अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड येथे शाळेच्या पहिल्याच दिवशी नवीन गणवेशाच्या ओढणीने गळफास घेत दहावीच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

जामखेडमध्ये राहणारी रेणुका काकडे (वय १६) ही विद्यार्थिनी नववीपर्यंत उस्मानाबादमधील कळंब येथे मामाच्या गावात शिकत होती. यावर्षी दहावीत रेणुका जामखेडमध्ये तिच्या आईवडिलांच्या घरी परतली. तिने जामखेडच्या महिला शाळेत प्रवेश घेतला होता. १ जून पासून दहावीच्या जादा तासाला देखील ती जात होती. मात्र, तिचा कळंबमधील शाळेतून तिला दाखला मिळाला नव्हता. त्यामुळे जामखेडमधील शाळेतील प्रवेशाची प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या पूर्ण झालेली नव्हती.

शुक्रवारी शाळेच्या पहिल्या दिवशी रेणुका शाळेत गेली नव्हती. तिने शुक्रवारी दुपारी नवीन गणवेशाच्या ओढणीनेच गळफास घेऊन आत्महत्या केली. रेणुकाने आत्महत्या का केली, याचा पोलीस तपास करत आहेत.