अशोक चव्हाणांचे बंजारा वस्त्यांमध्ये दौरे नांदेड : लोकसभा निवडणुकीत भोकर आणि मुखेड विधानसभा मतदारसंघात बंजारा समाजाचे मतदार काँग्रेस पक्षापासून दुरावल्याची बाब मतमोजणीनंतर समोर आल्यानंतर काँग्रेसचे नेते तसेच पक्षाचे बंजारा समाजातील प्रमुख कार्यकत्रे चक्रावून गेले आहेत. त्यांच्यावर आता चिंतनाची वेळ आली असून अशोक चव्हाण यांनी त्यापद्धतीने आपल्या दौऱ्याची आखणी केली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण यांना त्यांच्या हक्काच्या भोकर विधानसभा मतदारसंघात पाच हजार मतांची आघाडी मिळाली; परंतु गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांना व अमिता चव्हाण यांना मिळालेल्या आघाडीत यंदा मोठी घट झाली. भोकर तालुक्यात शहरी व ग्रामीण भागात काँग्रेसचे प्राबल्य असतानाही चव्हाण यांना ग्रामीण भागात जबर फटका बसला. त्यातच पिंपळढव, किनी या जि.प. गटांमध्ये लक्षणीय संख्येने असलेल्या बंजारा समाजाने भाजपला एकगठ्ठा मतदान केल्यामुळे काँग्रेसने पुढे आणलेल्या बंजारा समाजातील प्रमुख स्थानिक नेत्यांच्या मर्यादा स्पष्ट झाल्या. काँग्रेसने मागील काळात भोकर पंचायत समितीच्या सभापतिपदी आधी कमलाबाई जाधव आणि नंतर झिमाबाई चव्हाण या बंजारा समाजातील महिलांना संधी दिली. भोकर बाजार समितीत याच समाजातील अप्पाराव राठोड, गणेश राठोड यांना उमेदवारी देऊन नंतर राठोड यांना उपसभापती करण्यात आले. नगरपालिकेत डॉ. अनिता नाईक प्रतिनिधित्व करतात. मागील काळात भारतीबाई पवार, वसंत जाधव यांनाही पक्षाने महत्त्वाची साथ दिली. बंजारा समाजाला न्याय देण्याची भूमिका सातत्याने घेतल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत हा समाज काँग्रेसपासून दुरावल्याचे समोर आल्यामुळे चव्हाण यांच्या गोटात खळबळ माजली आहे. मागील दहा वर्षांत अशोक चव्हाण व अमिता चव्हाण यांनी भोकर तालुका व इतर भागातील वाडी-तांडय़ांवर विशेष लक्ष दिले होते. रस्ते व इतर सोयीसुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला. निवडणूक प्रचारादरम्यान भाजप उमेदवार वाडी-तांडय़ांवर फिरकलाही नाही, असे असतानाही बहुसंख्य वाडी-तांडय़ांवर काँग्रेसची पिछेहाट झाल्यानंतर काँग्रेसने आपला मोर्चा पुन्हा तिकडे वळवला आहे. चव्हाण यांचे दौरे सुरू झाले आहेत. ज्याठिकाणी मोठा फटका बसला, अशा ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन ते ग्रामस्थांशी संवाद साधत आहेत. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने वाडी-तांडय़ांवरील प्रचाराची धुरा माजी जि. प. सदस्य रोहिदास जाधव, नगरसेवक उत्तम चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील गटाकडे सोपविली होती. हे दोघेही सक्रिय राजकारणात आहेत. दुसऱ्या बाजूला चिखलीकर यांच्यासाठी नांदेडमधील सुरेश राठोड व रमेश राठोड हे व्यावसायिक बंधू वाडी-तांडे पिंजून काढत होते. या मंडळींनी रामराव महाराजांचा संदेश बंजारा समाजात व्यवस्थित प्रसृत केला. त्यातून वाडी-तांडय़ांवर भाजपला मोठी आघाडी मिळाली. जाधव यांच्यापेक्षा राठोड बंधू वरचढ ठरल्याचे दिसून आले