अशोक चव्हाण यांनी खुप काही मोठा भ्रष्टाचार अथवा घोटाळा केल्याचे आपणास वाटत नाही, असे सांगत केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी चव्हाण यांना स्वच्छतेचे प्रमाणपत्र बहाल केले. येथे गुरूवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मागील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या मनसेला आम्ही कमी लेखत नाही. त्यामुळे सर्व जागांवर काँग्रेस आघाडी पूर्ण ताकतीनिशी लढत देईल, असेही ते म्हणाले.
नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीचे उमेदवार छगन भुजबळ आणि डॉ. भारती पवार यांच्या प्रचाराचा शुभारंभ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे गुरूवारी आयोजित मेळाव्याद्वारे करण्यात आला. पत्रकार परिषदेआधी झालेल्या मेळाव्यात पवार यांनी भाजपवर हल्ला चढविला. गुजरात विकासाचे जे चित्र प्रसारमाध्यमांना हाताशी धरुन भाजपने रंगविले आहे, ते पूर्णपणे खोटे असून त्या राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र सर्वदृष्टय़ा पुढे आहे. गुजरातच्या विकासाची ही प्रतिकृती नेमक्या कोणत्या आधारावर झाली याचे संशोधन करण्याची गरज असल्याचे सांगतानाच सध्याचे निवडणूक अंदाज काँग्रेस आघाडी शासनाविरोधात असले तरी वास्तवात तसे काही घडणार नाही, असे भाकित त्यांनी वर्तविले आहे. २००४ मधील निवडणुकीत भाजपने ‘इंडिया शायनिंग’द्वारे असाच प्रयत्न केला होता. तथापि, प्रत्यक्षात जनतेने त्यांना नाकारले. या निवडणुकीत तसेच घडणार असल्याचे पवार यांनी नमूद केले. त्यामुळे जनमत चाचण्या व निवडणूक अंदाज काँग्रेस आघाडी शासनाच्या विरोधात असले तरी कार्यकर्त्यांनी काळजी करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला.
यावेळी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नांव न घेता नरेंद्र मोदी यांच्यावर शरसंधान साधले.