काँग्रेसच्या उतावीळ नेत्यांकडून सातत्याने 'सनातनवर बंदी घाला', ‘सनातनच्या प्रमुखांना अटक करा !’ अशी मागणी केली जाते आहे. काँग्रेसच्या नेत्यांची मागणी ही स्वतःची कातडी वाचवण्यासाठी सनातनला लक्ष्य करण्यासाठी आहे. त्यामुळे आधी अशाप्रकारे मागणी करणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांनाच अटक करा अशी मागणी सनातनने केली आहे. सनातन संस्थेने २०१५ आणि २०१८ मध्ये विखे-पाटलांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड केली. दुर्दैवाने भाजप शासनानेही अद्याप यावर काहीही कारवाई केली नाही. याचाच सूड घेण्याच्या भावनेतून विखेपाटलांची ही धडपड चालू आहे. सनातन संस्थेच्या प्रमुखांना अटक करा, अशी मागणी करण्याचा नैतिक अधिकार काँग्रेसला उरलेला नाही. काँग्रेस पक्षाचे महासचिव दहशतवादी डॉक्टर झाकीर नाईकची गळा भेट घेऊन त्यांच्या व्यासपीठावर जातात. झाकीरकडून ५० लाखांची मदत काँग्रेसला केली जाते. पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू भारतावर आक्रमण करणाऱ्या पाकिस्तानी लष्करप्रमुखांची गळाभेट घेतात. भारतातील सरकार बदलण्याची भाषा पाकिस्तानात करणाऱ्या मणिशंकर अय्यर यांची काँग्रेसने घरवापसी केली. अशात काँग्रेसला सनातनवर बंदी घाला असे म्हणण्याचा काय अधिकार आहे? असाही प्रश्न सनातनने विचारला आहे. नुकतेच मणिपूर काँग्रेस आमदाराच्या घरी पोलीस मुख्यालयातून चोरीला गेलेली शस्त्रास्त्रे सापडली, बोफोर्सपासून आदर्श-खाण घोटाळ्यापर्यंत ज्या काँग्रेसचे मंत्री भ्रष्टाचारात आकंठ बुडाले आहेत (ही यादी न संपणारी आहे) अशा काँग्रेसी पापांसाठी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी किंवा माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना अटक का करू नये? अशी जर कोणी मागणी केली, तर ती जेवढी हास्यास्पद ठरेल, तेवढीच हास्यास्पद आणि बालीश मागणी काँग्रेसी ‘विनोदी’पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील करत आहेत, असे सनातन संस्थेचे प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांनी म्हटले आहे. दाभोलकर हत्येचा तपास चालू होण्याआधीच ज्या पृथ्वीराज चव्हाणांनी या हत्येमागे उजव्या विचारसरणीचा हात आहे, अशी आवई उठवून तपास भरकटवला. त्यांचेच भाऊबंद असलेले राधाकृष्ण विखे पाटील हेही स्वतःची पापे झाकण्यासाठी सनातनवर बंदीसाठी थयथयाट करत आहेत. त्यासाठी ‘खोटे बोल पण रेटून बोल’ या काँग्रेसी तत्त्वानुसार सनातनवर खोटे आरोप करत आहेत. त्यामुळे सनातनवर बंदी येईल की नाही, हे काळ ठरवेल; पण विखे पाटलांना तुरुंगाची हवा खाण्यासाठी सनातनचा सिंहाचा वाटा नक्की असेल, हे त्यांनी लक्षात ठेवावे.