गेल्या निवडणुकीत आमच्या जागा घटल्या म्हणून जागावाटपात मित्र पक्षाने राष्ट्रवादीला कमी जागा दिल्या. आता चित्र बदलले आहे याची आठवण काँग्रेसला करून देतानाच आगामी विधानसभा निवडणुकीत जागावाटपाचे सूत्र बदलण्यात यावे, अशी भूमिका राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी मांडली.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे चार तर काँग्रेसचे दोनच उमेदवार निवडून आल्याने पराभवानंतरही राष्ट्रवादीची बाजू उजवी ठरली आहे. २००९ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयानंतर काँग्रेस नेत्यांनी राष्ट्रवादीला जास्त जागा देण्यास विरोध होता. त्याचीच पुनरावृत्ती पवारांनी आता केली. आता परिस्थिती बदलली आहे एवढीच आमच्या मित्र पक्षाला आठवण करून देतो, असे सांगत शरद पवार यांनी काँग्रेसवर कुरघोडी केली. जागावाटप लवकर झाल्यास निवडणुकीच्या तयारीसाठी वेळ मिळतो, त्यामुळे जागावाटपाच्या वाटाघाटी लवकरच सुरू व्हाव्यात, असे पवार यांनी सुचविले.
  काँग्रेसने जास्त जागा लढविल्या
गेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने १७० तर राष्ट्रवादीने ११३ जागा लढविल्या होत्या. २००४ मध्ये काँग्रेसने १५७ तर राष्ट्रवादीने १२४ जागा लढविल्या होत्या. आता राष्ट्रवादीला लोकसभेत काँग्रेसपेक्षा दोन जागा जास्त मिळाल्याने यंदा राष्ट्रवादी १० ते १५ जास्त जागा पदरात पाडून घेईल, अशी चिन्हे आहेत.

उदयनराजे फिरकलेच नाहीत!
लोकसभा निकालानंतर झालेल्या पहिल्याच बैठकीत साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले सभास्थळी शुक्रवारी फिरकलेच नाहीत. निवडणुकीपुरताच पक्ष ही त्यांना सवयच जडल्याचे पक्षाचे नेते बोलू लागले आहेत. गेल्या निवडणुकीत जिंकल्यावर खासदार भोसले यांनी पक्षाशी फारसा संबंध ठेवला नव्हता. पक्षाच्या कोणत्याच कार्यक्रमांमध्ये ते फिरकत नसत. लोकसभा निवडणूक जवळ आल्यावर मात्र पक्षाच्या कार्यालयात त्यांची ये-जा वाढली होती. केंद्रात भाजपचे सरकार सत्तेत आल्याने मोदी यांना शुभेच्छा देणारे फलक साताऱ्यात लागले होते. यावर मोदी आणि खासदार भोसले यांचे छायाचित्र होते.  शरद पवार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला खासदार भोसले वगळता उर्वरित तीन खासदार उपस्थित होते.