अरुणा जडेजा
माझ्या गुजराती घर-संसाराबरोबरच थोडा- फार मराठी साहित्याबरोबरचा संपर्क माझ्या निर्मलाकाकू यांनी तुटू दिला नाही. त्यांनी एका पुस्तकाचं नाव सांगितलं. लगेचच बडोद्याहून मागवून वाचून काढलं. ते होतं सुनीता देशपांडे यांचं ‘आहे मनोहर तरी….’ मी एक आकंठ संसारात बुडालेली गुजराती गृहिणी. त्यातल्या वर्णनांनी गरगरायला लागलं. थोड्या वेळाने स्वस्थ झाल्यावर पुन्हा वाचलं आणि सुनीताताईंच्या लेखनापुढे नतमस्तक झाले. पुढे काही वर्षांनंतर पुलंच्या काही लेखांचे गुजराती अनुवाद करण्यासाठी माझा सुनीताताईंशी संपर्क आला. त्यांचा ‘नाही’ चा पाढा कायम राहिला. ‘हास्य आणि कविता यांचा अनुवाद होऊच शकत नाही.’ यावर त्या तेव्हा ठाम होत्या. माझा मात्र एकच हट्ट… ‘पण त्यांच्या जवळपास तर जाऊच शकतो ना?’
हेही वाचा : निरंकुश सत्ताधाऱ्यांचा धांडोळा
नंतर २००१ च्या २६ जानेवारीला गुजरातमध्ये झालेल्या भीषण भूकंपाच्या दुसऱ्याच दिवशी पुण्याहून एक फोन आला.
‘अरुणा जडेजासे बात कर सकती हूँ? मै पुणेसे सुनीता देशपांडे बोल रही हूँ… ’
त्याआधीची आमची ओळख फक्त दीड पत्रांएवढी. म्हणजे एक पोस्टकार्ड मजकुरापुरती. तेसुद्धा पुलंच्या विनोदी लेखांच्या अनुवादासाठी अनुमती मागणारे. तेव्हा वयाने ८० पार असलेल्या सुनीताताई कुणाकडून तरी माझ्या पत्रातील पत्त्यावरून फोन नंबर शोधून, आदल्या दिवसापासून मला फोन करण्यासाठी प्रयत्न करीत होत्या. दूरदर्शनवर अहमदाबादच्या भीषण भूकंपाविषयीच्या बातम्या ऐकून त्या सुन्न झाल्या होत्या. पुढे फोनवरून अर्धा तास माझे सांत्वन करीत होत्या. त्यांचं बोलणं ऐकून मी थक्कच झाले होते.
हेही वाचा : ‘रजनी’च्या पुनर्शोधासाठी ‘रजिया’चा लढा
काही वर्षांनंतर माझे एक-दोन अनुवाद त्यांनी पुण्याच्या गुजराती भाषातज्ज्ञांकडून तपासून घेतले आणि पुलंच्या लेखन अनुवादास अनुमती दिली. पुल गेल्यानंतर २००२ च्या डिसेंबरमध्ये सुनीताताईंनी एकटीने कविता वाचनाचा कार्यक्रम पुण्यात केला, त्याची माहिती मला बातम्यांतून मिळाली होती. मी त्यांना फोन करून या विषयावर बराच वेळ गप्पा मारल्या. तो कविता वाचनाचा कार्यक्रमच ऐकल्याचा अनुभव त्यांनी मला त्यादिवशी विविध कविता ऐकवून मिळवून दिला. महाराष्ट्रात पुलंच्या जवळ जाणे सोपे होते, मात्र सुनीताताईंनी कुणाला आपलेसे करणे खूप कठीण होते. पण दुसऱ्या राज्यात राहूनही ते मला दहा वर्षे जमले होते. त्यांच्याशी संवाद खूप होई, गप्पाही भरगच्च होत. त्यांची सिद्धान्तनिष्ठा एका जागी होती. पण माणुसकी हा त्यांच्यातील सर्वात मोठा गुण होता. थोर व्यक्ती अशा उगाच का होतात? तेजस्वी बाणा असलेल्या महाराष्ट्रातल्या या थोर व्यक्तीच्या संपर्कात होते, हे माझे सद्भाग्यच.
अनुवाद : गीतांजली दावडा
(सुनीताबाईंच्या मृत्यूनंतर गुजराती वर्तमानपत्रात छापून आलेल्या आदरांजली लेखाचा संक्षिप्त भाग)