे मोठ-मोठे समूह असतात आणि यांच्या वेगवेगळ्या प्रजातीदेखील एकमेकांच्या जवळपास सापडतात. विषाणूंच्या उत्परिवर्तनाने (म्युटेशन) त्यांचे नवनवीन प्रकार निर्माण होऊन ते वटवाघुळांच्या एकापेक्षा जास्त प्रजातींना संक्रमित करत असावेत. या सर्वाचा परिणाम म्हणजे त्यांच्या शरीरात इतक्या प्रकारच्या विषाणूंचा वास असतो. त्यातले बरेचसे त्यांचा मृत्यू ओढवण्याइतके घातक नसावेत, तसेच त्यांना प्रतिक्षम संस्थेमुळे संरक्षण मिळत असावे.

या विषयावर चीनमधील एका शास्त्रज्ञाने प्रकाश टाकला आहे. वुहान येथील विषाणूंवर संशोधन करणाऱ्या संस्थेतील प्राध्यापक पेंग झो यांना असे आढळले आहे की, वटवाघुळांमध्ये विषाणूरोधक ‘िस्टग-इंटरफेरॉन पाथवे’ नावाचा प्रतिक्षमता मार्ग कमी तीव्र झालेला असतो आणि त्यामुळे वटवाघुळे तेवढीच प्रतिकारशक्ती निर्माण करतात जेवढी आजारात जिवंत राहण्यासाठी पुरेशी आहे. ते प्रतिक्षमशक्तीचा तीव्र उपयोग टाळतात. वटवाघुळांच्या शरीरातील विषाणूंच्या विरोधात काम करणारी प्रतिक्षम संस्था विषाणूंवर प्रतिहल्ला चढवते; परंतु त्याच वेळी प्रतिहल्ल्याची तीव्रता कमी करणाऱ्या जैव रसायनांची निर्मिती होते आणि त्यामुळे प्रतिहल्ल्याची परिणामकारकता सीमित राहते. पेंग झो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सेल होस्ट अँड मायक्रोब’ या नियतकालिकात एक शोधनिबंध प्रसिद्ध केला. रेबीज विषाणू मात्र वटवाघुळाला आजारी पाडू शकतो.

बाधा झालेल्या प्रत्येक व्यक्तीचा मृत्यू होत नसल्यामुळे विषाणू आणि त्याचा विशिष्ट आश्रयदाता यांची सहउत्क्रांती होत गेली आहे आणि त्यादरम्यान विषाणूने संक्रमित करण्याच्या आणि आश्रयदात्या प्रजातीच्या त्यापासून वाचण्याच्या युक्त्या आत्मसात केल्या आहेत. स्वतच्या उत्क्रांतीचा ओघ कायम राहावा यासाठी विषाणू आणखी एका घटनेचा वापर करतात. त्यांच्या आनुवंशिक माहिती असलेल्या डीएनए किंवा आरएनएमध्ये क्वचित छोटे बदल होतात (उत्परिवर्तन). त्यातील बहुतेक वाया जातात; परंतु एखादा असा असतो की त्यामुळे विषाणूच्या गुणधर्मात बदल होऊन त्याला नेहमीच्या प्रजातीखेरीज आणखी वेगळ्या प्रजातीला संक्रमित करण्याची क्षमता येते. वुहानमधून पसरलेल्या विषाणूच्या अंगी उत्परिवर्तनाने वटवाघुळांच्या पेशी आणि मानवांच्या पेशी या दोन्हींना संक्रमित करण्याची क्षमता प्राप्त झाली असे मानले जाते.

या माहितीचा विचार करता नुसते वन्य प्राण्यांपासून सुरक्षित अंतरावर राहणे पुरेसे नाही तर अन्य एखाद्या प्रजातीद्वारे ते आपल्याला संक्रमित करणार नाहीत याबद्दल जागरूक राहिले पाहिजे.