|| समीर गायकवाड

तान्हीबाईला जाऊन आता काही महिने लोटलेत. ती गावातली अखेरची बालविधवा होती. वयाच्या नव्वदीनंतर तिला देवाचं बोलवणं आलं. तिचं खरं नाव सरस्वती. सगळं गाव तिला ‘तान्हीबाय’ म्हणे. मरतड जगदाळे हे तिचे वडील. एकनाथ आणि सरस्वती ही त्यांची दोनच अपत्ये जगलेली. सरस्वती जेमतेम बारा वर्षांची असतानाच तिचं लग्न झालेलं. अक्षता पडल्यानंतर गावी परतलेला तिचा किशोरवयीन दादला काही दिवसांतच शेतात साप चावून मृत्युमुखी पडला होता. सरस्वतीच्या कपाळी वैधव्य आलं तेव्हा मरतडरावांनी तिला कायमचं सांभाळण्यासाठी माहेरी आणलं. यावर गावानं विचारल्यावर म्हणाले, ‘‘माझी सरस्वती अजून तान्ही आहे. ती जाईची कवळी वेल आहे. तिला आमच्या अंगणातच फुलवेन. गावानं तिची फिकीर करू नये.’’

leopard fell into well for water, leopard water washim,
जंगलात पाणी मिळेना, वन्यप्राण्यांचा जीव टांगणीला; तहान भागविण्यासाठी…
Uddhav Thackeray On BJP and Shinde group
उद्धव ठाकरेंची भाजपा आणि शिंदे गटावर टीका; म्हणाले, “थापाड्यांची खोटारड्यांची लंका…”
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
nilesh sambre, kapil patil
“कपिल पाटील डोळ्यांची शस्त्रक्रिया करा”, नीलेश सांबरे यांचे खासदार कपिल पाटील यांना प्रत्युत्तर

त्या दिवसापासून सरस्वतीची ‘तान्हीबाई’ झाली. काही वर्षांनी घरात एकनाथाच्या लग्नाचा विषय चच्रेस आला. एकनाथाच्या लग्नाची चर्चा कानी पडताच तान्हीबायचं मस्तक भणभणून यायचं. एकनाथाचं लग्न होणार या विचारानेच तान्हीबाय बेचन झाली. सहा पोरींची लग्नं कशी लावायची या विवंचनेत असलेल्या रामा धायरेनं मरतडकडून सगळ्या पोरींच्या लग्नात मदतीचा शब्द घेऊनच आपली थोरली पोर निर्मला हिचा हात एकनाथाच्या हाती दिला. लग्न थाटामाटात झालं. एकनाथाच्या लग्नात नट्टापट्टा करणाऱ्या तान्हीबाईचं जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा तिला त्यातलं काहीच कळलं नव्हतं. तिच्यासाठी तो भातुकलीचाच खेळ होता- जो नियतीलाही बघवला नव्हता. यौवनसुलभ भावना, नटणं- मुरडणं, शृंगाराचा अर्थ, प्रेमाची अनुभूती, देहाचं आकर्षण आणि संसारचक्र यातलं काहीच तिला अनुभवता आलं नव्हतं.

एकनाथाचं लग्नानंतरचं देव-देव करून झालं. गावदेवाची पूजाअर्चा झाली. यथावत सोळकं उरकून निर्मलाची पाठराखीण माघारी गेली आणि खऱ्या अर्थाने तिच्या पाठीशी कुणी उरलं नाही. कारण त्या दिवसापासून तान्हीने एकनाथाचे कान भरण्यास सुरुवात केली. परंतु जीवापाड प्रयत्न करूनही एकनाथ आणि निर्मला यांच्यात कायमचं वितुष्ट आणण्यात तिला यश आलं नाही. त्यांच्यात रोज किरकोळ भांडणं होत; पण निर्मलाच्या सोशिक स्वभावामुळे निभावून नेलं जायचं. पुढच्या काही दिवसांत निर्मलाची पावलं जड झाली. घरात नव्या पाहुण्याची चाहूल लागली. तान्हीबाईचा चडफडाट टोकाला गेला. आपल्याला जी सुखं मिळाली नाहीत, ती गरीब घरातून आलेल्या निर्मलेला मिळताहेत, या असूयेनं तिला पुरतं ग्रासलं. निर्मलेचा गर्भपात व्हावा म्हणून तिने हरतऱ्हेने प्रयत्न केले; पण शेवटी ती एका गोंडस मुलाची आत्या झालीच! निर्मलेला अपत्ये झाली. ती मोठी होत गेली. तान्हीबाईने निर्मलाची मुलं कधीच मांडीवर घेतली नाही. कायम त्यांचा दु:स्वास केला. तिचं वय जसजसं वाढत गेलं तसं मुलांचे कान भरण्याचा प्रयत्नही करून पाहिला तिने; पण व्यर्थ! दरम्यान, एकनाथालाही तिचा स्वभाव उमगला होता. पण त्यानेही तिला कधी दुखवलं नाही.

दशके निघून गेली. एकनाथाने आधी पोरीचे लग्न उरकून एकाच मांडवात दोन्ही पोरांचा बार उडवला. मोठय़ा घरच्या लेकी घरात आल्या. आणि निर्मलेचं जगणं कालचक्रात अधिकच गुरफटत गेलं. दोन्ही बाजूनं मुस्कटदाबी होऊ लागली. तान्हीबाईला मात्र आनंद झाला. शेत असो वा घर, छद्मी तान्हीबाई सगळी कामं करू लागत असल्याने तिच्याविरुद्ध बोलायला जागा नव्हती. एकनाथाला सगळं दिसत होतं, पण तान्हीबाईला तो अडवू शकत नव्हता. मरतडरावांच्या दृष्टिआड सगळा खेळ सुरू असल्यानं ते या बाबतीत अनभिज्ञ होते. नातवंडं झाली तरी निर्मलेच्या मागचे कष्ट सरले नाहीत. इथूनच एकनाथ आणि तान्हीबाई यांच्यात खटके उडू लागले. तरीदेखील तान्हीबाई सगळ्यांना जोपारून न्यायची.

काबाडकष्टांनी थकलेल्या निर्मलेसोबत एक दुर्घटना घडली. औतावरून निसटलेल्या बलानं तिच्या पोटात भोसकलं. अतिरक्तस्रावानं तिचा मृत्यू झाला. सुखाचे दिवस आल्यावर निर्मलेच्या असं एकाएकी निघून जाण्यानं एकनाथाला धक्का बसला. या घटनेनं मात्र तान्हीबाई जमिनीवर आली. निर्मलेच्या मृत्यूनंतर तिच्या सुनांनी आत्येसासूवर डूख धरला. पण म्हातारा मरतडराव मात्र अजून तान्हीबाईच्या बाजूनं खंबीर उभा होता. दरम्यान, मरतडरावाचा इहलोकीचा प्रवास संपला. एव्हाना थकलेला एकनाथ दिवसभर निर्मलेच्या समाधीशेजारी बसून असायचा.

कंबरेत वाकलेली तान्हीबाई आयुष्याच्या अखेरच्या वळणावर आली. तिला पलतीर खुणावू लागला. एकनाथाची मुलं तिनं कधीच छातीशी धरली नव्हती, पण आता नातवंडं उराशी घट्ट धरावीत असं तिला मनापासून वाटू लागलं. पण बेरकी सुनांनी तान्हीबाईचा पाणउतारा सुरू केला. पोरांच्या बारशालाही तिला येऊ दिलं नाही. तेव्हापासून तान्हीबाईला आपल्या वागणुकीचा पस्तावा होऊ लागला. तिनं मग गावात जायचा शिरस्ता धरला. ती दिवसभर देवळापाशी पिंपळाखालच्या कट्टय़ावर बसून राहू लागली. येत्या-जात्या लेकरांच्या हातावर खडीसाखर ठेवू लागली. न्याहारी आटोपून काठीच्या आसऱ्यानं पावलं मोजत जाणारी, कंबरेत झुकलेली म्हातारी तान्हीबाई बारोमास नजरं पडायची. बघता बघता ती जख्खं वृद्धा होऊन गेली. एकनाथानंही राम म्हटला तशी ती आणखीनच वाकली.

तिच्या कपाळावरच्या रेषांची नक्षी जाळीदार होत गेली. अंगावरची कातडी ढिली झाली. डोईची चांदी विरळ झाली. हनुवटी लोंबू लागली. निस्तेज झालेले डोळे आर्त झाले. चेहऱ्यावर सुरकुत्यांची लिपी उमटली. चालताना हातपाय लटपटू लागले. आवाज खोल गेला. तळहातावरची साय मखमली होत गेली. ती काही फार मोठी भाविक वा श्रद्धाळू होती अशातला भाग नव्हता, पण तिला वस्ती सोडून गावात जायची ओढ लागलेली असायची. देवळाचं फक्त निमित्त होतं. तिथं भेटणारी माणूसवेडी म्हातारीकोतारी आणि लोभस पोरंटोरं यांची आस तिला असायची. पोरांनाही तिची सवय जडली. तिच्या मऊशार हाताचं, खडबडीत खडीसाखरेचं त्यांना अप्रूप होतं. तिच्या हातून खडीसाखर खाल्लेल्या पोरांची पोरं देवळात येऊ लागली तरीदेखील तिच्या दिनचय्रेत फरक पडला नाही. ती नित्यनेमानं तिथं येत राहिली. नंतर चालणं जीवावर येऊ लागलं तशी दिवसभरात जितकं जमेल तितकं देवळात जाऊ लागली. वाटेनं भेटणाऱ्यास, अगत्यानं बोलणाऱ्यास थांबवून खडीसाखर द्यायची. तिच्या कंबरेला असलेल्या चंचीत खडीसाखरेच्या पुडय़ा ठासून भरलेल्या असत. अखेरच्या दिवसापर्यंत तिच्या देहाचं सागवानी लाकूड टकाटक होतं. वस्तीवर पाय घसरून दगडावर डोकं आपटल्याचं निमित्त होऊन तिचा अंत झाला.

हा घटनाक्रम जलदगतीनं घडला. गावातल्या पोक्त पिढीला, पिकल्या पानांना याचं वाईट वाटलं. एकीकडे आपल्या संसारिक जीवनाचं कुठलंही सुख उपभोगू न शकलेल्या तान्हीबाईचं सुरुवातीचं वागणं नक्कीच वाईट होतं; पण दुसरीकडे तिनं देहधर्मावर ताबा ठेवला होता, कधी आपलं पाऊल ढळू दिलं नव्हतं. तिचं स्वत:चं विश्व तोडून ती गावाशी एकरूप झाली, तेव्हा ती गावकुसाच्या कृष्णाची मीराबाई झाली होती. आपली दु:खं पोटात ठेवून गावाच्या सुखात ती आनंद मानत होती. आपल्या परीनं सुखाच्या फुलवाती लावत होती. तिचं जाणं गावातल्या अनेक बायकांना चटका लावून गेलं. कारण तिनं पुष्कळदा अनेकींना चोरून मदत केली होती. तिचा हा पलू ती गेल्यानंतर सर्वासमोर आला, तेव्हा गाव खूप हळहळलं होतं. तान्हीबाई चाफ्यासारखी जगली होती. तिच्या पूर्वायुष्यामुळे तिच्याकडं घरच्यांनी नंतर आस्थेनं पाहिलं नाही. जणू तिच्या देहावरच्या पानांनीही साथ सोडली होती. तरीही एकटय़ानंच ती बहरत राहिली. मनातला सोनचाफा खुलवत गावाला अर्पित राहिली.

आता तान्हीबाईला जाऊन बरेच दिवस झालेत. ती गेल्यापासून बारा गल्ल्या फिरून येणाऱ्या इब्लिस पोरांच्या हातावर खडीसाखर ठेवणारं कुणी उरलं नाही. त्यामुळे देवळापाशी आली की ही सगळी पोरं हिरमुसून जातात. कालपरवाचीच गोष्ट आहे. पिंपळाच्या कट्टय़ावर जिथं तान्हीबाई बसून असायची तिथं काळ्या मुंग्यांच्या भल्यामोठय़ा रांगा लागल्या होत्या. जणू काही काळं चवाळंच अंथरलंय! जमा झालेल्या पोरांच्या हाती चिल्लर टेकवून त्यांना खडीसाखर आणायला लावली. पोरांनी आणलेल्या खडीसाखरेचे तुकडे टाकताच निमिषार्धात सगळ्या मुंग्या पांगल्या! आता काळ्या मुंग्यांच्या रांगा तिथं रोजच लागतात. पोरंही आवर्जून खडीसाखर टाकतात. मग त्या मुंग्या झटक्यात नाहीशा होतात. गाव म्हणतंय की, जोवर पिंपळाच्या कट्टय़ावरती काळ्या मुंग्या आहेत तोवर तान्हीबाई जिती आहे!

sameerbapu@gmail.com