२००८ मधील मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील प्रमुख आरोपी आणि कर्नल प्रसाद पुरोहित यांच्या भवितव्याचा फैसला आता १६ जुलैला होणार आहे. कर्नल पुरोहित यांनी मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून आरोपमुक्त करावे अशी मागणी याचिकेतून केली आहे. आज मुंबई हायकोर्ट याप्रकरणी निकाल देण्याची शक्यता होती. मात्र न्यायालयाने निकाल राखीव ठेवला असून १६ जुलैला अंतिम निकाल देणार आहे. मालेगावमधील २००८ मधील बॉम्बस्फोटांप्रकरणी १० वर्षांपूर्वी कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्यात आली होती. ऑगस्ट २०१७ मध्ये कर्नल पुरोहित यांना सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केला होता. कर्नल पुरोहित यांच्यावतीने नुकतीच मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. आपल्याला दोषमुक्त करावे, अशी त्यांची मागणी आहे. तसेच यापूर्वी त्यांनी केलेल्या आणि हायकोर्टाने फेटाळून लावलेल्या सर्व निर्णयांना आव्हान देण्याची मागणीही पुरोहित याने याचिकेद्वारे केली आहे. Lt. Colonel Purohit outside Bombay High Court after the Court admitted his discharge application; Final hearing in 2008 Malegaon blast case to be on July 16. pic.twitter.com/33e5c4ie2f — ANI (@ANI) June 22, 2018 कर्नल पुरोहित यांच्याविरोधात खटला चालवण्यास सरकारने दिलेल्या मंजुरीचा निर्णय रद्द करण्यास हायकोर्टाने नकार दिला होता. त्यानंतर खटल्यातून दोषमुक्त करण्याची त्यांची मागणी विशेष राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) न्यायालयाने फेटाळून लावली होती. ‘मोक्का’अंतर्गत ठेवण्यात आलेले आरोप विशेष न्यायालयाने रद्द केल्याच्या पार्श्वभूमीवर पुरोहित यांनी ही मागणी केली होती. या दोन्ही निर्णयांविरोधात पुरोहित यांनी नव्याने याचिका केली आहे. त्यांच्या याचिकेवर हायकोर्ट शुक्रवारी निर्णय देण्याची शक्यता आहे. कर्नल पुरोहित यांचे म्हणणे काय? माझ्यावर आरोप ठेवण्यापूर्वी एनआयएने लष्कराची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे माझ्यावर हा खटलाच दाखल करता येत नाही, असा दावा कर्नल पुरोहित यांनी केला आहे. तर पुरोहित यांच्या दाव्यावर ‘एनआयए’ने आक्षेप घेतला आहे.