कोकणातील विद्यार्थ्यांना चित्रकला व रांगोळी स्पर्धेत जगासमोर आणण्याचा माझा प्रयत्न आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन सावंतवाडीनंतर गोवा राज्यातही भरविणार आहे. कोकणातील आतापर्यंत रांगोळीत ५० आणि चित्रकलेत १५ विद्यार्थी, तर मुंबईत ३५७ विद्यार्थी या क्षेत्रात निर्माण केल्याची माहिती श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेचे एस. बी. पोलाजी यांनी दिली. मुंबईत असताना सुमारे ३५७ विद्यार्थ्यांना चित्रकलेचे धडे दिले. हे सर्व विद्यार्थी देशविदेशात कार्यरत आहेत. सेवानिवृत्तीनंतर वाफोली येथे श्री स्वामी समर्थ जीवन विकास संस्थेची स्थापना करून विद्यार्थ्यांना चित्रकला व रांगोळीबाबत प्रशिक्षण देत आहे. त्याशिवाय मी वेळोवेळी स्पर्धाही घेतो. कोकणातील विद्यार्थी रांगोळी आणि चित्रकलेत जगात चमकावेत, अशी भावना त्यामागे आहे, असे श्री. पोलाजी म्हणाले. मुंबई व दिल्लीतही कोकणातील मुलांच्या चित्रकला, रांगोळीला स्थान मिळावे म्हणून पुढील काळात प्रयत्न राहतील, असे श्री. पोलाजी म्हणाले. सिंधुदुर्गच्या विद्यार्थ्यांत रांगोळी किंवा चित्रकलेचे कलागुण आहेत. त्यांना प्रोत्साहन देऊन प्रशिक्षण देण्यासाठी मी कार्य करीत आहे. सावंतवाडीची संयुक्ता कुडतरकर ही बी.एस. बांदेकर फाइन आर्टची विद्यार्थिनी, निरवडेचा सत्यम मल्हार हा सर जे. जे. स्कूल ऑफ आर्ट, तर दत्तराज नाईक हा बी.एफ.ए. गोवाचा विद्यार्थी आहे. गेले वर्षभर त्यांनी श्री. पोलाजी यांच्याकडून चित्रकलेचे धडे घेऊन सावंतवाडीच्या आर्ट गॅलरीत प्रदर्शन भरविले. या ५४ चित्रांच्या प्रदर्शनात १२ चित्रे पावणेदोन लाख रुपयांना विकले गेल्याची माहिती या वेळी देण्यात आली.