दोन महाराष्ट्र आहेत. पुणे-मुंबई नावाचा एक भाग आहे- जो जाणिवेने आणि सांस्कृतिक दृष्टीने इतर महाराष्ट्रापेक्षा वेगळा पडतो. आणि मग विस्तृत आणि विविध असा उरलेला महाराष्ट्र आहे. आत्ता दोन आहेत तसे सत्तर ते नव्वद या दशकांत आमच्या लहानपणी तीन भाग होते. पुणे आणि मुंबई ही शहरे जीवनाचा वेग, आकारमान आणि स्थलांतरित माणसांचे अस्तित्व याबाबतीत एकमेकांपेक्षा वेगवेगळी होती. पुणे, मुंबई आणि उरलेला विशाल आणि वैविध्यपूर्ण महाराष्ट्र असे लहानपणी आमच्या भावजीवनाचे ढोबळमानाने तिहेरी स्वरूप होते. तो जो उरलेला महाराष्ट्र आहे, तिथे आपले नातेवाईक राहतात. ज्यांच्याकडे आपण सुट्टीला जातो आणि पुण्यात परत येतो, किंवा मग गणपती-गौरीला ते आपल्याकडे येतात. आपली आणि त्यांची भाषा थोडीशी वेगळी आहे. त्यांची पदार्थ करायची पद्धत वेगळी आहे हे समजायचे. पण पुण्या-मुंबईत जसे घरी असल्यासारखे वाटायचे तसे इतर महाराष्ट्रात गेले की वाटायचे नाही. आणि तसे का वाटते, ते कधीच कळायचे नाही. मुंबई अजब होती. तिथे अनेक प्रकारच्या अनेक भाषा बोलणारे लोक होते. पण तरीही ते शहर कधी परके वाटले नाही, कारण ते शहर होते. त्याचा आकार आणि वेग पुण्यापेक्षा वेगळा असला तरी इतर कुठेही वाटते त्यापेक्षा जास्त सवयीचे आणि सोयीचे काहीतरी असे मुंबईत वाटायचे. त्या वयात निवांतपणा आणि झाडेझुडपे, आकाश, निसर्ग अशा गोष्टींचे आकर्षण कुणाला असते? शहरातच जन्मून मोठय़ा झालेल्या मुलांना वेग, वैविध्य आणि सतत बदलत्या मोठय़ा अजब गोष्टींचे गारुड हवे असते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरात जन्मून मोठे होत असताना आमच्या स्वत:च्या जाणिवेचे आणि आमच्या आजूबाजूला घडणारे आम्हाला सांगणारे असे मराठी साहित्यात काहीच नव्हते. मराठी साहित्य जाणिवेने जास्त वयस्कर आणि मुख्यत: ग्रामीण होते. जयवंत दळवी, अरुण साधू, विजय तेंडुलकर या रक्ताने शहरी जाणिवेच्या असलेल्या लेखकांचे मन समजून घ्यायचे वय अजून पक्व झाले नव्हते. त्याला अजून वेळ होता. आणि मराठी पाठय़पुस्तकांत आणि वाचनालयात जी पुस्तके असायची ती खूप आवडायची, पण त्यात आपले आणि आजचे असे काही सापडायचे नाही. इंग्रजी वाचता यायचे नाही. वर्तमानकाळाचे आणि मराठी जाणिवेचे कधीच फारसे पटत नसल्याने ही परिस्थिती होती, की शहरात जन्मलेली आणि मोठी झालेली पिढी अजून लिहिती व्हायची होती म्हणून पुस्तके वयस्कर होती, हे नक्की कळायचे वय नव्हते. कुटुंबातले लोक आणि आई-वडील ज्या पुस्तकांनी भारावून जातील त्या पुस्तकांनी आपणही भारावून जायचे, हे ठरून गेले होते. समोर ‘मिस्टर इंडिया’ चालू आहे आणि हातात ‘पिंगळावेळ’ आहे अशा गोंधळाच्या अवस्थेत आम्ही कसेनुसे हसत, नीट भांग पाडून, मराठीत चांगले मार्क मिळवत आमचे बालपण रेटत की काय म्हणतात ते होतो.

मराठीतील सर्व करंट बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sachin kundalkar article on author milind bokil
First published on: 03-09-2017 at 01:01 IST