आगामी काळात केंद्र सरकार कृषी व्यापार व्यवस्थापन संस्थांची संख्या वाढविण्याचा विचार करत असल्याची माहिती केंद्रीय कृषीमंत्री राधामोहन सिंग यांनी दिली. केंद्र सरकारने ‘किसान गोष्टी’ हा कार्यक्रम कर्नाटकसह विविध राज्यांतील कृषी विज्ञान केंद्रांत आयोजित केला होता. या कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांना शेतीविषयक महत्त्वाची माहिती मिळाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत माहिती उपलब्ध नसल्याबाबत शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, या योजनेची माहिती देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या सुचनेनुमुळे केंद्राने कृषी व्यापार व्यवस्थापन संस्था वाढविण्याबाबत प्रक्रिया सुरू केली आहे. कृषी विमा योजनेऐवजी प्रधानमंत्री विमा योजना सुरू करण्यात आल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले. केंद्र सरकार २० हजार टन कांदा खरेदी करणार कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी केंद्र सरकार २० हजार टन कांदा खरेदी करणार आहे. गतवर्षी कांद्याचे भाव ८० ते ९० रुपये प्रतिकिलो झाल्यावर केंद्र सरकारने ८ हजार टन कांद्याची खरेदी केली होती. केंद्राकडून करण्यात येणाऱ्या कांदा खरेदीचा आकडा २० हजार टनांवर पोहोचल्याची माहिती अन्न व ग्राहक व्यवहार मंत्री रामविलास पासवान यांनी दिली. केंद्राकडून खरेदी करण्यात आलेला कांदा उत्पादन कमी झाल्यावर बाजारपेठेत आणला जाणार असल्याचेही पासवान यांनी सांगितले.