तसं म्हटलं तर जगात दोनच प्रकारची माणसं असतात. एक म्हणजे मांजर हा प्राणी प्रचंड आवडणारे आणि दुसरे म्हणजे मांजर अजिबात न आवडणारे. मांजर आवडणाऱ्यांसाठी मांर्जारपुराण हा कधीही न संपणारा विषय असतो. एखाद्या पाळीव प्राण्याविषयी लेख लिहावा, असं वाटल्यावर पहिला विचार मनात आला, की पुलंनी तर आपली मोठी गोची करून ठेवली आहे. कारण पाळीव प्राण्याविषयी लिहिताना त्याच्याविषयीचं कौतुक ओघानं आलंच. ‘मी आणि माझे हितशत्रू’मध्ये पुलंनी पाळीव प्राण्यांचे कौतुक करणाऱ्यांवर असे काही मार्मिक विनोद केले आहेत, की हे नक्की आपल्याविषयीच आहे, असं प्रत्येक प्राणिप्रेमीला वाटावं. पण लिहायला घेताच लक्षात आलं की, हा तर दुहेरी आनंद आहे. एकीकडे आपल्या आवडत्या विषयावर लिहिण्याचा आनंद तर त्याचवेळी स्वत:च्याच प्राणिप्रेमाकडे तटस्थपणे बघत स्वत:वरच हसण्याची मजा. उत्क्रांतीच्या ओघात माणसाची बुद्धी वाढायला लागली, तशी त्यानं जमतील ते प्राणी स्वत:च्या फायद्यासाठी आपलेसे करायला सुरुवात केली. वाघ-सिंह वगैरे प्राण्यांच्या वाऱ्यालाही उभं न राहण्यातच शहाणपण होतं. मग इतर प्राण्यांचा विचार केला गेला. गाय मुळातच गरीब प्राणी आणि पौष्टिक असं दूध देते. बैल- हा तुलनेत बुद्धीनं कमी पण ओझ्यासाठी उत्तम. पुढे घोडा, कुत्रा, शेळ्या, कोंबडी, कबुतर असे प्राणी-पक्षी पाळले जाऊ लागले. आता या सगळ्या प्राण्यांमध्ये पाळले जाऊ शकण्यासाठी आवश्यक असे गुण महत्त्वाचे होते. पण याच गोष्टी नको त्या ठिकाणी अगदी व्यस्त प्रमाणात असणारा प्राणी- मांजर- पाळीव प्राण्यांमध्ये कसा समाविष्ट झाला हे एक मोठं कोडं आहे. ‘माणूस मांजर पाळतो तरी का’ या प्रश्नावर विचार करायला लागलो. तेव्हा अचानक एक मुद्दा मनात आला. बघा पटतो का- माणसाला मांजर आवडण्याचं कारण म्हणजे आपल्या आणि त्यांच्यातलं साम्य. उदाहरणार्थ, पिल्लांचं संगोपन करणं आणि त्यांच्या रक्षणासाठी सतर्क असणं या गुणविशेषांसोबतच स्वत:च्या दिसण्याविषयी सदैव जागरूक असणं, वाजवीपेक्षा जास्त चौकसपणा आणि समोरच्याची आगळीक झाल्यास सत्वर फिस्कारणं या बाबतींत मांजरं आणि मनुष्यांतली मादी जमात साम्य दर्शविते. तर कायम अस्ताव्यस्त राहणे, फावला वेळ केवळ लोळण्यात घालविणे, येता-जाता विनाकारण पिल्लांवर डाफरणे आणि कायम मादीला टरकून राहणे यांत दोन्ही प्राण्यांच्या नरांमध्ये विलक्षण साधम्र्य आहे. आता हे पहिल्यापासूनच असं होतं, की माणसाच्या निकट सहवासानं मांजरं आपणहूनच शिकली, ते पुरेशा अभ्यासानंतरच समजेल. मांजराचा उपयोग काय, असं विचारलं तर शेंबडं पोरही सांगेल की उंदीर पकडण्यासाठी. पूर्वी जेव्हा सगळं जगच बहुतांशी शेतीवर चाले तेव्हा धान्य वाचविण्यासाठी उंदीरनामक चेराच्या पाळतीवर मांजरनामक पोलिसाची योजना करणं तर्कसंगत होतं. मांजर उंदीर पकडतं, हेही कबूल. पण एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. वरच्या यादीतले इतर सगळे प्राणी का, तर शिकवल्यावर सांगाल तसे वागतात किंवा ढकलाल तिकडे जातात. टाच मारल्यावर घोडा धावायला लागतो, मालकानं ‘छू!’ म्हटल्यावर पुढला-मागला विचार न करता कुत्रा कोणाच्याही अंगावर धावून जायला तयार. किंवा शिपटीनं मारल्यावर गाढवं- बैल सांगाल तिथे वळतात. पण ‘तो बघ उंदीर, पकड!’ म्हटल्यावर (अगदी ‘गो, कॅच द रॅट!’ असं इंग्रजीत सांगितलं तरी) मांजर उंदीर पकडेल, असा कुणाचा समज असेल तर तो अगदी चुकीचा आहे. कारण मांजर एखादी गोष्ट करेल तर ती केवळ स्वत:च्या मूडप्रमाणे. परत असं आहे, की एकदा पाळलंय म्हटल्यावर तुम्ही त्याला एरवी खायला-प्यायला देणार. मग भरल्या पोटी त्यानं उंदीर पकडावा अशी अपेक्षा केली, की ‘प्राणी माणसांसारखे नसतात. भूक लागली तरच शिकार करतात. उगाच गंमत म्हणून नाही.’ असा मुद्दा तोंडावर फेकला जातो आणि झोप चाळवल्याबद्दल त्रस्त नजरेनं आपल्याकडे पाहून मांजर परत झोपी जातं. तर असा हा मनस्वी प्राणी. स्वत:वर प्रेम करणारा. आत्ममग्न. पुलंनीच कुठे म्हटलं आहे की, कोणतीही व्यक्ती सर्वात सुंदर कधी दिसते, तर ती स्वत:तच गुंग झालेली असते तेव्हा. मांजर कायम स्वत:च्या जगात धुंद असते. प्रेमाच्या माणसाला पाहिल्यावर कुत्र्याला आनंद होतो आणि कुठलाही आडपडदा न ठेवता तो ते दर्शवितो, म्हणून तो आपल्याला आवडतो. पण त्याचसोबत कुत्र्याचं दुसरं वैशिष्टय़ म्हणजे समर्पणभाव. त्यानं स्वत:ला माणसाच्या पायांवर वाहिलेलं असतं. त्यामुळे पाळलेल्या कुत्र्याचा नेहमी एक ‘मालक’ असतो. मांजराविषयी जर ‘हे माझ्या मालकीचं आहे,’ असं सांगणारा कोणी भेटला तर तो एक खोटारडा माणूस आहे असं समजा. कारण आपली मालकी इतर कोणाला लिहून देणं मांजराच्या स्वभावातच नाही. एकमेकांना समान वागणूक देण्याच्या करारावर सह्या घेऊनच मांजर घरात पाऊल टाकतं. नातेसंबंध कामय बरोबरीचे. तुमच्याकडून दूध मिळविण्यासाठी ते गरजेप्रमाणे पायांत घोटाळेल. पण त्या वेळी जे अखंड ‘म्यांव- म्यांव’ चालू असतं ते मात्र ‘मला दूध देणं हे तुमचं कर्तव्य आहे आणि ते तुम्ही विनाविलंब पार पाडा’ अशा आविर्भावात. पण त्याचबरोबर मांजर तुम्हालाही योग्य तो बरोबरीचा मान देतं. कुत्र्याला खेळायचं असेल किंवा पोट खाजवून घ्यायचं असेल तर तो लहान मुलासारखा हट्ट करतो. कुत्राच काय, एक-दोनदा मानेला खाजवलं की एखादी गायही सारखी तुमच्या जवळ येत राहते. मांजर मात्र आपली मर्यादा (किंवा आजच्या भाषेत तुमची ‘स्पेस’) जपून असतं. थंडीत उबेसाठी तुम्हाला चिकटून बसायला येईलही कधी, पण बाजूला सारलंत तर यायचा आग्रह काही धरणार नाही. म्हणूनच असं स्वत:वर प्रेम करणारं आणि ठामपणे बरोबरीच्या नात्यानं वागणारं मांजर माणसाला आवडत असावं असं मला वाटतं. इतर पाळीव प्राणी आणि मांजर यांत अजून एक फरक आहे. काहींना गुरांजवळ जायला, त्यांना गोंजारायला आवडतं तर काहींना घाण वाटते. काहींना कुत्रे आवडतात तर काहींना त्यांची भीती वाटते, तर काही जण या प्राण्यांविषयी तटस्थ असतात. मांजरांच्या बाबतीत मात्र अशी तटस्थता बाळगणारे तसे नसावेतच. मांजर आवडणारे त्यांना डोक्यावर घेऊन नाचतील, पण उर्वरित जनतेत मात्र मांजराविषयी राग, संताप, तिरस्कार अशाच भावना जास्त दिसतात. कायम दोन टोकं. ‘मांजर मारल्यास काशीला जाऊन सोन्याचं मांजर गंगेत सोडावं लागतं,’ अशी मेख फार पूर्वी कुणा चतुर मांजरप्रेमीनं मारून ठेवली आहे म्हणून, नाही तर मांजर न आवडणारांनी नावलाही हा प्राणी शाबूत ठेवला नसता. आणि तो मांजरप्रेमी किती हुशार होता पाहा. मुद्दा सोन्याचाच मांडल्यामुळे आपल्या दागिन्यांसाठी वापरलं जाऊ शकणारं सोनं नवऱ्यानं गंगेत सोडलं तर बायकोचा जो रोष ओढवेल त्यापेक्षा कितीही संताप झाला तरी मांजराचा जीव न घेण्याचा संयम कोणीही पाळेलच. आता मांजराविषयी लिहिण्याचा एवढा आटापिटा करणारी व्यक्ती कुठल्या गटात मोडते हे सांगायची गरज नाही. आम्ही मांजरप्रेमी. तसं पाहिलं, तर आई-वडील आणि मोठी भावंडं यांच्या खालोखाल मला कोणी सांभाळलं तर मांजरांनीच. म्हणजे असं, की अगदी दोन-तीन वर्षांचा असताना घरात इतर कोणी मोठं नसलं तर आई मला पलंगावर मांजरांसोबत बसवायची आणि सगळी घरकामं उरकायची. मांजरांना गोंजारत आणि त्यांच्याशी खेळत मी तास-तास बसायचो. म्हणूनच कदाचित मांजर या प्राण्याशी कायमची गट्टी जमली. मी अगदी कॉलेजला जाईपर्यंत आम्ही तळमजल्यावर राहायचो. मांजर आवडणारांसाठी तळमजला म्हणजे नंदनवन. आपल्या मर्जीप्रमाणे मांजरं खिडकीतून ये-जा करू शकतात. त्यामुळं कुणासाठी कुणाला अडायला होत नाही. तळमजल्यावरच्या त्या घरात मांजरांच्या अक्षरश: पिढय़ान् पिढय़ा नांदल्या. बहुतेक करून दोन-तीन माजरं घरात असायचीच. आणि जणू कुणी आमचा पत्ता लिहून दिल्यासारखं कधी एखादं आईवेगळं छोटं पिल्लू दारात येऊन ‘म्यांव-म्यांव’ करत बसलेलं असायचं. असं आपणहून आलेलं पिल्लू घालवून लावणं अशक्यच. मग आठवडाभरात तेही घरचंच होऊन जायचं. घरात मांजराची छोटी पिल्लं असली की गोकुळच नांदायचं. शाळेत जायच्या वयाचा असताना, आता काही दिवसांनी घरची मादी पिल्लं घालणार, असं समजलं की मनात उकळ्या फुटायला लागयच्या. मग त्या मनीची सरबराई चालू. एकाच घरात वर्षांनुर्वष राहूनसुद्धा अशा अवस्थेत मनी पिल्लांना ठेवण्यासाठी योग्य जागा घरात नव्याने शोधायला लागायची. आणि मग काही आठवडय़ांनी कधी तरी रात्रीत तिनं पिल्लं घातलेली असायची. सकाळी उठल्या-उठल्या ही बातमी कळल्यापासून ते किती पिल्लं आहेत, कुठल्या रंगाची आहेत हे पाहीपर्यंत धीर काही निघायचा नाही. डोळे बंद असलेले, जेमतेम केस असलेले, अंगला हातापायांच्या काडय़ा जोडलेले ते छोटूसे गोळे उचलून तळहातावर घेताना आणि त्यांच्या शरीराचा कढतपणा अनुभवताना इतका आनंद व्हायचा! मनीसुद्धा घरचीच असल्यामुळे तिच्या पुढय़ातून पिल्लं उचलून घेतली तरी अगदी नि:शंक असायची. आमच्याकडे एक जुनं मोठ्ठं अॅल्युमिनिअमचं पातेलं होतं. तळाला भोक पडल्यामुळे निकामी झालेलं. वर्षांनुर्वष हे पातेलं म्हणजे घरच्या या बाळंतिणीची खोली. पातेल्यात जुनी मऊ फडकी टाकून त्यात पिल्लांसोबत मनीला हलवलं जायचं. त्यावर एक दणकट पाट थोडी फट ठेवून झाकणासारखा ठेवला जायच. या पातेल्याची जागा आत झोपायच्या खोलीत. दिवसभर मनी जास्त करून पिल्लांजवळच असायची. आणि नसली, तरी त्यांच्यावर लक्ष ठेवायला कोण ना कोण घरी असायचंच. पण रात्री मात्र सगळे झोपलेले असताना मनी थोडा वेळ जरी बाहेर पडली तर पिल्लांच्या मागावर बोका येण्याचा धोका. म्हणून मग रात्री झोपायच्या खोलीची दारं-खिडक्या बंद ठेवून आम्ही मनीला सरळ बाहेर सोडायचो. आणि थोडीशी भावनेलाच हात घालणारी एक गोष्ट मला कायम वाटत आलेली आहे ती म्हणजे सगळ्या माद्या पिल्लांना पूर्णपणे आमच्या भरवशावर सोडून दारं-खिडक्या बंद करायला घेतल्यावर अगदी नि:शंकपणे बाहेर पडायच्या आणि रात्रभर भटकून एकदम सकाळीच काय ते परतायच्या. एका पशूनं ठेवलेला हा विश्वास, तोही पिल्लांच्या बाबतीत, मला नेहमी कोडय़ात टाकतो. अंगावर पिणारी पिल्लं असणाऱ्या माद्यांच्या वागण्यात त्या काळात झालेला बदलही अगदी जाणवण्यासारखा असतो. गर्भार असल्यापासूनच तो दिसायला लागतो. एरवी आपल्यापासून चार हात लांब राहणं पसंत करणारी मादीही गर्भारपणात आपल्या जवळ येऊन अंगाला चिकटून बसते. क्वचित् आपल्या हाताला चाटतेसुद्धा आणि अगदी थक्क करणारी गोष्ट म्हणजे आपण तिची पिल्लं पाहिल्यावर तिला होणारा आनंद. तीन-चार वर्षांपूर्वी आमची सध्याची मनी नुकतीच घरी यायला लागली होती. गर्भार होती. काही दिवसांनी अचानक गायब होऊन आठवडाभरात आली तेव्हा मोकळी झालेली होती. दिलेलं दूध पिऊन झाल्यावर उघडय़ा दारापर्यंत जाऊन मागे फिरली. परत जिन्यापर्यंत जाई आणि मागं आमच्याकडे येई. चार-पाच वेळा असं झाल्यावर मुलीला म्हटलं, ‘मनी बोलावतेय आपल्याला!’ आम्ही दाराशी उभे होतो तोपर्यंत तिचं घुटमळणं चालूच होतं. पण चपला घालून दाराबाहेर पडलो तेव्हा तिला समजलं आणि धावत जिना उतरून आमची वाट बघत उभी राहिली. पुढे असंच आम्ही येत आहोत याची खात्री करत ती आम्हाला बाजूच्या इमारतीत घेऊन गेली. विजेच्या मीटरजवळ एका छोटय़ा हौदासारख्या कोनाडय़ात आम्ही डोकावून पिल्लांना पाहिलं, तेव्हाचे तिच्या चेहऱ्यावरचे भाव शब्दात वर्णन करणं अशक्य. हातात पिल्लं उंचावून ‘ही बघा माझी पिल्लं!’ असं म्हणणंच काय ते तिनं बाकी ठेवलं होतं. लहानपणी तळमजल्यावरच्या त्या घरात मनीनं पिल्लं घातली की पुढला महिनाभर तरी मनात दुसरा विषय नसायचा. अभ्यास करायचा तोही त्या पातेल्याजवळ बसूनच. आणि अभ्यास झाला, की काय करायचं, काय खेळायचं हा प्रश्नच नाही. आठवडाभरानं पिल्लांचे डोळे उघडले की खरी धमाल चालू. अजून काही दिवसांनी मग ती पिल्लं आपल्याला ओळखायला लागतात. अंगावर बागडतात. अजून थोडी मोठी झाली, की दोरीच्या टोकाला कागद बांधून त्यांच्याशी खेळ. दोन-तीन महिन्यांची पिल्लं तर घरभर हैदोस घालातात. गोकुळच ते. या असंख्य मांजरांच्या असंख्य तऱ्हा. कधी एखाद्याच्या दोन डोळ्यांचे वेगळे रंग- एक निळा, एक हिरवा. एकाचा तर बिचाऱ्याचा एक हातच अधूनमधून निखळायचा. एरवी अगदी नॉर्मल. दुसऱ्या एकाला अधूनमधून फिट्स यायच्या. फिट्स. पहिल्यांदा हे झालं ते नशिबानं रात्री उशिरा. मलूलपणे दिवसभर कोपऱ्यात बसलेलं. संध्याकाळनंतर कंडिशन सीरियस. काही वेळानं पाहिलं तर शरीर ताठ झालेलं, थंड पडलेलं आणि निश्चल अगदी श्वसनाचीही हालचाल नाही. आम्हाला सगळ्यांना वाटलं की, हे गेलं. सगळेच उदासपणे त्याच्याजवळ थोडा वेळ बसलो. माझ्या डोळ्यात पाणी, खूप उशीर झालेला असल्यानं ठरवलं, की उद्या सकाळी काय ते करू. तशाच मन:स्थितीत सगळे झोपलो. पण सकाळी उठून पाहतो तर साहेब ताजेतवाने आणि स्वयंपाक घरात दुधासाठी हजर! काही मांजरांच्या हुशारीची चुणूकही आपल्याला चकित करून जाते. साधारणपणे कुत्रा मांजरांपेक्षा जास्त हुशार समजला जातो. पण मला तरी वाटतं, की मांजरं कुत्र्यापेक्षा काही कमी हुशार नसतात. माझ्या मावशीकडचं उदाहरण. त्यांचंही सगळं कुटुंब मांजरप्रेमी. तळमजल्यावरचं जुनं घरं सोडून नवीन घरात पहिल्या मजल्यावर राहायला गेलो तरी घरात मांजरांचा वावर चालूच. तर त्यांच्याकडचं एक मांजर घरात यायचं असेल, तेव्हा मुख्य दरवाजाचा स्टॉपर पाडून आवाज करायचं. मग त्यानं अशी ‘बेल’ वाजवली, की आपण आतून दार उघडायचं. आणि स्टॉपर पुढल्या सेवेसाठी वर करून ठेवायचा. पुन्हा जर त्याला बाहेर जायचं असेल आणि दिवाणखाण्यात कोणी नसेल, तर ते मुख्य दरवाजाची आतली कडी उडी मारून वाजवायचं. मग आपण दार उघडून द्यायचं. न शिकवता त्यानं आपणहूनच शोधून काढलेल्या या युक्त्या. आमच्या सध्याच्या मनीचं पिल्लूही असंच तल्लख. कुल्फी त्याचं नाव. ज्या मांजरांची बुद्धी जास्त असते, ती त्यांच्या नजरेतूनही जाणवते. आणि मला वाटतं, अशी हुशार मांजरं आपल्याशीही एक वेगळाच ‘संवाद’ साधून असतात. त्यांच्या डोळ्यांत समज दिसते. माझी मुलगी जेव्हा कुल्फीशी लाडात बोलायची, तेव्हा ती बोलत असताना अखंडपणे तो तिच्या डोळ्यात डोळे घालून बसत असायचा. एरवीही त्याच्या जवळ बसून आम्ही काही करत असलो की तो ती गोष्ट इतक्या लक्षपूर्वक पाहत राहायचा, की मध्येच ‘हे काय आहे?’ किंवा ‘याला काय म्हणतात?’ असं विचारेल की काय असं वाटावं. खेळायला कागदाचा बोळा जमिनीवर टाकल्यावर दोन-चारदा पंजांनी तो इकडे तिकडे उडवून पुन्हा टाकण्यासाठी कुत्र्याप्रमाणं तो बोळा तोंडात धरून आपल्या पुढय़ात आणून ठेवणारं मी पाहिलेलं हे एकमेव मांजर. असा हा हुशार, उमदा आणि स्वच्छंदी जीव मात्र काही धादांत खोटय़ा आरोपांचा विनाकारण धनी झाला आहे. मांजरांवर घेतला जाणारा सगळ्यात मोठा आळ म्हणजे एकजात सगळी मांजरं चोरून दूध पितात. अगदी नामंजूर. कडधान्यात गणंग आणि माणसांत भणंग कधमधी निघतात, पण म्हणून सगळ्या धान्याला गणंग आणि माणूस म्हणजे भणंग असं आपण म्हणतो का? नाही! आता माणसांत जसं ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ म्हटलं जातं, तसं मांजरांतही ‘शेपटी तितक्या प्रकृती’ असा वाक् प्रचार आहे. उदाहरण द्यायचं झालं तर एक आमचा ‘पिल्या’ (मोठा पिल्या, धाकटा नव्हे). कुणाच्या अध्यात ना मध्यात. त्याच्या शांत- विरक्त स्वभावामुळे आम्ही त्याला ‘महंत’ म्हणायचो. पण खरं सांगू का? तो होता मुलखाचा बावळट. अगदी शुंभ! पण निरुपद्रवी, आणि याउलट तो लाल्या! गुंड होता तो, गुंड! खरं तर घरातच लहानाचा मोठा झालेला. इतरांसारखंच त्यालाही घरात खायला-प्यायला मिळायचं. पण त्याची वृत्तीच चोराची होती. अख्ख्या चाळीत सगळ्यांच्या घरातलं दूध मटकवायचा. उच्छाद मांडला होता. आमच्याकडे स्वयंपाकघरात ओटय़ालागत डोक्याच्या उंचीला भिंतीतलं दुभत्याचं कपाट होतं. नेहमीसारखे त्याला जाळीचे दोन छोटे दरवाजे होते. तर हा लाल्या ओटय़ावर दोन पायांवर उभा राहून नखांनी ते जाळीचं दार उघडायचा आणि तिथलंही दूध प्यायचा. मग त्याच्यापासून दूध वाचवण्यासाठी त्या कपाटाला छोटा कडी-कोयंडा करून त्यात एक चमचा कुलपासारखा घालून ठेवायला लागलो. तरी अधूनमधून लक्ष नसताना त्याची धाड पडायचीच. अंगानंही चांगला दणकट होता तो. मोठं हाड आणि अंग अगदी ठासून भरल्यासारखं टणक. पंजाही असला मोठा, की दुसऱ्या मांजराला एक डावली लगावली तर ते दूधही मागणार नाही. सराईत चोरांसारखा तो निसटून जाण्यातही पटाईत होता, क्वचित् कधी हाती लागला तर आम्ही हातानं बदड बदड बदडायचो. अशा वेळी तो आपलं अंग जमिनीला पूर्ण टेकवून, मान मुडपून, घट्ट दबून राहायचा आणि मार खायचा. शेवटी आमच्याच हाताला झिणझिण्या यायच्या. लाल्याला मात्र काहीसुद्धा झालेलं नसायचं. एक दिवस असंच पहिल्या मजल्यावरच्या घरात चोरी करून पळताना तो खिडकीतून बाहेर धडपडला आणि वळचणीच्या पत्र्यावर आदळला. धडाम्कन मोठा आवाज आला. अख्ख्या चाळीत लाल्या धुमाकूळ घालत असल्यामुळे सगळय़ांचाच त्याच्यावर राग. त्यामुळे त्याची अशी फजिती झालेली पाहून समोरच्या जख्ख म्हाताऱ्या मावशी कवळी दाखवत अंगात आल्यासारख्या हसत सुटल्या, त्या थांबेचनात. आता म्हातारीला काही होईल की काय अशी काळजी वाटायला लागली. लाल्याला मात्र काहीसुद्धा झालेलं नव्हतं. ज्या बाजूवर पडला, तिथे एकदा चाटून त्यानं ‘तुला नंतर बघून घेईन’ असा मावशींवर गुंडसुलभ कटाक्ष टाकला आणि आपल्या मार्गानं चालता झाला. मग कुणा गुंडाविषयीची सनसनीखेज बातमी जशी चघळली जाते, तसा पुढले दोन दिवस चाळीत हा किस्सा एकमेकांना टाळय़ा देत चघळला गेला. एखाद्या शहरात कुठल्या ‘भाई’ची जशी सद्दी असते तशी त्या काळी आमच्या चाळीत लाल्याची दहशत होती. पण लाल्याचा एक अपवाद सोडला, तर इतर कुठल्याही पाळलेल्या मांजरानं घरात कधी चोरी केली नाही. सगळय़ांना अगदी स्वयंपाकघरापर्यंत मुक्त प्रवेश असायचा. थंडीच्या दिवसांत कधी कधी ती गॅसशेगडीखालीसुद्धा उबेसाठी झोपायची, पण त्याच शेगडीवरच्या दुधाच्या भांडय़ाला कोणी नाकसुद्धा कधी लावलं नाही. या सगळय़ा मांजरांमध्ये आमची दुसरी मनी अगदी लक्षात राहण्यासारखी. दिसायला फार सुंदर होती ती. पांढऱ्या शुभ्र अंगावर काही लालसर ठिपके. केस अगदी सशासारखे मऊ आणि नेहमी कमालीची स्वच्छ. खानदानी दिसायची. वजनानं तर इतकी हलकी होती, की उचलल्यावर वाटावं हातात कापूस धरलाय. तशीच स्वभावानं शांत आणि अतिशय समंजस. उचलून मांडीवर घेतलं तर छान बसून राहणार. बाजूला बसवलं तरी मजेत तिथेच बसून राहणार अगदी गुणी मांजर. हिचा एक गमतीशीर खेळ होता. कोचावर झोपून असली आणि आपण हाक मारली, की ती हाकेच्या आवाजाप्रमाणे शेपूट हलवायची. ‘मऽऽनी’ अशी हलक्या आवाजात हाक मारली की अगदी हळूहळू शेपटी हलवायची. जरा मोठय़ानं ‘मनी’ म्हटलं की शेपटीचा वेगही वाढायचा. आणि ‘मनी!’ अशी एकदम मोठय़ानं हाक मारली की कोचावर ‘फटाक् फटाक् ’ आवाज येईल अशा वेगानं तिची शेपूट हलायची. परत ‘मऽऽनी’ अशी अलगद हाक मारली की शेपटीचा वेग पुन्हा मंद. तिचा हा खेळ नंद्याही शिकला होता. नंद्या म्हणजे या मनीचा मुलगा. त्या वेळी मनीनं एकच पिल्लू घातलं होतं. नंद्यासुद्धा मनीसारखाच सुंदर होता. पट्टे असलेलं लालसर पिवळट शरीर, अंगानंसुद्धा छान वाढला होता आणि सगळय़ांच्या लाडामुळे पक्का लाडोबा झाला होता, पण खूप प्रेमळ. काही लहान मुलं जशी ‘लाघवी’ असतात तसा लहानपणापासून एकटा असल्यामुळे झोपायलाही कायम आमच्याबरोबर गादीवर. मुलं कुशीत झोपताना जशी आडव्या हाताची उशी करतात, तसा हातावर डोकं ठेवून झोपायचा. नंद्या वर्षभराचा झाल्यावर मनीनं पुन्हा पिल्लं घातली. या वेळी दोन. पिल्लं झाल्या झाल्या दोन-तीन आठवडे नंद्याचा त्यांच्याशी संपर्क आला नव्हता. पण त्यानं पिल्लांना पहिल्यांदा स्वयंपाकघरात जेव्हा पाहिलं तेव्हा मात्र बिथरला. आपल्या खाण्यात आता वाटेकरी आले असं त्याला वाटलं असावं. एकदम संतापला आणि आला तसाच काही न खाता पिलांवर ‘फँ!’ करून तरातरा निघून गेला. पुढले दोन-चार दिवस जेमतेम घरी यायचा आणि खाणं झालं की निघून जायचा. त्यानंतर मग निवळत गेला. घरी परत जास्त वेळ थांबायला लागला. हळूहळू पिल्लं आसपास असली तरी चालवून घेऊ लागला. पिल्लांचीही भीती जशी चेपत गेली, तशी तीही आता त्याच्या जवळ जायची. आणि दहा-एक दिवसांतच चित्रं असं पालटलं, की पिल्लं चक्क त्याच्या कुशीत किंवा अगदी अंगावरही झोपायला लागली. माझी बारावीची परीक्षा झाली तेव्हा आम्ही तळमजल्यावरचं ते भाडय़ाचं घर सोडून दुसरीकडे राहायला गेलो. त्याच सुमारास घरात एक आजारपण निघाल्यामुळे सगळय़ांची जरा धावपळ चालू होती. जुनं घर रात्री बंद ठेवायला नको म्हणून मी जेवून उशिरानं तिकडे झोपायला जायचो. आणि सकाळी लवकर बाहेर पडायचो. राहतं घर नसल्यामुळे मांजरांचीही थोडी आबाळच होत होती. म्हणून एक वेळचं का होईना, रात्री जाताना त्यांच्यासाठी दूध आणि खाणं घेऊन जायचो. नंद्या रोज रात्री झोपायला यायचा. पण मधेच आठ- दहा दिवस अचानक गायब झाला. एक दिवस सकाळी निघायच्या घाईत असताना मला तो खिडकीतून पलीकडे थोडा लंगडत जाताना दिसला. अगदी वाळला होता. काळजी वाटली, पण मला निघणं भाग होतं. ताटलीत दूध-खाणं ठेवून मी निघालो. पुन्हा पुढे चार दिवस तो गायब. आणि मग एका रात्री उशिरानं त्या घरी झोपायला गेलो तेव्हा तो दारातच पडलेला दिसला. त्याला पाहून काळीज हललं. पार सापळा झाला होता. खोल आत गेलेले डोळे आणि एका पायाला असली जखम झालेली की तळव्यापासून वर दोन-तीन इंच नुसतीच काडय़ांसारखी उघडी हाडं दिसत होती. अगदी काहीच दिवसांपूर्वीपर्यंत उमदा असलेल्या नंद्याची ती अवस्था बघवेना. मध्यंतरी काय झालं कुणास ठाऊक. त्याच्या अंगात जीव होता पण जेमतेम. दाराच्या बाजूला कोपऱ्यात एक पोतेरं अंथरलं आणि त्यावर नंद्याला अलगद झोपवलं. दूध तोंडाजवळ धरलं, पण त्याच्यात ते पिण्याचंच काय, वास घेण्याचंही त्राण नव्हतं आणि इच्छाच राहिली नसावी. नळाचं थोडं पाणी ओंजळीत घेतलं आणि त्याच्या तोंडात दोन थेंब घातले. जेमतेम जीभ लावल्यासारखं केले त्यानं. मला समजून चुकलं, की बहुतेक हा आता एका रात्रीचाच पाहुणा. किती तरी वेळ त्याच्या शेजारी सुन्नपणे बसून राहिलो. घसा दाटून आला होता. त्याच्या डोक्यावरून अलगद बोटं फिरवताना कापत्या आवाजात ‘नंद्या’ म्हटलं, तेव्हा त्या मरणासन्न अवस्थेतही त्यानं जुन्या सवयीप्रमाणे शेपटी हालवली! आतापर्यंत डोळय़ांत भरून राहिलेले अश्रू ओघळले आणि टिपं नंद्याच्या अंगावर पडली. असाच उशिरा कधी तरी मी झोपलो. सकाळी उठून पाहिलं, तेव्हा नंद्या गेला होता. इतके दिवस कुठे झोपत होता, कुणास ठाऊक, पण बरोबर शेवटच्या रात्री निरोप घेऊन प्राण सोडायला तो घरी आला. अशा अनुभवानंतर मांजर हा मतलबी प्राणी आहे, असं म्हणणं शक्य आहे का? अशा असंख्य वेगवेगळय़ा आठवणींनी मनात कायमचं घर केलं आहे. मांजराशी अगदी घट्ट नातं कायमचं जुळलेलं आहे. आताही ऑफिससाठी सकाळी उठून तोंड धुतल्यावर पहिलं काम म्हणजे दार उघडणं. ‘मनी’ आणि तिचा वर्षांचा मुलगा ‘मिऱ्या’ दारात येऊन बसलेलेच असतात. त्यांना तसं पाहिलं की छान वाटतं. एखाद दिवशी त्यांच्यापैकी कोणी आलं नाही तर चुकल्या चुकल्यासारखं वाटत राहतं. लहानपणापासून आतापर्यंत मांजरांनी खूप आनंद दिला. कधी कळून तर बऱ्याचदा त्यांच्या नकळतच. पण मांजरांचा सगळय़ात मोठा प्रभाव कोणता विचाराल तर त्यांच्यामुळे मनाच्या एका कोपऱ्यातला खिडकीत बाहेर पाय सोडून गंमत बघत बसलेलं माझ्यातलं मूल तसंच लहान राहिलं आहे. या सगळय़ा मांजरांनी मिळून जणू त्याला आपल्या पंजामध्ये लाडानं असं घट्ट धरून ठेवलं आहे, की सोडतच नाहीत. म्हणूनच आजही गर्भार मनी पिल्लं घातल्यावर पहिल्यांदाच घरी येते, तेव्हा तिने आसपास कुठं पिल्लं घातली असतील ते शोधायला माझ्या शाळकरी मुलीसोबत तिच्याच वयाचा होऊन मीही पायात चपला अडकवून जिना उतरतो. प्रसाद निक्ते - response.lokprabha@expressindia.com