अत्यंत मार्मिकपणे तीही सभ्य शब्दांमध्ये एखाद्याची टोपी उडविण्याची खासीयत असलेले राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची अलीकडच्या काळातील तीन वक्तव्ये वादग्रस्त ठरली आहेत. सातारा आणि नवी मुंबईतील मतदारांना दोनदा मतदान करण्याचे तेही शाई पुसून हे पवार यांचे नवी मुंबईतील विधान चांगलेच वादग्रस्त ठरले. पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने हे विधान केल्याने त्याची जास्तच प्रतिक्रिया उमटली. शेवटी मुंबईतील मेळाव्यात पवारांवर खुलासा करण्याची वेळ आली. आपण मजेत व मिश्किलपणे हे विधान केले होते. विनोदाने केलेल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असा खुलासा पवार यांनी केला. मागे अजित पवार यांनी मजेतच केलेल्या वक्तव्यावरून शरद पवार यांनी त्यांना समज दिली होती. तसेच भविष्यात विधाने करताना खबरदारी घ्या, असा सल्लाही दिला होता. दुष्काळी भागात जाऊन लघुशंका करू का, असे विधान अजितदादांनी इंदापूरमध्ये केले होते. या विधानावरून त्यांनी जाहीरपणे दिलगिरी व्यक्त केली होती. आज मात्र पवार यांनीच वादग्रस्त विधान करून वाद निर्माण केला. सातारा आणि मुंबईत २००९ मध्ये एकाच वेळी मतदान झाले होते, असा उल्लेख पवार यांनी केला. पवार यांचा संदर्भ कधीही चुकत नाही. पण तेव्हा सातारा आणि मुंबईत वेगवेगळ्या तारखांना मतदान झाले होते.ऊस दरावरून शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पश्चिम महाराष्ट्रात चांगलाच प्रतिसाद मिळाला होता. या हिंसक आंदोलनानंतर पवार यांनी शेट्टी हे विशिष्ट समाजाच्या नेत्यांच्या साखर कारखान्यांच्या विरोधात आंदोलन करीत नाहीत, असा श्लेष काढणारे वक्तव्य केले होते. पवार यांनी आंदोलनाला जातीची किनार दिल्याबद्दल तेव्हाही पवार यांच्यावर टीका झाली होती. घटनात्मक यंत्रणा किंवा पदे यांचा आदर राखणाऱ्या पवार यांनी दुष्काळावरून राज्यपाल गंभीर नाहीत, असे विधान केले होते. राज्यपाल शंकरनारायण यांनी दुष्काळाच्या वेळी पश्चिम महाराष्ट्राला जादा निधी देण्यास नकार दिल्यानेच पवार यांनी तसे विधान केले होते, अशी राजकीय वर्तुळात तेव्हा चर्चा होती.