खारोशी (ता. महाबळेश्वर) येथे वृद्ध महिलेच्या अंत्ययात्रेवेळी ओढ्यावरील पुल कोसळल्याने ८ जण जखमी झाले. ही घटना आज (रविवार) सकाळी दहाच्या सुमारास घडली. यात ६ जण किरकोळ जखमी झाले असून दोघांना जबर मुक्का मार लागला आहे. त्यांना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा पूल नादुरूस्त असल्याने हा अपघात झाल्याचे सांगण्यात येते.

खारोशी हे गाव महाबळेश्वरपासून ४० किमी अंतरावर असून या गावातील कृष्णाबाई कदम यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार होते. ओढ्यावरील जुन्या लोखंडी पुलावरून अंत्ययात्रा नेत असताना तो पूल कोसळला यात भीमराव भागू कदम, अशोक चांगू कदम, शंकर चांगू कदम, रामचंद्र कदम, विजय शंकर कदम, राजेश शंकर कदम, रमेश भीमराव कदम आणि रमेश (मुल्या) धोंडू कदम हे जखमी झाले. यातील दोघांना पाचगणी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.