lp95दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव. आजच्या रोषणाईच्या झगमगाटात आपल्याला दिव्याचे तेज तेवढे जाणवतही नाही. पण जेव्हा हे काहीच नव्हते तेव्हा साहजिकच माणसाच्या आयुष्यात दिव्याला आत्यंतिक महत्त्व होते.

शुभंकरोति कल्याणम्,
आरोग्यम् धनसंपदा।
शत्रुबुद्धी विनाशाय,
दीप:ज्योती नमोऽस्तुते॥

shares market, stock prices
तेजीला पूर्णविराम की स्वल्पविराम?
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
How to prevent heart attacks
Heart Attack : हृदयविकाराचा धोका कसा टाळायचा? वयाच्या विसाव्या वर्षापासून लावा ‘या’ सवयी, तज्ज्ञ सांगतात…

लहानपणी संध्याकाळी ‘शुभंकरोति कल्याणम्’ हा श्लोक देवापुढे समई लावल्यावर म्हणत असू. आजही संध्यासमयी रस्त्याचे दिवे लागल्यावर वा बसमध्ये दिवे लागल्यावर बहुतांशी लोक रस्त्यावरचे वा बसमधले हात जोडून नमस्कार करतात. या दिव्याला सर्वत्र आदराचे, मानाचे, श्रद्धेचे, अनन्यसाधारण स्थान सर्व जगात, सर्व जातीधर्मवंशात अगदी पुरातन कालापासून आहे. दीप/ दिवा हे प्रकाश देणारे साधन असा त्याचा सर्वसामान्य अर्थ, असला तरी त्याचे कार्य व महत्त्व अनन्यसाधारण, असामान्य आहे हे नि:संशय.
तसे पाहिले तर सूर्य आणि चंद्र हे दोन्ही दीपच. पण सूर्य सर्वकाळ प्रकाशमान असला तरीही पृथ्वीभ्रमणामुळे त्याचा प्रकाश मिळण्याचा काल मर्यादित तसेच चंद्राच्या कलांमुळे त्याचाही प्रकाश काही थोडय़ा रात्रींपुरता पूर्ण व नंतर क्षीण होत जाणारा. हे विश्वदीप सीमित काल प्रकाश देतात त्यामुळे बाकी कालावधीत सर्वत्र अंध:कार पसरतो. या अंधाऱ्या समयी प्रकाश देण्याचे काम करणारे साधन म्हणजेच दीप/दिवा. म्हणूनच त्याचे स्थान अढळ, महत्त्व अढळ.
आकाशात रात्री चमचमणाऱ्या असंख्य चांदण्या त्यांचे पिठूर चांदणे मनास आनंद देते, पण अंधाराचे जाळे निपटून व्यवहार करण्याइतपत त्यांची तेजोमयता त्यांच्या प्रचंड दूर अवकाशस्थितीमुळे अत्यंत क्षीण म्हणून त्यांचा उपयोग नाही. अशामुळे हे मानवनिर्मित प्रकाश साधनच अत्यावश्यक आहे. रात्रीच्या वेळी संध्याकाळ ते सकाळ/ प्रभात या कालावधीत उजळलेले हे दीप/दिवे दिवसाही काही व्यवहारात प्रकाशमान असतात. हे दीपविश्व फार वेगळे. या दीपज्योती मानवी जीवनाचा एवढा अविभाज्य भाग की त्यांचा प्रयोग त्याने गीतातून, गाण्यातून भावना व्यक्त करण्यासाठी उपमा, भावना, उदाहरण इत्यादी अनेक प्रकारे वापरला आहे.
मानवाला अग्नीचा शोध लागला तेव्हा त्याला प्रकाश देणारी एक उपाययोजना मिळाली असावी. प्रकाश देणारे ज्योती असलेले हे दीप. मानवाने शतकानुशतके या दीपांचे विविध प्रकार निर्माण केले व आजही करत आहे. तरी प्रामुख्याने हे तीन वर्गात मोडतात. हे तीन वर्ग म्हणजे तेल/चरबीचे दिवे, गॅसचे दिवे, विजेचे दिवे. याशिवाय सौरऊर्जेचे दिवे जरी असले तरी ते विजेचे दिवे या प्रकारातच येतात. .
अगदी प्राचीन दिवे होते समुद्राचे शिंपले किंवा खळगे पाडलेले दगड यांचा उपयोग केलेले. दीप बनविण्यासाठी जव्हारासारख्या वनस्पतीचा वात म्हणून उपयोग केला जायचा व जनावरांची चरबी इंधन म्हणून. प्राचीन लोक खळगा केलेले दगड वापरायचे, पण त्यात तेल असायचे इंधन म्हणून व कापसाच्या वाती असायच्या. प्राचीन ग्रीक व रोमन लोकांनी मात्र पंचधातू वा ब्राँझ वा चिनी माती दिवे बनविण्यासाठी वापरली. ते दिवे बशीसारखे पसरट असत व त्यात ऑलीव्ह ऑइल/ ऑलीव्ह तेल वा अन्य वनस्पतीजन्य तेल वापरले जायचे. त्या तेलावर वात तरंगती असायची. ग्रीक पद्धतीच्या दिव्यामध्ये बशीच्या टोकाला एक खांच असायची ज्यात वात बसत असे. काही रोमन दिवे चहादाणीसारखे असत. त्यात चहादाणीत तेल व चोचीत वात असायची. नंतर मेणबत्तीचा वापर सुरू झाला. हे एकप्रकारचे चरबीचे दिवे. आरंभीचे मेणबत्तीचे दिवे वातीला चरबी मेणांनी माखून केलेले होते. नंतर मेणबत्ती उत्पादकांनी टॅलो हे द्रव्य-मेणचट पदार्थ जो जनावरांच्या चरबीपासून तयार केला जायचा त्याचा वापर केला. उत्तम मेणबत्त्यांमध्ये मधमाश्यांच्या पोळय़ाचे मेण किंवा पेट्रोलियम पदार्थापासून निर्मिलेले पॅराफिन वापरले जाई.
मध्ययुगात स्कॉटलंडमध्ये एक तेलदीप ‘क्रुझ’ या नावाने उदयाला आला/ अस्तित्वात आला. यात एक लोखंडी तसराळय़ाला एक अडणी जोडलेली असे ज्यात वात बसवत. पुष्कळदा यातून टपकणारे तेल गोळा करण्यासाठी त्याखाली दुसरी अडणी असे. नंतरच्या काळात दीपप्रकाश अधिक पसरावा वा एकत्रित व्हावा अशा दोन्ही हेतूंनी त्याला वेगवेगळे परावर्तक बसविण्यात आले. १७७० पर्यंत अशा थोडय़ा सुधारणांखेरीज फार प्रगती त्यांच्या जडणघडणीत झाली नाही.
१९८० च्या कालावधीत ‘अल्मे ऑरगंड’ या स्वीस रसायनशास्त्रज्ञाने असा दिवा संशोधनाने बनविला ज्यात वातीला पोकळ नळकांडय़ाचा आकार दिला होता. या विशिष्ट आकाराने ज्योतीच्या मध्यभागी हवेचा पुरवठा होई व त्यामुळे उत्तम इंधन ज्यलनक्रियेने या दिव्याचा प्रकाश इतर दिव्यांच्या तुलनेने अधिक प्रखर दिसे. नंतर त्याच्याच एका विद्यार्थ्यांने वात काचेच्या नळीरूप आवरणात अधिक चांगली जळते हे शोधून आणखी त्या दिव्यात तशी सुधारणा केली. या नळीतूनच पुढे दिव्याची काच धुरांडी (चिमणी)चा शोध लावण्यास मदत झाली. त्यामुळे ज्योतीचे हवेच्या/वाऱ्याच्या वेगाने विझणे थांबले. या सुमारास देवमाशाचे तेल व कोल्झा (Kolza) तेल जे मोहरीसारख्या वनस्पतीपासून काढले जाई, ही महत्त्वाची ज्वलनद्रव्ये बनली. इ.स. १८०० मध्ये पॅराफीक या पेट्रोलियम द्रव्याचा ज्वलन/इंधन म्हणून सर्रास वापर होऊ लागला.
गॅसच्या दिव्याांना मात्र वातीची जरूर नसते. ज्वलनशील वायूवर जळतात. गॅस/वायू एका छोटय़ा नळीद्वारे बाहेर येतो व बाहेरील हवेच्या सान्निध्यात जळतो. यात वापरले जाणारे ज्वलनशील वायू अनेक प्रकारचे असतात, जसे अ‍ॅसिटिलीन, ब्युटेन, कोलगॅस, नॅचरल गॅस इ.इ. इ.स. १७९१ साली ‘विल्यम मुरडॉक’ या स्कॉटीश इंजिनीअरने व्यापारी तत्त्वावरील पहिला गॅसचा दीप/ दिवा बनविला. यात कोलगॅसचा वापर केला होता. इ.स. १८०० साली लंडनमध्ये रस्त्यावरील दिवे या प्रकारचे उपयोगात आले व नंतर इतर शहरातही. इ.स. १८००च्या अखेपर्यंत म्हणजे विद्युतदीपांनी त्यांची जागा घेईपर्यंत त्यांचा प्रभाव कायम राहिला. गॅसच्या दिव्यांमध्ये एक दोष होता तो म्हणजे त्याची ज्योत फडफडायची व कमी-जास्त उजेड द्यायची. पुढे त्यात सुधारणा झाली व काचेची चिमणी वापरली जाऊ लागली. ज्योत स्थिर ठेवण्यासाठी त्यानंतर इ.स. १८००च्या अखेरच्या टप्प्यात मँटलचा शोध लागला व हा प्रश्न संपला. हे मँटल म्हणजे विणलेली कापडी पिशवी जिची वीण ही सैलसर असायची व एका विशिष्ट रसायनात ती भिजवलेली असायची. कापड दिव्यामध्ये चटकन जळायचे व ते रसायन संथपणे प्रकाशमान होऊन जायचे, जसजसा गॅस त्याभोवती जळायचा. आजही या गॅसच्या गॅसबत्त्या ग्रामीण व काही शहरातही वापरात आहेत.
lp96यानंतर विद्युत दीपांचे युग आले ज्यात विद्युत शक्तीचे/ उर्जेचे प्रकाशात रूपांतर होते. अमेरिकन शास्त्रज्ञ थॉमस एडीसन हा त्याचा जनक. त्याने १८७९ मध्ये हा दीप विकसित केला. इ.स. १९००च्या सुमारास या दिव्यांनी सर्व जगी प्रवेश केला व इतर दिवे कालबाह्य़ होऊ लागले. आज आपण या विद्युत दीपांच्या जगात आहोत व वेगवेगळय़ा प्रकाराचे, आकाराचे, क्षमतेचे दिवे सर्वत्र सर्रास उपयोगात आहेत.
दिवाळी वा इतर धार्मिक सणांत तसंच समारंभात निरांजन व समई यांच्या स्थानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. भाऊबीज वा अन्य प्रसंगी निरांजनाने ओवाळणे ही अत्यावश्यक गोष्ट आहे. देवपूजेत निरांजन असतेच. मेणपणत्या/ मेणबत्त्यासुद्धा वेगवेगळय़ा आकाराच्या, रंगाच्या आल्या तरीही मातीच्या तेलवातीवरच्या पणत्या आपले स्थान टिकवून आहेत व वापरात आहेत हे दिसून येतेच.
इतर धर्मामध्ये मेणबत्त्यांना हे स्थान आहे. विजेचे दिवे वीज गेल्यावर निरुपयोगी होतात तेव्हा घरोघरी मेणबत्त्या, कंदील यांना स्थान आहेच व ती साधने वापरली जातात. राखीव प्रकाशसाधन म्हणून ती घरोघरी ठेवलेली असतातच. इमर्जन्सी लॅम्प आता अस्तित्वात आले तरी सर्वसामान्यांच्या घरी कंदील, मेणबत्त्या राहणारच; कारण किंमत व अन्य गोष्टी.
या दीपांचे वा दिव्यांचे महत्त्व संध्याकाळ झाली की पटू लागते; नव्हे तर सायंसमय ते उष:कालपर्यंतचे मानवी जीवनात दीपविश्वच असते. मग ते दीप कोणतेही असोत. हे दीपमाहात्म्य येथेच थांबत नाही. विजेऱ्या/ बॅटरी/ टॉर्च हासुद्धा एक सुटसुटीत नेता येणारा प्रकाशदीपच. तिमिरांच्या राज्यात तर दीपांशिवाय व्यवहार होतच नाहीत. म्हणूनच तर दीपांना अगदी प्राचीन काळापासून आजतागायत अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. मशाल, दिवटय़ा हेसुद्धा प्रकाशदीपच. काही विद्वानांना त्यांच्या पालखीबरोबर दिवसाही मशाली लावून जाण्याचा मान पेशवाईत होता. तो त्यांच्या विद्वत्तेचा गौरव म्हणून. बॅटऱ्यांच्या जागी पूर्वी मशाली वा दिवटय़ा पेटवून एका वाडीवरून दुसऱ्या वाडीस जात असत रस्त्याने. पूर्वी सभा वा मंदिरात प्रवचनावेळी मशाली वा दिवटय़ा लावूनच उजेड केला जाई.
वेगवेगळय़ा मंदिरांच्या प्रांगणात दीपमाळा आजही अस्तित्वात आहेत व उत्सव वा सणांच्या दिवशी त्यांचे प्रज्ज्वलन करतात. तेव्हा दिसणारे नयनमनोहारी रूप शब्दातीत आहे. प्रसंगी केला जाणारा दीपोत्सव सर्व मंदिरांच्या प्रांगणात तसेच कळसावरही केली जाणारी दिव्यांची आरास व आकर्षक मांडणी अनेकांना आठवत असेल. आजही असा दीपोत्सव करतातच. नदीच्या पात्रातही हे दिवे जेव्हा सोडले जातात तेव्हा फार मनोहारी दृश्य दिसते. हरिद्वारला गंगेच्या पात्रात असे असंख्य दीप सोडले जातात तेव्हा पाण्याबरोबर वाहत जाणारे हे दीप त्यांचे पाण्यातील प्रतिबिंब हे नयनमनोहारी दृश्य मनात कायमचे घर करते. हरिद्वार-बनारस येथे होणारी गंगेची सांजारती- त्यावेळी उजळले जाणारे मोठमोठे आरतीदीप लक्षवेधी असतात. दीपांबरोबर मानवाच्या भावना अनेकविध प्रकारे जोडलेल्या आहेत. आजही कोणी गेल्यावर त्याचे घरचे लोक एक पणती टोपलीखाली पेटवून ठेवतात, ती त्या प्राणज्योतीचे प्रतीक म्हणून असे वाटते.
काजवा हासुद्धा एक प्रकारचा प्रकाशदीपच. कोकणात पावसाळय़ापूर्वी असंख्य काजवे चमचमत उडतात. पूर्ण झाडच्या झाड त्यांच्या प्रकाशाने उजळले जाते. ख्रिसमसच्या सणात ख्रिसमस ट्री करतात त्यावर बल्ब लावून (माळा-बल्बच्या) प्रकाशित करतात. तसेच निसर्ग कोकणात या काजव्यांनी वृक्ष प्रकाशमान करतात व कोकणात मान्सून ट्री सजवतात असे वाटते. पर्जन्य ट्री म्हणा हवं तर. ही सजावट मात्र अकृत्रिम बरं का! अनेक रंगी नसली तरी विलोभनीय चमचम अखंड रात्रभर करणारी निसर्गाची ही निर्मिती अगदी नैसर्गिक, प्राकृतिक, जिवंत. माझे बालपण कोकणात गेलेले. त्यावेळी घरात काजवे रात्री येतच. ते आम्ही पकडायचो व बाटलीत ठेवायचो. ते पकडणे सोपे नसे पण कठीणही नसे. तो एक खेळ असे. बाटलीत ठेवल्यावर काजव्यांचा प्रकाश गमतीदार दिसायचा चमचमणारा. कधी एखादा काजवा अंगरख्यात वा केसात अडकला की आणखी गंमत वाटायची. पावसाळा सुरू झाल्यावर हे उडते दीप कोठे जातात ते कळत नाही. ते परत वर्षभरानेच पुढील पावसाळय़ाआधी दिसू लागतात. पावसाळ्याची सूचना देणारे हे पायलट दीपच निसर्गाचे.
जंगलात पण काही प्रकाश देणाऱ्या वनस्पती आहेत. पण काजव्यांचे विश्व हे वेगळेच आहे. काही जलचर पण असा प्रकाश निर्माण करतात. असे सांगतात की चीनचे भूतपूर्व पंतप्रधान चाऊ एन लाय यांनी गरिबीमुळे काजवे पकडून त्यांना एकत्र ठेवून त्या प्रकाशात अभ्यास केला आहे. खरे-खोटे करणे नाही, पण झाडेच्या झाडे जेव्हा प्रकाशमान होतात काजव्यांच्या वस्तीने तेव्हा हे खरे असू शकेल असे वाटते.
दिव्यांबरोबर मांगल्याची, पवित्रतेची देवत्व त्यात असल्याची भावना मनात रुजली आहे. संस्कारांमुळे त्यामुळेच दिवे लागल्याबरोबर नकळत हात जोडले जातात. देवघर, तुळशी वृंदावन येथे हे सायंदीप लावण्याची आपली परंपरा निरंजन, समई लावण्याची प्रथा आहे. फ्लॅट संस्कृतीच्या युगात तुळशी वृंदावन वगैरे दिसतच नाही, पण खेडय़ात व मंदिर, आश्रमात हे मंगलाचरण दिसतेच. मन प्रसन्न करणारे ‘‘तमसो मां ज्योतिर्गमय,’’ सांगणारे ‘‘शुभं करोति कल्याणम’’ सारखे मंगलकामना स्तोत्र म्हणण्याची परंपरा/ भाग्य किती घरांत आहे? पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावाखाली तिने प्रभावित झालेले, त्या संस्कृतीच्या आहारी गेलेली आपली पिढी व आपण त्यामुळे भारतीय सुसंस्कार आपणास कालबा, अडगळीचे/ अडचणीचे व गावंढळ, असंस्कृत वाटतात हे सत्य आहे. असो. कालाय तस्मै नम:।
या दीपप्रज्ज्वलनाची स्तोत्रे रचली गेली तसेच पूजेतही दीप/निरांजन लावताना ‘‘आज्यंच वर्ती संयुक्तं वन्हींनां योजितं मया। दीपं गृहाण देवेश मम अज्ञानं निवारय॥’’ असा मंत्रही लिहिला गेला. पूजाविधानात ज्याचे वर्णन आहे तो हा श्लोक/मंत्र. दीप अंधार दूर करणारा असला तरी त्याने कोणता अंध:कार दूर करावा याच्या पण वेगवेगळय़ा संकल्पना मन करते. अंध:कार केवळ प्राकृतिकच असतो असे नाही तर मानवी जीवनात अनेक प्रकारचे सावट/अंधार येतात व जीवन काजळवून टाकतात, त्यामुळे हे तिमिरपण नष्ट करण्यासाठी दीपांचा रूपकात्मक प्रयोग केलेला दिसून येतो व तो त्यांचा प्रकाश त्या प्रकारचा अंधार नष्ट करणारा असावा, अशी ही भावना त्या दीपसंज्ञेत दिसून येते. वरील मंत्रात अज्ञान नष्ट करण्यासाठी ईश्वराची प्रार्थना करताना दीप त्याला दिला आहे व तो घेण्याची प्रार्थना पण केली आहे. (दीपं गृहाण देवेश)
ज्ञानदीप हे अज्ञान तिमिरनाशक असतात. ज्ञान मिळते ते गुरू, माता, पिता याजकडून. जसजसे ज्ञान मिळत जाते तसतसा अज्ञानाचा नाश होतो त्यासाठी काही वेगळे प्रयत्न/पराकाष्ठा करावे लागत नाहीत. ज्योतीने ज्योत लावावी तसे हे होत असते. गुरुपरंपरा याची प्रतीकं आहेत. हा ज्ञानदीप आपणच तेवत ठेवायचा असतो. आपली निष्ठा तो तेवत ठेवू शकतो. जसजसे ज्ञान मिळवत जाऊ तसतसा हा दीप प्रखर तेजाचा होतो. पण हा दीप विद्येचा/ज्ञानाचा आहे. तो प्रत्यक्ष दिसतो जेव्हा मनुष्य लिहितो वा बोलतो त्यातून. त्याचे विचार हाच त्या दीपाचा प्रकाश असतो व त्याप्रमाणे त्याची संभावना समाज करतो.
हे प्रखर ज्ञानदीप म्हणजे आयुष्याची समिधा करून ज्ञानार्जन केलेले व ते ज्ञान तेवढय़ाच तळमळीने समाजास देणारे महापुरुष. हे अखंड विद्यार्थी होते. शिक्षण घेणे संपते हे त्यांना मान्यच नव्हते. हे नंदादीप ज्ञानाचे पवित्र, आदरणीय, मंगल,प्रखर पण शीतल तेजाचे अलांछित असे. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, आर्किमिडीज, श्रीकृष्ण, व्यास, बुद्ध, महावीर इ. इ. अनेक नावे. यांचे कार्य एवढे की त्यांचे ग्रंथ हेच आज त्यांचे अस्तित्वदीप आहेत. अजरामर होतात ते ज्ञानदीप. काळाच्या गतीत त्यांची प्राणज्योती जरी मालवली तरी ही ज्ञानज्योती अक्षय असते. ‘मरावे परी कीर्तिरूपे उरावे’ हे वचन येथे सार्थ ठरते. कारण त्यांचे कार्य कीर्तीचा दीप लावून जाते जो काळाला विझवता येत नाही. ग्रंथरूपाने हा दीप घरोघरी पवित्र भावनेने ठेवला जातो. पूजीला जातो. त्याचे पठन केले जाते. त्याची आरतीसुद्धा केली जाते. हे महापुरुष सर्व धर्मात झाले, जातीत झाले, पण त्यातले काहीच विश्ववंदना योग्यतेचे झाले. बाकीचे त्यांच्या त्यांच्या जागी राहिले. त्यांनी लावलेले अनुयायीदीप पुढे त्यांचे कार्य करत असतात. त्यातले अधिकारीदीप गुरूप्रमाणे ज्ञानदीप झाले तर काहींनी त्यांच्या कृत्याने त्या पवित्र ज्ञानदीपांची विटंबनाही केली. तरी ते मूळ महापुरुष अक्षय ज्ञानदीप कालातीत राहिले.
या ज्ञानदीपांचे विचारधन ग्रंथ रूपाने अक्षय या मानवी जीवनात राहिले. संस्कार, धर्म, नीति, मानवता, सदाचार इ. इ. सुवर्णमूल्यांचे हे ज्ञानदीप प्रसारण करतात. वेद हे तर सर्वश्रेष्ठ आद्य ज्ञानदीप. ही थोर गं्रथसंपदा आपल्या आयुष्यातील अमूल्य अक्षय विचार/ ज्ञानदीपांचे भांडार आहे. हे सरस्वतीचे दीप. हे दीप उजळले गेले. जात आहेत व जात राहतील. प्राचीन काळात भूर्जपत्रावर तर आता अगदी संगणकावर हे ज्ञानदीप उजळले आहेत. त्यांचा प्रकाश बुद्धीने ग्रहण करायचा व मनाचे अंतरंग उजळायचे असते. चर्मचक्षूंनी वाचा वा कर्णेन्द्रियांनी ध्वनीरूपे ग्रहन करा. हे दीप फक्त बुद्धी व मन यांच्याशीच नाते सांगतात. हे ज्ञानदीप सर्व विषयांचे असतात. कोणता विषय निवडून कोणता दीप उजळायचा हे मात्र आपणच ठरवायचे असते. मनाला सुख, समाधान देणारे हे दीप त्यांच्या प्रकाशाने ज्ञानकक्षा रुंदावतात. पूर्वी ज्ञानी पुरुषांना ‘दशग्रंथी’ असा बहुमान असायचा. या ज्ञानदीपांना ना तेल, तूप वा तत्सम माध्यम लागत ना ते काळवंडतात. फक्त आपली जशी भावना तसे यांचे स्थान. ‘न हि ज्ञानेन सद्दशं पवित्रं इह विद्यते’ हे या सात्त्विक ज्ञानदीपांना लागू पडते.
भावनांचे दीप नयनांत उजळतात. डोळय़ांतून प्रगटणारे प्रेम, काम, क्रोध, माया, मद, मत्सर इ. इ.भावनांचे दीप नेत्रज्योतीतून त्यांचा प्रकाश दाखवितात, तो नेत्र ग्रहण करतात. या दीपांचे सामथ्र्य वा आविष्करण मानवाच्या व्यवहारात सदा दिसते. ते पुष्कळदा मुद्रेवरही उमटते. पण हे भावनादीप अमोल असतात असं नाही तर त्यांची प्रकाशमयता वैखरीतून प्रकटते बहुतांशी वेळा. ‘डोळय़ांत वाच माझ्या तूं गीत भावनांचे’ यासारखी गीते हे भावनादीप वाङ्मय प्रकट कसे असते व ते डोळय़ांनीच वाचायचे असते हे सांगून जातात. मानवी व्यवहारात हे दीपविश्व भावनांचे सदैव चालू असते.
मनाचा व्यापार व व्यवहार या दीपांद्वारे दिसतो. संतांचे नयनात सदा कारुण्य, प्रीती, दया, ममता, समता यांची दीपमालाच असते, तर गुंड, दरोडेखोर यांच्या नेत्रात लालसा, वासना, क्रौर्य यांचे दीप असतात. माया, ममता, वात्सल्य आईचे भावनांचे दीप दाखवतात. तिचे नेत्र तर धर्माध लोकांच्या नयनी सदा अहंकार असतो. शत्रूंच्या डोळय़ांत मत्सर व सूड यांचे दीप पेटतात. निरागस भावना दीप नवजात शिशूचे असतात. विविध भावनांचे हे दीप कधी सोज्ज्वळ, कधी दाहक, कधी दाहक, कधी दु:खाचे, कधी मायेचे, कधी करुणेचे उजळतात नेत्रात. कधी कधी अश्रूरूपाने त्यांची खोली/अर्थगर्भता दाखवतात. निव्र्याज्य, निरंकारी भावनादीप खऱ्या संतांचेच असतात. प्रेमिकांच्या नयनात प्रीतीदीप तर शत्रूंच्या नयनात क्रोधदीप उजळतात. असे हे भावनादीप माणसाच्या मनात सदैव राहणारच. माणसाच्या मनाला आतापर्यंत झालेल्या ज्ञानाचा, संस्कारांचा, विचारांचा आविष्कार हे भावनादीप करतात.
लुच्च्या लबाड फसव्या माणसांच्या डोळय़ांत वेगळेच भाव दिसणारे दीप असतात. हा भाव भुरळ घालणारा असतो. यशाचे, आनंदाचे दीप यश मिळाल्यावर दिसतात. नेत्रात तर कृत्यार्थतेचे, समाधानाचे दीप कर्तव्यपूर्तीचा आनंद देतात. अनंत भावना अनंत प्रसंगी नयनातून प्रगट होतात त्यांचे समग्र वर्णन करणे कठीण. अनंत माणसे अनंत व्यवहार नाही मोजू शकत. पण हे भावनादीप केवळ माणसांमध्येच असतात असे नव्हे तर पशुपक्ष्यांमध्येही असतात बरं का.
असे हे दीपविश्व सतत मानवाच्या जीवनाशी निगडित. दीपांशिवाय जीवनाचा दीप अपुराच. म्हणूनच या दिव्यांच्या विश्वात माणूस जगतो, जगला व जगणार आहे. हे दीप मानवाला चैतन्य, मांगल्य जेवढे देतील तेवढे त्याचे जीवन उजळतील. आपण किती घ्यायचे ते आपणच ठरवायचे.
lp97
माणूस जेवढे मांगल्याचे, पावित्र्याचे, मानवतेचे दीप लावील तेवढी त्याची व पर्यायाने समाजाची, व राष्ट्राची उन्नती होत राहील. म्हणूनच लेखांती आयुष्याच्या मशाली पेटवा, जीवन उजळवा व मांगल्याने विश्व भरून टाका असे विनवून ‘दुरितांचे तिमिर जावो’ ही प्रार्थना करतो व सर्वाना मंगलदीप प्रकाश मिळो ही परमेश्वरास प्रार्थना करतो. श्री. ज्ञानेश्वर माऊलींनीही ‘‘तै अविवेकाची काजळी। सांडोनि विवेकदीप उजळी। तै योगिया पाहे दिवाळी निरंतर॥’’ असे म्हटले आहे. त्याप्रमाणे मानवाने जर अविवेकाची काजळी नष्ट करून विवेकदीप उजळला तर योगियांसारखा तो पण निरंतर दिवाळीचा आनंद घेईल. तेव्हा श्री परमेश्वरकृपे तुमचे विवेकदीप उजळोत व सर्वत्र शांती, समाधान, सुखसमृद्धीची दीपमाला प्रकाशो, ही इच्छा.