औरंगाबादमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात झालेल्या वादामुळे तणाव निर्माण झाला. शहरातील काही भागांमध्ये जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. हिंसाचारात दोघांचा मृत्यू झाला. गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या भागात तणाव निर्माण झाला. या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवल्याचे समजते.  दगडफेकीत २५ जण जखमी झाले असून यात पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गांधीनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला. याचे पडसाद काही वेळाने गांधीनगर, मोती कारंजा, रोजा बाग या सिटी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिसरात उमटले. समाजकंटकांनी दुकाने तसेच वाहनांची जाळपोळ केली. जमावाला पांगवण्यासाठी आलेल्या पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत स्थानिक तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. एकूण २५ जण या दगडफेकीत जखमी झाल्याचे वृत्त आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शहरातील तणावपूर्ण वातावरणाच्या पार्श्वभूमीवर जालन्यावरुन अतिरिक्त कुमक मागवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जाळपोळीच्या घटनेमुळे शहागंज भागात घरात एका सिलिंडरचा स्फोट झाल्याचे वृत्त आहे.