गुंड प्रवृतीच्या मंत्री यशोमती ठाकूर यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावी अशी मागणी भाजपाने केली आहे. एवढंच नाही तर एका महिलेच्या मागे आता अख्खा भाजप लागेल अशी प्रतिक्रिया देऊन न्यायालयाने दोषी ठरवलेल्या राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न चालवला आहे. स्वतःच्या दुष्कृत्याला लपवण्यासाठी असा केविलवाणा प्रयत्न करण्यापेक्षा नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी आमदारकीचा व मंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी टीका भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

यशोमतीताईंना अमरावती जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवले आहे. त्यांनी जे काही दुष्कृत्य केले तो म्हणजे निव्वळ आणि निव्वळ सत्तेचा माज होता. २५ मार्च २०१२ रोजी राज्यात काँग्रेसचे शासन असताना घडलेला हा प्रसंग आहे. वाहतुकीसाठी बंद असलेल्या रस्त्यावर म्हणजे वनवे वर आपली कार अडवली म्हणून उल्हास रौराळे या पोलिसाला त्यांनी मारहाण केली होती. ड्युटीवर असलेल्या वर्दीधारी पोलिसाला मारहाण करण्याच्या प्रकरणी यशोमतीताईंना भाजपाने नव्हे न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भाजपा नेत्यांवर तोंडसुख घेताना त्या वारंवार मारण्याची भाषा बोलतात. संस्कार आडवे येतात नाही तर मारले असते, असे उद्गार त्यांनी नुकतेच काढले होते. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना राडा करण्याचा जाहीर मंत्र दिला होता. एक वेळ राजकीय आंदोलनात भावनेच्या भरात हातून गुन्हा घडतो, ते ही एकवेळ आपण समजू शकतो. पण कर्तव्याची चाड बाळगणाऱ्या व आग्रही पोलिसाच्या थोबाडीत हाणणे, कितपत योग्य आहे ? असाही प्रश्न शिवराय कुळकर्णी यांनी विचारला.

एरवी संविधानाचा बाऊ करून राजकारण करणाऱ्या यशोमतीताईंना पोलिसाला मारताना संविधानाचा विसर पडला होता का ? एका पोलिसाला मारहाण करण्यात दोषी ठरवल्या गेलेली व्यक्ती समाजातील पीडितांना न्याय देईल अशी अपेक्षा कशी करायची ? हा सर्व घटनाक्रम पाहता यशोमतीताईंवर कुठले संस्कार आहेत, हे जनतेला स्पष्टपणे दिसले आहे. त्यावर अधिक खुलासा करण्याची गरज नाही.