भारताला १५ ऑगस्ट १९९७ ला भारताला स्वातंत्र्य मिळाले असे आपल्या भाषणात म्हणत भाजपाच्या मिरा भाईंदरच्या महापौर डिंपल मेहता यांनी आपले अज्ञान उघड केले आहे. या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. १५ ऑगस्टला देशाचा स्वातंत्र्य दिन असल्याने देशभरात राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्याचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. मिरा भाईंदर महापालिकेतर्फेही असाच कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याच कार्यक्रमात डिंपल मेहता यांनी १५ ऑगस्ट १९९७ ला भारत स्वतंत्र झाल्याचा उल्लेख केला. पाहा व्हिडिओ भाजपाच्या महापौर म्हणतात देशाला १९९७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले #BJP #भाजपा @BJP4Maharashtra @BJP4India @Dev_Fadnavis @LoksattaLive pic.twitter.com/JjINXohK7Y — LoksattaLive (@LoksattaLive) August 18, 2018 यानंतरही डिंपल मेहता यांनी आपल्या भाषणात अनेक चुका केल्या. मात्र त्या सुधारण्याऐवजी आमदार नरेंद्र मेहता यांनी टाळ्या वाजवल्या. हे पाहून जमलेल्या नागरिकांनाही आश्चर्याचा धक्काच बसला. भाजपाचे कार्यकर्ते काही बोलू शकले नाहीत. डिंपल मेहता या कागदावर लिहून आणलेले भाषण वाचून दाखवत होत्या, तरीही त्यांना भारताला स्वातंत्र्य १९४७ ला मिळाले हे सांगता आले नाही. मिरा भाईंदरमध्ये अशा प्रकारच्या चुका होण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीही भाजपाचे नगरसेवक आनंद मांजरेकर यांनी मिरारोडचे वीरपुरत्र मेजर कौस्तुभ राणे शहीद झाल्याचे वृत्त येऊनही आपला वाढदिवस साजरा केला होता. या वाढदिवसाला डिंपल मेहता आणि नरेंद्र मेहता या दोघांनीही हजेरी लावली होती.