करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानं १ सप्टेंबरपासून दिल्लीसह राजस्थानमधील शाळा पुन्हा सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्रातही शाळा कधी सुरू होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत सरकारने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. मात्र, राज्यातील सर्व शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण करावेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.

आपला पाल्य ज्या शाळेत जातोय त्या शिक्षकांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाल्यास पालकांना दिलासा मिळेल, असेही अजित पवार म्हणाले. राज्यातील शाळा सुरू करण्याबाबतचा अंतिम निर्णय हा मुख्यमंत्री टास्कफोर्सशी चर्चा करुन घेणार आहेत. मात्र केंद्राकडून गर्दी करणारे उत्सव घरगुती पध्दतीने साजरे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काही राज्यात शाळा सुरू करण्यात आल्या मात्र काही दिवसातच विद्यार्थी पॉझिटिव्ह सापडले होते. शिवाय तिसर्‍या लाटेत सर्वाधिक रुग्ण केरळ राज्यात आणि दुसरा क्रमांक हा महाराष्ट्राचा लागत आहे. त्यामुळे केंद्रसरकारच्या आरोग्य विभागाने राज्याला काही सूचना केल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात करोनाची परिस्थिती सध्या आटोक्यात असली तर धोका कायम आहे. शिवाय लहान मुलांचं लसीकरण झालं नसल्याने आणि तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असल्याने शाळा सुरू झाल्यास करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढू शकतो. त्यामुळे सध्या खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरणासाठी पात्र असलेले शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचं प्राधान्यानं लसीकरण करण्यात यावं, अशा सूचना देण्यात आल्या आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनीदेखील सर्वच राज्यांना प्राधान्याने शिक्षकांचं लसीकरण करण्याचे आदेश दिले होते.