मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पंतप्रधानांशी संवाद साधताना अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांवर निशाणा साधत थेट तक्रार केली. काही राजकीय पक्ष जनतेच्या जीवाशी खेळत आरोग्याचे नियम मोडत रस्त्यावर उतरून राजकीय आंदोलने करत आहेत. त्यांना परिस्थितीची कल्पना देऊन योग्य ती समज द्यावी अशी सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. दरम्यान यावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“…रस्त्यावर उतरून राजकारण करतायत,” उद्धव ठाकरेंची थेट मोदींकडे तक्रार

“निष्क्रिय सरकारविरूद्ध मोठा रोष जनतेत आहे. शेतकर्‍यांना कोणतीही मदत नाही. वीजबिलांचा घोळ त्यामुळे मोठा असंतोष आहे आणि तो या निवडणुकीतून व्यक्त होईल. आमच्या एकाही आंदोलनाची दखल घेतली नाही, एकाही पत्राला उत्तर नाही, कधी कोणती बैठक घेत नाही. या सरकारला प्रश्न सोडवायचे नाही. अशावेळी जनतेचे दु:ख मांडले गेले पाहिजेत आणि तेच आम्ही आंदोलनांच्या माध्यमातून मांडतो आहोत,” असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे. पुढे ते म्हणाले की, “आम्हाला आनंद आहे की किमान पंतप्रधानांकडे तक्रार करण्यापुरती तरी त्यांनी आमच्या आंदोलनाची दखल घेतली आहे”.

“मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकारकडून केवळ वेळकाढूपणा चालू आहे. त्यामुळे केवळ मराठाच नाही, तर सार्‍याच समाजातील विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान केले जात आहे. मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रारंभीपासून सरकारने लक्षच दिले नाही,” असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

“मी मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राची प्रगती गुजरातपेक्षा जास्त वेगाने झाली. आमच्या सरकारच्या काळात गुजरातपेक्षा अधिक गुंतवणूक महाराष्ट्रात आली. महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर आणलं,” असंही ते म्हणाले आहेत. “आम्ही टीका केली की महाराष्ट्रद्रोही ठरत नाही. जनतेला सारे काही समजते. शिवसेना म्हणजे महाराष्ट्र असा समज त्यांनी करून घेऊ नये,” असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

“आज आम्ही सक्षम विरोधी पक्षाच्या भूमिकेत आहोत. सरकार पडण्याची वाट पाहत बसलेलो नाही. पण, हेही तितकेच खरे आहे की, अशी अनैसर्गिक सरकारे फार काळ चालत नाहीत. ज्यादिवशी पडेल, त्यादिवशी एक सक्षम सरकार राज्याला देऊ,” असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलं आहे.