नांदेड जिल्ह्यातील हदगावमधील दोनशे गरीब शेतकरी रातोरोत श्रीमंत झाले आहेत. महामार्गासाठी या गावातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी काही महिन्यांपूर्वी संपादित करण्यात आल्या होत्या. याचा जवळपास ७९ कोटी रुपये मोबदला शेतकऱ्यांना मिळाला आहे. तुळजापूर, नागपूर यांना जोडून पुढे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गासाठी सुमारे ५ लाख ४४ हजार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली होती. आजूबाजूच्या ७ गावांतून हा राष्ट्रीय महामार्ग जाणार त्यामुळे काही महिन्यांपूर्वी आजूबाजूच्या गावातील शेतकऱ्यांकडून भूसंपादन प्रक्रिया पार पाडली होती. उप विभागीय अधिकारी महेश वडाडकर यांनी 'आज तक'ला दिलेल्या माहिनुसार यातील ६५ हजारांहून अधिक जमीन ही हदगावसह कवठा, अंबाला, बामणी, चिंचवड, करमोडी, वाकोडा यांसारख्या गावातून संपादित करण्यात आली होती. हदगावात गेल्या कित्येक वर्षांपासून पाण्याची समस्या भीषण होत चालली आहे. गावातील काही शेतकऱ्यांनी दृष्काळाला कंटाळून आत्महत्याही केली आहे पण भू संपादनातून मिळालेल्या मोबदल्यामुळे शेतकऱ्यांची अर्थिक परिस्थिती सुधारेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. 'इंडिया टुडे'च्या वृत्तानुसार या गावातील शेतकऱ्यांना ७९ कोटी मोबदला देण्यात आला आहे. काही शेतकऱ्यांना मोबदला अजूनही मिळायचा बाकी आहे पण येणाऱ्या काळात हा मोबदला नक्की मिळेल असाही विश्वास व्यक्त केला जात आहे.