जिंतूर व सेलू तालुक्याच्या मध्यवर्ती भागात आडगाव येथे १२० एकर जमिनीवर श्रीतुळजाभवानी साखर कारखाना उभारणीचे काम प्रगतिपथावर आहे. येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये गळीत हंगाम सुरू होईल, असा विश्वास आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांनी पत्रकार बठकीत व्यक्त केला.खासगी तत्त्वावर श्रीतुळजाभवानी साखर कारखाना उभारणीपूर्वी बऱ्याच अडचणी आल्या. काही तांत्रिक बाबींमुळे कारखाना उभारण्याचे काम काही दिवस अडकले होते. परंतु आता सर्व अडचणींतून मार्ग काढत कारखाना उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कारखान्यासाठी आवश्यक सर्व यंत्रसामग्री आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील वैष्णवी साखर कारखाना खरेदी करून या कारखान्याची यंत्रणा येथे वापरण्यात येत आहे, अशी माहिती बोर्डीकर यांनी दिली. गेल्या चार महिन्यांपासून कारखाना उभारणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत ५ गोदामे व ७२ मीटर उंचीच्या चिमणीचे काम सुरू आहे. ऑगस्टअखेपर्यंत गव्हाणीच्या बांधकामासह इतर बांधकामे पूर्ण होतील. येत्या नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये चाचणी गळीत हंगाम सुरू करण्याचा आपला प्रयत्न असून, पहिल्या वर्षी दीड ते दोन लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे ठरविले असल्याचे बोर्डीकरांनी सांगितले. जिंतूर मतदारसंघात पहिलाच साखर कारखाना होत असल्याने ५०० ते ६०० बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळणार आहे. तसेच कारखान्यापासून १० ते १५ किलोमीटरमध्ये नवीन व्यवसायास संधी उपलब्ध होतील. कार्यक्षेत्रात जवळपास २ लाख मेट्रिक टन ऊस उपलब्ध आहे. कारखान्याच्या वतीने ५०० शेतकऱ्यांना उसाची बेणे पुरविण्यात आली असून, भविष्यात हा कारखाना या परिसरातील जनतेचे जीवनमान बदलून टाकणारा, अर्थकारणाला चालना देणारा प्रकल्प ठरावा अशी आपली अपेक्षा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. या वेळी लोकसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नागसेन भेरजे, सुनील भोंबे, दत्ताराव महाराज मगर, गंगाधर आडळकर, सरपंच मधुकर काकडे, प्रभाकर वाघीकर आदी उपस्थित होते.