भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी बीजेडीचे नेते नवीन पटनाईक यांच्याबाबत नरमाईचे धोरण अवलंबिले, मात्र त्याच वेळी त्यांनी परराष्ट्रमंत्री सलमान खुर्शिद यांच्या वक्तव्यावरून काँग्रेसवर जोरदार टीका केली. निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयासारख्या संस्थांवर टीका केल्याबद्दल मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केले. आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना आपला पराभव दिसत असल्याने त्यांनी सबबी शोधण्यास सुरुवात केली आहे, असे मोदी म्हणाले.
लंडनमध्ये सलमान खुर्शिद यांनी निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयावर टीका केली. खुर्शिद यांनी देशातील दोन मान्यवर संस्थांवर टीका करण्यासाठी परदेशी भूमीचा वापर केला, असे मोदी म्हणाले.खुर्शिद कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, निवडणूक आयोगावर ताशेरे ओढण्यासाठी ते लंडनला गेले आहेत का, त्यांनी या संस्थेच्या कीर्तीला बट्टा लावला, काँग्रेसला आपला पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने आता त्यांनी सबबी शोधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे या प्रश्नात लक्ष घालणे ही पंतप्रधानांची जबाबदारी आहे, असेही मोदी म्हणाले.