जालना : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी येथे राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची संभावना प्रेतयात्रा म्हणून केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जालना शहरात आली असताना दानवे जाहीर सभेत बोलत होते. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

यावेळी दानवे म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रांना जनतेचा प्रतिसाद मिळत नाही. जनता काय पक्षातील नेत्यांनीही त्यांच्या यात्रांकडे पाठ फिरवली आहे. उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेस त्यांच्या पक्षातील नेते डॉ. पद्मसिंह पाटील गैरहजर होते. राष्ट्रवादीची यात्रा ही प्रेतयात्रा आहे.

जे. पी. नड्डा म्हणाले, मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी काँग्रेसकडून देशात मतपेटीचे राजकारण सुरू होते. भाजप सत्तेत आल्यावर तुष्टीकरणाचे राजकारण बंद झाले. काश्मीरच्या संदर्भातील ३७० कलम रद्द करणे किंवा तीन तलाक प्रथा बंद करण्यास काँग्रेसने व्होट बँक समोर ठेवून विरोध केला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात गेल्या पाच वर्षांत केंद्र आणि राज्य सरकारने केलेल्या विकासकामांची माहिती दिली. जालना जिल्ह्य़ात झालेल्या विकासकामांचा उल्लेख करून मराठवाडा वॉटरग्रीडसारखी महत्त्वाची योजना हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांचे भाषणही यावेळी झाले. तत्पूर्वी भोकरदन येथील जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार संतोष दानवे यांच्या कामाचे कौतुक केले. संतोष दानवे सर्वात तरुण आमदार असून ‘बाप से बेटा सवाई’ आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले.

 

पक्षात येणाऱ्यांना स्वच्छ करून घेतो

आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. इतर पक्षांतून येणाऱ्यांना आम्ही गुजरातमधील वॉशिंग पावडर वापरून स्वच्छ करून घेतो, असे दानवे म्हणाले. केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून मागील पाच वर्षांत जालना जिल्ह्य़ात झालेल्या विकासकामांचा तपशीलही दानवे यांनी यावेळी दिला.