चवदार तळे सत्याग्रहाच्या ८८ व्या वर्धापन दिनानिमित्त महाड येथे उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने बाबासाहेब आंबेडकरांचे लाखो अनुयायी देशाच्या कानाकोपऱ्यातून रायगडात दाखल झाले होते. रायगडचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी शुक्रवारी महाड येथे जाऊन चवदार तळ्याच्या ठिकाणी असलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. नागपुरातील दीक्षाभूमी आणि दादर येथील चत्यभूमीसाठी शासनाकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा यापुढे महाड येथे २० मार्चला होणाऱ्या क्रांतिदिनासाठी उपलब्ध करून दिल्या जातील अशी घोषणा त्यांनी या वेळी दिली.२० मार्च १९२७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी महाड येथील चवदार तळ्यावर पिण्याच्या पाण्याचा सत्याग्रह करून हे तळे दलितांनाही पिण्याच्या पाण्यासाठी खुले करून दिले होते. देशातील सामाजिक समतेचा हा पहिला सत्याग्रह होता. त्यामुळे हा दिवस क्रांतिदिन म्हणूनही ओळखला जातो. या ऐतिहासिक घटनेला आज ८८ वष्रे पूर्ण झाली. या वर्धापन दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भीमसनिकांचा ओघ महाडकडे सुरू असून चवदार तळे आणि क्रांतिस्तंभ परिसराला उत्सवाचे स्वरूप आले आहे. आंबेडकरी साहित्याची पुस्तके, भगवान गौतम बुद्ध, बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्त्यां त्याचप्रमाणे बौद्ध धर्माच्या प्रतीकांची विक्री करणारी दुकाने ठिकठिकाणी थाटण्यात आली असून त्या ठिकाणी खरेदीसाठी भीमसनिकांनी प्रचंड गर्दी केली होती. महाड शहरात मोठय़ा प्रमाणावर भीमसनिक येणार असल्यामुळे महाड नगरपालिकेने फिरती शौचालये तसेच ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.