आतापर्यंत किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ झाला, किती कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असे अनेक प्रश्न सरकारकडून विचारले जात आहेत. त्याची उत्तरं आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी टि्वटरवरून दिली आहेत. आतापर्यंत ११ हजार ४६८ कोटी रुपयांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

अजित पवार यांनी याबाबत सविस्तर टि्वट केले आहे. ते असे… “महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेंतर्गत शुक्रवार, दि. १३ मार्च २०२० पर्यंत राज्यातल्या १८ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण ११,४६८.३६ कोटी रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे.” याचाच अर्थ असा की १३ मार्चपर्यंत राज्यातील १७ लाख २ हजार ४३ शेतकऱ्यांना सरकारच्या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळाला आहे.

अजित पवार यांनी आणखी एक टि्वट करून कोणत्या बँकांमध्ये किती रक्कम जमा केली, हेही स्पष्ट केले आहे. त्यांनी टि्वट केले की, “जिल्हा सहकारी बँकांच्या माध्यमातून १० लाख ४ हजार ४४७ शेतकऱ्यांच्या खात्यात ५२७५.८६ कोटींची तर, व्यापारी बँकांच्या माध्यमातून ७ लाख ९७ हजार ५९६ शेतकऱ्यांच्या खात्यात ६१९२.५० कोटी रुपये एवढी रक्कम जमा करण्यात आली आहे.”