‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधीजींची हत्या केली,’ असा निराधार आणि बदनामीकारक आरोप केल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात भिवंडी येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांच्या न्यायालयात फौजदारी तक्रार सादर केली आहे. संघाने राहुल गांधींविरूध्द दंड थोपटून त्यांना न्यायालयात खेचण्यासाठी पावले टाकली असून या तक्रारीवर न्यायालयात २७ मार्चला सुनावणी होणार आहे. 

संघाचे भिवंडी तालुका कार्यवाह राजेश कुंटे यांनी ही तक्रार न्यायालयात सादर केली असून राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली आहे. गांधी यांनी भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे ६ मार्च रोजी झालेल्या जाहीर सभेत संघाविरूध्द वक्तव्य केले होते. संघ गेली ८ दशके राष्ट्रहितासाठी काम करीत असून राहुल गांधी यांनी निखालस खोटे आरोप करून बदनामी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.