0kedare‘केवढे वजन वाढले आहे माझे? माझे पोट एवढे कधीच सुटलेले दिसत नसे! आता म्हणजे जीन्स आणि टी शर्ट घालायाचीसुद्धा लाज वाटायला लागली आहे.’ असे उद्गार चाळिशीतल्या स्त्रीच्या तोंडी सर्रास, सहजपणे असतात.

हल्ली साधारण १३-१४ वर्षांपासूनच सर्वजण, विशेषत: मुली आपल्या वजनाविषयी जागृत होतात. आईला वाढत्या वजनाची चर्चा करताना पाहिले की आपोआपच वयात येणाऱ्या मुलीही आपल्या वजनाची चिंता करू लागतात. जाहिरातीतील मॉडेल्स, करिनाचा साइझ झीरो याचाही त्यांच्या मनावर परिणाम होतो. किशोरावस्थेत होणारे बदल वयात येणाऱ्या मुलीला आपल्या शरीराची नव्याने जाणीव करून देतात, त्याच वेळेस आपल्या वजनाविषयीची तिची जाणीव बदलू लागते. कॉलेजमध्ये असताना आपले जाड-बारीक असणे मुलींच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरू लागते. त्यातूनच डाएट, जीम असे सगळे प्रकार सुरू होतात.
स्थूलत्व तपासण्याचे वेगवेगळे दंडक आहेत. बॉडी मास इंडेक्स (बीएमआय), वेस्ट टू हीप रेशो आणि शरीरातील चरबीचे प्रमाण हे त्यातील काही. यांचा वापर करून मुली आणि स्त्रिया पुन:पुन्हा आपण स्थूल आहोत हे मनाला सांगू लागतात आणि त्याचा त्यांच्या मानसिकतेवर खूप परिणाम होतो. विशेषत: तरुण मुलींमध्ये स्थूलपणाच्या भावनेमुळे आत्मविश्वास कमी होतो, स्वत:विषयी प्रेम वाटत नाही. कपडे निवडताना, चालताना, कोणतेही शारीरिक काम करताना आपण कसे स्थूल दिसतो याचाच सतत मनात विचार सुरू होतो. कधी कधी यातून एकटेपण येते, इतरांमध्ये मिसळणे कठीण होते. आपल्याच नजरेतून आपण अशा प्रकारे उतरलो की मन उदास होते, निराश होते. क्वचित प्रसंगी जीवनही नकोसे होते.
आपण स्थूल होऊ ही भीती सतत मनात बाळगणे, त्यासाठी नको तेवढी उपासमार करणे, कधी पुरेसे खाल्ले तर अत्यंत अपराधी वाटणे आणि मुद्दाम उलटय़ा करून खाल्लेले सर्व बाहेर टाकून देणे असा अ‍ॅनोरेक्सिआ नव्हरेसा (Anorexia nervosa) नावाचा मानसिक विकार आढळतो. त्याच प्रमाणे काही तरुण मुलींमध्ये बुलिमिआ नव्हरेसा (Bulimia nervosa) हा मानसिक विकार दिसून येतो. यात एखाद्या वेळेस अति खाणे, मग त्याविषयी अपराधीपणाची भावना निर्माण होणे, मग रेचके वापरणे असे दिसून येते.
आपल्या वजनाविषयी अशी जाणीव झाली की ते कमी करण्याचे सर्व प्रयत्न सुरू होतात. डाएट सुरू होते. खाण्यावर र्निबध येतात. आपल्या चवीढवी दूर ठेवून सांगितल्याप्रमाणे खाऊन किंवा न खाऊन वजन कमी करण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी आटापिटा केला जातो.
अनेक स्त्री-पुरुष आपल्या उंचीला योग्य अशा वजनापर्यंत पोचण्याचा सतत प्रयत्न करत असतात. वजन त्या कक्षेच्या थोडेसे जरी बाहेर गेले तरी अस्वस्थ होतात. सातत्याने डाएट करण्यातून अनेक शारीरिक आणि मानसिक परिणाम होतात. शरीरातील अंत:स्रावांवर परिणाम होतो. त्यामुळे स्त्रियांच्या पाळीवर परिणाम होऊ शकतो. हृदयावर परिणाम होऊ शकतो, हाडे ठिसूळ होतात. शरीराची एकूण क्षमता कमी होते. अ‍ॅनिमिया होतो.
वजन कमी होऊ लागले की अर्थातच आनंद होतो. लोकही कौतुक करू लागतात, मित्र-मैत्रिणींमध्ये आपले स्थान उंचावते. आपण सुखावतो. आपल्यालाही हलके आणि चपळ वाटते. आपला आत्मसन्मान वाढतो, आत्मविश्वास वाढतो. वजन कमी केले की असे अनेक चांगले परिणाम होतात. पण मग आपण डाएट थांबवतो. लक्षात येते की थोडय़ाच काळात आपण खूप खायला लागलो आहोत. कधी कधी रात्री-अपरात्रीसुद्धा! अनेक गोड आणि तेलकट पदार्थ खायला आपल्याला आवडते आहे. आपले वजन पुन्हा वाढू लागते. पुन्हा मनात निराशा निर्माण होते आणि पुन्हा नवीन डाएट करण्याच्या आपण मागे लागतो. कमी खाणारे लोक सतत खाण्याच्या वस्तूंचा, विविध पाक कृतींचा विचार करताना आढळतात. त्यांच्या चर्चेतही ‘खाणे’, ‘हेल्दी फूड्स’, ‘डाएट फूड’ हा प्रमुख विषय बनतो. फावल्या वेळात टीव्ही बघताना , इंटरनेटवर याच विषयाची माहिती घेणे सुरू असते.
अति कमी खाणाऱ्यांमध्ये उदासीनता, अति चिंता याचे प्रमाण आढळून येते. याबरोबरच अनेकांच्या बाबतीत दिसून येणारी गोष्ट म्हणजे ताणतणाव वाढला की काही लोकांचे खाण्याचे प्रमाण वाढते. विशेषत: सततचा ताण असेल, कामाचा, घरातल्या आजारपणाचा इ. तर त्याचा सामना करण्याचा एक उपाय म्हणजे अक्षरश: खात सुटणे. अशा वेळेस गोड, तेलकट अशा गोष्टी खाल्ल्या जातात आणि त्याही प्रमाणाबाहेर. अशा काळात वजन अचानक वाढू लागते. तणावाच्या परिस्थितीत शरीरातल्या अंत:स्रावांमध्ये होणाऱ्या बदलांमुळे खायची इच्छा होते आणि ताणतणावांवरचा उपाय म्हणून त्याचा वापर केला जातो.
याचा अर्थ स्थूल व्यक्तींनी वजन कमीच करायचे नाही की काय?
अर्थातच असे नाही. पण स्थूलपणाची कारणे काय आहेत हे महत्त्वाचे. एखाद्या कुटुंबात सगळेच स्थूल असतात. आनुवंशिक गुणधर्मच तो. अशा व्यक्तीने वजन कमी करताना लक्ष्य निश्चित करताना वास्तववादी असले पाहिजे. वातावरणातील अनेक घटक उदा. कामाचे स्वरूप, खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली या सगळ्याचा विचार केला गेला पाहिजे. कामाच्या जागी अनेक मीटिंग्ज, त्यात उत्तम प्रतीचे खाणे आणि ‘पिणे’सुद्धा असले की आपोआप वजन वाढीस लागते. दिवसभर केवळ बसून काम आणि शरीराची काहीच हालचाल नाही असे असेल तर वजन नक्कीच वाढते. हृदयाचे विकार, अतिरक्तदाब, मधुमेह असे विकार होऊ नयेत यासाठी किंवा झाल्यावर स्थूलपणा कमी करावा लागतो. संधिवात टाळण्यासाठीही वजन नियंत्रणात असावे लागते.
या सगळ्यासाठी आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींमध्ये कायमस्वरूपी बदल घडवणे आवश्यक असते. उदा. तेलकट पदार्थ रोजच्या जेवणात नसणे. त्याचबरोबर आपल्या पोषणासाठी आवश्यक सर्व खाणेही गरजेचे. केवळ खाणेपिणे नियंत्रणात असून पुरेसे नाही. व्यायाम, शारीरिक हालचाल यांचाही विचार महत्त्वाचा. ताणतणाव कमी करण्यासाठी मित्र-मैत्रिणीकडे मन मोकळे करणे, फिरायला जाणे, छंद जोपासणे, योग, प्राणायाम, ध्यान करणे या सगळ्यांचा उपयोग होतो.
डॉ. जान्हवी केदारे response.lokprabha@expressindia.com

Womens health Which blood type is required for marriage
स्त्री आरोग्य : लग्नाच्या होकारासाठी रक्तगट कोणता हवा?
lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
Kitchen jugad video wash clothes with green chilli apply on cloth
Kitchen Jugaad Video: साबणाऐवजी हिरव्या मिरचीने धुवा कपडे; विचित्र उपायाचा चमत्कारिक परिणाम
Use This Epsom Salt Looking Like Rice For Flower Plants Anant Mogra Jaswandi
Video: तांदळासारखी दिसणारी ‘ही’ वस्तू वापरून फुलवा अनंताच्या रोपाची शोभा; भरपूर कळ्यांनी सजेल कुंडी