अमोल उदगीरकर

दळवींनी आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी ‘आत्मचरित्राऐवजी’ नावाचं एक वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणारं पुस्तक लिहून ठेवलं आहे. त्यात दळवींनी आपल्या कोकणातल्या परिवाराबद्दल लिहिलं आहे. थोडा विचार केला तर जाणवायला लागतं की, सगळंच नसलं तरी ‘धर्मानन्द’मधला थोडा तरी भाग दळवींच्या आयुष्यातल्या वैयक्तिक अनुभवातून आला असावा. पण वाचकाने लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यात कितपत शिरावं याची मर्यादा स्वत:च घालून घ्यायची असते..

समरार्थ फिक्शन...
समरार्थ फिक्शन…
article about veteran feminist writer vidyut bhagwat career journey
व्यक्तिवेध : विद्युत भागवत
Dilip Parbhavalkar While in Drama Patra-Patri
Dilip Prabhavalkar: दिलीप प्रभावळकर यांच्या मनात श्रीराम लागूंच्या पत्र आठवणींचा दरवळ, ‘पत्रापत्री’च्या प्रयोगांची चर्चा
Esther Duflo books for children
बदलांची जाणीव करून देणारे चित्रग्रंथ मराठीत; ‘नोबेल’ विजेत्या एस्थर दुफ्लो यांची बालपुस्तके प्रकाशित
actor dilip prabhavalkar remembered letter written by dr shriram lagoo
दिलीप प्रभावळकरांची खास पत्राची आठवण; ‘पत्रा पत्री’ अभिवाचनाचे जोरदार प्रयोग
sunita Deshpande
आपुलकीचं नातं
Kalki 2898 AD
Kalki 2898 AD हिंदू धर्मासारखेच ‘या’ देशांनाही आहेत ‘चिरंजीव’ वंदनीय; निमित्त ‘कल्की’चे… काय आहे चिरंजीव ही संकल्पना?
Tomb of Sand writerGeetanjali Shree
मातृभाषेत पुस्तक लिहून कमावले ‘आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक!’ पाहा कसा होता गीतांजली श्री यांचा प्रवास….

माणसं तर शापित असतातच, पण काही परिवारही शापित असतात. पिढय़ान्पिढय़ा कसलं तरी अनामिक ओझं डोक्यावर घेऊन जगत राहतात- जयवंत दळवींच्या ‘धर्मानन्द’मधल्या खोत परिवारासारखी. शोकांतिका होणार तर आहेच, फक्त वाट बघणं हातात आहे. तुम्ही ती टाळू शकत नाही.  जादू, मंत्र, चमत्कार या गोष्टींना आपण कितीही मानत नसलो तरीपण नियती नावाची गोष्ट असते, यावर विश्वास ठेवल्याशिवाय कधी कधी पर्याय राहत नाही. जगभरात माहीत असलेला केनेडी परिवारही या ‘केनेडी कर्स’ने त्रस्त आहे. एवढा पैसा, एवढी सत्ता; पण परिवारात सतत एका अंतराने अनैसर्गिक मृत्यू होतात. बरं मृत्यू तरी कसे? संशयाच्या धुक्यात लिप्त असलेले. कुणीच ठाम विधान करू शकत नाही असे मृत्यू. आपल्याकडे काही प्रमाणात गांधी परिवार असाच शापित आहे. पण शापित असणं ही काही फक्त लब्धप्रतिष्ठित परिवारांची मक्तेदारी नाही. गावाकडे ओळखीच्या एका परिवारात एक पिढी ओलांडून हमखास अपघाती मृत्यू होतात. पुण्यातल्या एका ओळखीच्या घरात हमखास तरुण वयात असाध्य व्याधी होऊन तरुण मुलगा जातो. पण शापित असणं म्हणजे रोगराई किंवा मृत्यू होणं इतकंच नसावं. काही घरांत सतत लोकांना वेड लागतं, काही घरांत पिढय़ान्पिढय़ा तरुण लोक पळून जातात. काही घरांत प्रत्येक पिढीत एखादा काही न करता घरात बसून राहण्याचा निर्णय घेतो आणि तो काटेकोरपणे पाळतो. एखाद्या परिवाराला पिढय़ान्पिढय़ा हमखास त्यांचं सुख-भाग्य मिळत नाही. जयवंत दळवींची ‘धर्मानन्द’ ही कादंबरी अशाच एका शापित घराची गोष्ट सांगते.

‘धर्मानन्द’मधलं मुख्य पात्र धर्मानन्द हा कोकणातल्या एका गावातल्या खोत घराण्यातल्या तारुण्याच्या उंबरठय़ावर उभा असणारा मुलगा आहे. विखंडित परिवार ही आधुनिक काळाची थेरं आहेत असं वाटणाऱ्या लोकांना कुणी तरी सांगायला पाहिजे की, असे परिवार पहिल्यापासूनच आपल्या समाजव्यवस्थेत होते. फक्त तेव्हा आता सोडता यायचं तसं घर सोडता यायचं नाही. धर्मानन्दचा परिवार एका छताखाली राहत असला तरी परिवारातल्या सर्व सदस्यांची तोंडं वेगवेगळय़ा दिशांना आहेत. धर्माची आजी, विचित्र वागणारे वडील बाप्पा, सगळं सोडून घरच्या माडीवर बस्तान बसवलेला आणि स्वखुशीने मुकेपण स्वीकारलेला एकाकाका, लग्न न झालेली बनात्या, धर्मानन्द हे सगळं लटांबर धर्मानन्दच्या सामथ्र्यशाली आजोबांच्या उपरण्याला धरून वाटचाल करत आहेत. सूर्याभोवती जसे सूर्यमालेतले ग्रह फिरत असतात तसे ते आजोबांच्या अवतीभोवती फिरत आहेत. ‘वर्चस्व’ ही राज्यशास्त्रातली महत्त्वाची संकल्पना असली तरी परिवाराच्या पातळीवरही ती महत्त्वाची असतेच आपल्याकडे. धर्मानन्दच्या परिवारात आणि गावात त्याच्या ताकदवान देखण्या आजोबांचं वर्चस्व आहे. आपल्या वर्चस्वाला मिळणारं प्रत्येक आव्हान, मग ते बाहेरून असो, का घरातल्या सख्ख्या माणसांकडून असो- धर्मानन्दचे आजोबा ते क्रूरपणे मोडून काढत असतात. विलायतेला जाऊन कलेक्टर बनण्याची आकांक्षा असणारा धर्मानन्द अनपेक्षितपणे त्याच्या आजोबांचाच आव्हानवीर बनतो आणि एका शोकांतिकेला सुरुवात होते. या शोकांतिकेची दळवींच्या समर्थ लेखणीतून उतरलेली गोष्ट म्हणजे ‘धर्मानन्द’ ही कादंबरी.

एखाद्या कादंबरीमध्ये जर तत्कालीन समाजरचनेचा पट दिसून येत नसेल तर माझ्यापुरती तरी ती कादंबरी अपूर्ण असते. ‘धर्मानन्द’चं कथानक घडतं ते ब्रिटिश राज्यकर्ते असण्याच्या काळात. पण ब्रिटिश ऑफिसरला सलाम करायला लागू नये म्हणून रस्ता बदलणारे एखादे खानोलकर मास्तर वगळता कुणालाही याबद्दल तक्रार नाहीये. धर्मानन्दच्या आजोबासारखी गावातली प्रभावशाली माणसं ब्रिटिशांना बायकांपासून सगळं काही राजीखुशीने पुरवत आहेत. धर्मानन्दच्या गावातही तत्कालीन सामाजिक व्यवस्थेचं अपत्य असणारा शोषक वर्ग आणि शोषित वर्ग आहे. त्या शोषण व्यवस्थेला जातिव्यवस्थेचं दळभद्री अस्तर आहेच. कर्जाच्या खाली पिचलेली आणि दारिद्य्राने ग्रासलेली शेतकरी कुळं आहेत- ज्यांना कर द्यायला एक दिवसाचा उशीर झाला तरी खोतांच्या हातून भीषण मार खावा लागतो. हा गाव त्या काळातल्या सगळय़ाच गावांसारखा स्थितीस्थापकवादी आहे. तिथं बदलांना वाव नाही. ‘धर्मानन्द’मध्ये जमीनदार खोत परिवार दिसतो, गरीब कुळं दिसतात, ब्रिटिश राज्यकर्ते दिसतात, बंदरावर राहणारे मुस्लीमपण डोकावतात. तत्कालीन श्रद्धा-अंधश्रद्धा दिसतात. यात सगळय़ात प्रभावीपणे काही आलं असेल तर तत्कालीन स्त्रियांचं शोषण. धर्मानन्दची आजी, होनाबाई, बनात्या, भिकू खुळोची बायको आणि अजून कित्येक. या बायकांचं आयुष्य त्यांच्या आयुष्यातल्या पुरुषांच्या दावणीला बांधलेलं आहे. या बायकांना स्वत:चा आवाज नाही. मतस्वातंत्र्य नाही. पुरुषांना या बायकांशी आपल्या गरजा पूर्ण करण्याव्यतिरिक्त अजून कुठलंही स्वारस्य नाही. पुस्तकाला सदानंद वर्दे (हे बहुतेक तेव्हा आणीबाणीविरोधाच्या आंदोलनामुळे येरवडा कारागृहात होते.) यांनी जो अप्रतिम ‘ब्लर्ब’ लिहिला आहे त्यात त्यांनी  ‘धर्मानन्द’मध्ये दिसणाऱ्या ‘माजघराच्या समाजशास्त्रा’चा फार आवर्जून उल्लेख केला आहे. माजघर म्हणजे घराचं अंतरंग. तिथंच कोण कोणाचं शोषण करणार, घरात कुणाचं प्रभुत्व राहणार याची राजकारणं शिजतात. एकाकाका, बनात्या, आजी, बाप्पा आणि दस्तुरखुद्द धर्मानन्द या माजघरातल्या या व्यवस्थेच्या राजकारणाचा बळी. प्रत्येक व्यवस्थेत हे बळी निरंतर असतातच.

‘धर्मानन्द’मध्ये वारंवार दिसतात ती काहीच न बोलणारी किंवा क्वचितच बोलणारी माणसं. ती मुकी आहेत का? तर नाही. मनावर असलेल्या कुठल्या तरी भूतकाळाच्या ओझ्याने या माणसांनी बोलणंच सोडून दिलं आहे. आपण बोललो तरी आजूबाजूची माणसं ते ऐकणार नाहीत किंवा आपल्याला समजून घेणारं या ठार भवतालात कुणीच नाही, याची जाणीव झाल्यामुळे माणसांनी बोलणं बंद केलं आहे. या माणसांचं बोलणं बंद होणं म्हणजे त्यांनी स्वत:शीच केलेला हिंसाचार. धर्मानन्द पोटात असतानाच विहिरीत उडी मारून जीव देणारी धर्मानन्दची आई होनाबाई (सुदैवाने तिच्या पोटातला धर्मानन्द वाचतो), गावात पडेल ती कामं करून जगणारा आणि गावाच्या हेटाळणीचा विषय असणारा भिकू खुळो, दुर्गाडीच्या टेकडीवरच्या रामेश्वराच्या देवळात एकटेच भुतासारखे राहणारे आणि भूतकाळाचा कुठलाही आगापिछा नसणारे वासुदेव भटजी, धर्मानन्दचेच अतिशय अजागळ असणारे वडील बाप्पा या लोकांनी बोलणं पूर्णपणे सोडलंय. एके काळी उत्साहाने फसफसलेला आणि अतिशय महत्त्वाकांक्षी असणारा धर्मानन्दचा काका एकनाथही आयुष्यात घडलेल्या काही दुर्दैवी घटनांनंतर बोलणं पूर्ण बंद करतो. कादंबरीतलेच खानोलकर मास्तर या जगाशी स्वत:च्या अटींवर संवाद तोडून टाकणाऱ्या माणसांबद्दल फार सुंदर बोलून जातात. खानोलकर मास्तर भिकू खुळोबद्दल धर्मानन्दला सांगतात, ‘‘अभंग न करता येणारा असा एखादा संत तुकाराम असू शकणार नाही का? मुका आणि बहिरा माणूस संत होऊ शकणार नाही का? हा तुकारामाच्या जातीतला माणूस आहे धर्मानन्द. आतनं कोंडमारा झालेला एक तुकाराम.’’ इतकं सुंदर लिहून जाणाऱ्या दळवींना एक भरघोस दाद इथं आपसूकच दिली जाते. ‘धर्मानन्द’मध्ये अशा दाद देण्यासारख्या अनेक जागा आहेत.

‘धर्मानंद’मधलं खानोलकर मास्तर हे पात्र मला विशेष आवडतं. खानोलकर मास्तर म्हणजे रूढी-परंपरांना कवटाळून बसलेल्या त्या गावातला शहाणपणाचा एकमेव आवाज. खानोलकर मास्तरला या गावातून बाहेर पडण्याची खूप इच्छा होती, पण नियतीच्या दुर्दैवी फटकाऱ्याने ते काही जमलं नाही. तेव्हापासून नियतीवादी बनलेला हा माणूस. आपण कितीही महत्त्वाकांक्षा बाळगल्या तरी त्या पूर्ण करणं आपल्या हातात नसतं, याची उदासवाणी जाणीव झालेला हा शहाणा माणूस. आपल्या विद्यार्थ्यांमधून महत्त्वाकांक्षा पूर्ण करणाऱ्या या माणसाच्या हाती तिथंपण निराशाच लागते. आयुष्यातून पूर्णपणे विरक्त होण्याचा प्रयत्न खानोलकर नंतर अधिकाधिक वेळ स्मशानभूमीत घालवायला लागतो, पण त्याचा जीव अजूनपण कुठेतरी त्याच्या सुरेखा मांजरीमध्ये आणि जाड रश्श्याच्या मासळीत अडकला आहे. नको तितकं कळणाऱ्या अल्पसंख्य माणसांच्या नशिबी जे त्रिशंकूपण येतं ते खानोलकरच्या नशिबीपण आहे. ‘धर्मानंद’मधल्या जवळपास प्रत्येक पात्राच्या भाळी शोकांतिका आहे, पण वाचकाचा जीव कुठंतरी खानोलकर मास्तरसाठी हळहळतो. ‘आपापल्या वाटा असतात रे धर्मानंद.’ हे खानोलकरांचं वाक्य म्हणजे ‘धर्मानंद’चं सार आहे.

जयवंत दळवींच्या लिखाणात हमखास आढळणारी वैशिष्टय़े ‘धर्मानन्द’मध्येदेखील आहेतच. त्यांच्या लिखाणात येणारी वेडी माणसं या विषयावर तसं बरंच लिहिलं गेलं आहे. ‘धर्मानन्द’मध्ये पण वेडी माणसं आहेतच. ‘धर्मानन्द’मध्ये लैंगिक क्रियांची, नग्नतेची वर्णनं आहेत. ती बीभत्स होत नाहीत. लेखकाच्या लिखाणात त्याच्या वैयक्तिक आयुष्यातले संदर्भ कल्पनाशक्तीची जोड देऊन, थोडे बदल करून येणं ही तशी सामान्य प्रक्रिया असावी. दळवींनी आत्मचरित्र लिहिलं नसलं तरी ‘आत्मचरित्राऐवजी’ नावाचं एक वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगणारं पुस्तक लिहून ठेवलं आहे. त्यात दळवींनी आपल्या कोकणातल्या परिवाराबद्दल लिहिलं आहे. थोडा विचार केला तर जाणवायला लागतं की, सगळंच नसलं तरी ‘धर्मानन्द’मधला थोडा तरी भाग दळवींच्या आयुष्यातल्या वैयक्तिक अनुभवातून आला असावा. पण वाचकाने लेखकाच्या वैयक्तिक आयुष्यात कितपत शिरावं याची मर्यादा स्वत:च घालून घ्यायची असते.

‘धर्मानन्द’ ही  ऐंशीच्या दशकात लिहिली गेलेली कादंबरी आहे. तेव्हापासून समाज, अर्थकारण, जगरहाटी असं सगळंच आमूलाग्र बदललं आहे. पण ‘धर्मानन्द’ अजूनही आजची वाटू शकते. जोपर्यंत माणसं कुणाच्या तरी राक्षसी वर्चस्वाला आव्हान देत आहेत, अपयशी होत आहेत, अपयशाने उन्मळून पडत आहेत, तोपर्यंत ‘धर्मानन्द’ कालबा होणार नाही. कारण या कादंबरीचा गाभाच वर्चस्वाच्या लढाईचा आणि नियतीवादाचा आहे. दोन्ही गोष्टी मानवी इतिहासाइतक्याच जुन्या आहेत आणि मानवाच्या वर्तमानकाळाइतक्याच ताज्या. त्याचबरोबर ही कादंबरी कोकणाच्या पार्श्वभूमीवर लिहिली गेलेली असली तरी त्याचं कथानक मराठवाडय़ात, विदर्भात, खानदेशात आणि पश्चिम महाराष्ट्रातपण घडू शकतं. शेकडो मैल उजाड माळरान असणाऱ्या, उघडे बोडके डोंगर असणाऱ्या, मैलोगणती पाणी नसणाऱ्या मराठवाडय़ातल्या वाचकाला ‘धर्मानन्द’मधली दुर्गाडीची टेकडी, सुंदर तळं असणारं गाव, रामेश्वराचे मंदिर, हुप्प्यांच्या लढाईचे आखाडे बनलेले माडय़ाची वनं आणि मुख्य म्हणजे कोकणातली पिचलेली माणसं जवळची वाटतात हे तिच्या सर्वव्यापकतेचं उदाहरण.

 जयवंत दळवींचं ‘धर्मानन्द’ माझ्या हातात कसं पडलं याची गोष्टदेखील विचित्रच आहे. परभणीमधल्या आमच्या नवीनच विकसित होणाऱ्या कॉलनीमध्ये नव्वदच्या दशकात एका मुलाने हे पुस्तक मला वाचायला दिलं. त्या मुलाला आणि त्याच्या भावाला दशलक्ष लोकांमधून एखाद्याला होतो असा एक दुर्मीळ आजार झाला आणि धडधाकट असलेले दोन्ही भाऊ कंबरेखालून पूर्ण लुळे झाले. नियतीसमोर माणूस किती क्षुद्र असतो आणि माणसांची स्वप्नं नियतीच्या एका फटकाऱ्याने कशी काडीच्या बंगल्यासारखी ढासळतात याचे उल्लेख ‘धर्मानन्द’मध्ये वारंवार येतात. या कादंबरीतच दत्तू शिरसाट नावाचे पात्र कंबरेतून अचानक लुळं पडतं आणि त्याच्या पायाच्या काडय़ा होतात. आमच्या कॉलनीमधल्या काही लोकांनी सरकारदरबारी खटपट करून त्या दोन्ही भावांना ‘व्हीलचेअर’ मिळवून दिली. एका उदास भकासवाण्या दुपारी ज्याने मला ‘धर्मानन्द’ वाचायला दिलं होतं तो मुलगा व्हीलचेअरवरून रस्त्यावरून फिरत असायचा. त्याने माझ्याकडे कधी पुस्तक

परत मागितलं नाही आणि मीपण त्याला दिलं नाही. अजूनही ‘धर्मानन्द’ची ती जुनी प्रत माझ्याकडे आहे.

amoludgirkar@gmail.com