‘‘थांब.. थांब.. पॉज कर गाणं.’’ मी मित्राला सांगितलं. ‘‘का रे?’’ मित्राने आश्चर्यानं विचारलं. मी म्हटलं, ‘‘नाही रे शक्य सगळं गाणं एका दमात ऐकणं.. जीव गुदमरतो माझा.’’ लतादीदींचा आवाज.. शब्दफेक.. प्रत्येक सुरामध्ये संपूर्ण सुरेलपणा.. कसं मावणार आपल्या एवढय़ाश्शा हृदयात? आणि मग बा. भ. बोरकरांची ओळ आठवली..

‘सुखानेही असा जीव कासावीस

तरी हा परिस दुरी सारता न ये..’

‘या चिमण्यांनो परत फिरा रे’, ‘भेटी लागी जीवा’, ‘मालवून टाक  दीप’, ‘अवचिता परीमळु’, ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’, ‘श्रावणात घननीळा..’ हे आणि असे अनेक मराठीतले डोंगर आणि हिंदीमधले तर असंख्य डोंगरकडे.. ‘रस्मे उल्फत’, ‘लग जा गले’, ‘दिलवर दिल के प्यारे’, ‘आएगा आनेवाला’, ‘ये कहॉं आ गए हम’पासून ‘लुकाछुपी बहोत हुई’पर्यंत लतादीदींचं  स्वरसाम्राज्य नजरेत, दोन कानांत आणि एका मनात न मावणारंच. त्यांचा सूर ऐकताना कायमच हा अनुभव येतो. सगळी मंडळी मिळून ‘घालीन लोटांगण’ म्हणत असताना ‘हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ म्हणताना क्वचित अशी तंद्री लागते. शाळेत मुलांना आणायला गेल्यावर चार-पाच तासांपूर्वीच भेटलेली मुलं धावत येऊन अशी बिलगतात, की जशी काही वर्षांनी भेटली आहेत- तेव्हासुद्धा छातीत असंच काहीतरी होतं. सुखाने होणारी कासावीशी, हाताची हलकी थरथर, डोळ्यांत जाणवणारा दमटपणा.. सगळंच एका अनोख्या अनुभवातून खूप काही देणारं.

‘सूर स्पर्श, सूर श्रवण

स्वर गंधित आश्वासन..’

या सुधीर मोघेंच्या ओळी स्वरबद्ध करतानाही डोक्यात संदर्भ आले ते दीदींच्या गाण्यांचेच. अगदी लहानपणी डोळे मिटून ‘आता विश्वात्मके देवे’ ऐकताना जाणवलं होतं की, त्या चिमुकल्या जीवाच्या हृदयाची धडधड त्या एका ‘आता’मध्ये शांत झाली.

शांतता म्हणजे काय? दीदींचा स्वर..!

दोन वर्षांपूर्वी दीदींच्या आवाजात बोरकरांची ‘आता विसाव्याचे क्षण’ ही कविता स्वरबद्ध करून ध्वनिमुद्रित करताना त्यांचा ‘आता’ हा शब्द ऐकला आणि खूप र्वष दडवलेल्या अश्रूंनी आपली वाट मोकळी केली.

सगळं पाहिलं.. सुख, दु:ख, फसवणूक, विश्वास, आधार, समज, गैरसमज, चढउतार, प्रेम, विरह, एकटेपणा.. आणि मग येणारा तो ‘आता’ शब्द.. हा दोन अक्षरांत संपूर्ण गोष्ट सांगतो- जेव्हा तो दीदींच्या स्वरात येतो. शब्दांतून अर्थ पोचायलाच हवा; पण शब्दांमधली स्वरांची आस आणि अर्थपूर्ण शांतता यातून सगळं काही सांगतात दीदी.

चित्रकलेशी लहानपणापासून खूप जवळचं नातं नसलं तरी पांढरा रंग किती शुभ्र असू शकतो, तर दीदींनी गायलेल्या ‘मोगरा फुलला’मधल्या मोगऱ्याइतका! ज्ञानेश्वरांचे शब्द रसिकांपर्यंत पोचवताना हृदयनाथजींच्या स्वरप्रतिभेला दीदींचा आवाज भेटला आणि मग-

‘बापरखुमादेवीवरु सहज नीटु झाला

हृदयी नटावला ब्रह्माकारे’

मी तासन् तास त्याच त्याच ओळी ऐकताना बघून चक्रावलेली अनेक माणसं आहेत, पण..

‘विश्वाचे आर्त माझ्या मनी प्रकाशले’मधला ‘प्रकाशले’ ऐका!! वर्षांनुर्वष वाट पाहून त्यानंतरचं उजळणं आणि आयुष्याचं प्रकाशमान होणं- हे सारं त्या एका ‘प्रकाशले’मध्ये आलंय. माझ्यासकट माझ्या पिढीतल्या अनेक रसिकांना माऊलींच्या शब्दांमधील तेज जाणवलं ते दीदींच्या स्वरांमधून.

आणि हाच आवाज जेव्हा ‘मालवून टाक दीप’मधून भेटतो तेव्हा शृंगाररसात चिंब होतानाही उच्छृंखल न होणं कसं असावं याचा वस्तुपाठ देतो. जागोजागी भेटणाऱ्या ‘स्थानिक लता’, ‘प्रतिलता’, ‘अति लता’ यांना या आणि अशा दीदींच्या अनेक गाण्यांना हात लावताना बघून मलाच फार भीती वाटते. किमान काही गाणी तरी केवळ दीदींच्याच स्वरात ऐकावीत असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही.

‘सुंदर ते ध्यान’ म्हणताना हाच आवाज तुकोबारायांचा स्वर वाटू लागतो आणि ‘निश्चयाचा महामेरू’ म्हणताना समर्थानी छत्रपतींना लिहिलेलं पत्रसुद्धा समर्थाच्या वाणीत भासू लागतं. ‘सरणार कधी रण’ म्हणताना जखमी अवस्थेतील बाजीप्रभू देशपांडे व्यक्त होतात. आणि हे किंवा ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ ऐकताना चुकूनही आपल्या मनात ही गाणी स्त्री-स्वरात का, असा प्रश्न येऊच शकत नाही. कारण लतादीदींचा स्वर साऱ्याच्या पलीकडे जाऊन आपल्या हृदयाशी संवाद साधत असतो.

लतादीदींच्या गाण्यांचाच नाही तर त्यातल्या एक-एक शब्दाचा अभ्यास करण्यासाठी जन्म अपुरा वाटतो. ‘हुई और भी मुलायम मेरी शाम ढलते ढलते’मधील ‘मुलायम’ शब्दाइतकं मुलायम हाताला कधी काही जाणवलंय तुमच्या?

हृदयनाथजींच्या संगीतरचनांपैकी अद्भुत प्रकल्प म्हणजे मीराबाईच्या रचनांचा ‘चाला वाही देस’! मीरेची व्याकुळता, वेड, भक्ती, प्रीती.. सगळे रंग दीदींच्या आवाजात ऐकताना डोळे मिटलेत तर मीराबाईचा तो महाल डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहणार नाही.

अगदी अलीकडच्या काळात रेहमानचं ‘लुकाछुपी’ गाताना ‘थक गई है अब तेरी मां’मध्ये ‘थक गई’मधलं जे तुटणं आहे, ते आपल्यालाही हलवून टाकणारं..

हा परिस आपल्याला लाभला हे आपलं भाग्य! गाण्यासाठी असलेलं ‘इमान’ अनुभवावं तर लतादीदींच्या गाण्या-वागण्यात. त्यांच्याबरोबर गाणी ध्वनिमुद्रित करताना माझ्यासाठी तो साक्षात् सरस्वतीचा आशीर्वाद होताच; पण आयुष्यभर कष्टाने आणि प्रामाणिकपणाने गाण्यासाठी ‘इमान’ जपणाऱ्या एका कलावंताने घेतलेली ती कार्यशाळासुद्धा होती.

दीदींची गाणी, त्यांची गायकी, त्यांची संगीतावरची श्रद्धा याविषयी वर्षांनुर्वष लोकांनी लिहिलंय, आजही लिहिताहेत.. आणि अनेकांना लिहावंसं वाटेल. ‘चंद्र’ या विषयावर कविता, गाणी करण्यासारखं आहे ते! पुन्हा पुन्हा त्या आवाजावर प्रेम करावं, भक्ती करावी.. दरवेळी तुम्हाला नवा आनंद मिळेल.. अभ्यास करणाऱ्याच्या जन्माला पुरून उरेल.. तुमची सखी होऊन भेटेल.. आई म्हणून पाठीवरून हात फिरवेल.. ‘सागरा प्राण तळमळला’ म्हणत तुमच्यातल्या माणसाला जागं करेल..

हे आजचं माझं लिखाण म्हणजे खिडकीतून फक्त क्षणभर चंद्राकडे पाहून मिळालेला अनुभव आहे. मुळात ज्या आकाशात चंद्र आहे त्या पृथ्वीवर आपण आहोत, हे आपलं भाग्य! लतादीदींच्या आवाजाच्या कालखंडात आपण जन्माला आलो, ही आपली गतजन्मीची पुण्याई!!

तेव्हा आता मी पुन्हा श्रवणानंदात बुडून जातो. लतादीदींना गायलेल्या गालिबच्या रचना-

‘जमा करते हो रकिबों को क्यूं

इक तमाशा हुआ, गिला न हुआ

दर्दे मिन्नत करो..’

खल्लास! पुन्हा श्वास जलद होतोय.. पुन्हा डोळे दमट.. नाही, नाही.. पॉज करा.. मला हे सगळं अनुभवू दे. मग पुढचा शेर..
-saleel_kulkarni@yahoo.co.in