“सारथी संस्था बंद होणार, या अफवा पसरवून भाजपा हीन राजकारण करत आहे. परंतु सारथी संस्था बंद होणार तर नाहीच, पण ती अधिक मजबूत केली जाईल. ज्या भाजपा नेत्यांनी सारथी संस्थेच्या उद्घाटनाला झालेल्या खर्चाची देयके थकवली. त्या पक्षाच्या नेत्यांनी संस्था कशी चालवायची याचे ज्ञान आम्हाला देऊ नये. तसेच भाजपा सरकारच्या काळात विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशातून लाखोंच्या गाड्या घेतल्या गेल्या. याची चौकशी का नको?” असा सवाल काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपाला विचारला आहे.

सारथी संस्थेवरून सध्या राजकारण तापल्याचं दिसत आहे. विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही सुरू केलेली संस्था बंद पाडण्याचे सुरू असल्याचं म्हटलं होतं. त्यावरून सचिन सावंत यांनी भाजपाला प्रत्युत्तर दिलं आहे. “सारखी संस्था बंद पडणार असल्याच्या अफवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. परंतु मराठा समाजातील ५० पेक्षा अधिक लोकांच्या मृत्यूला त्यांचेच सरकार कारणीभूत ठरले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या संस्थेची काय अवस्था होती, हे मराठा समाजाला आठवत असल्याने ते अशा राजकारणाला बळी पडणार नाहीत. जानेवारी २०१७ पासून वीसपेक्षा अधिक महिने साधा एक कर्मचारीही या संस्थेला दिला नव्हता. फडणवीस यांनी उद्घाटन करुनही अनेक महिने कामकाज सुरू झाले नव्हते. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करुनही अनेक महिने निधीची तरतूदही केली नव्हती. मुख्यमंत्री म्हणून सारथीच्या कार्यालयाचे फडणवीस यांनी उद्घाटन केले, पण त्यानंतर उद्घाटनाला झालेल्या खर्चाची बिले न दिल्याने थकबाकीदार कार्यालयात ठाण मांडून बसले होते,” अशी टीका सावंत यांनी केली.

आणखी वाचा- सरकार पडणार?, मराठा आरक्षण व सारथी; तिन्ही प्रश्नांवर देवेंद्र फडणवीस म्हणाले…

“सारथीतून विद्यार्थ्यांना ज्या निधीचा लाभ मिळाला पाहिजे, त्यातून लाखोंचे मानधन भाजपा विचारांच्या लोकांना मिळाले. मराठा आंदोलक त्यांचा राजीनामा का मागत होते याचे उत्तर भाजपाने द्यावे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशातून लाखोंच्या गाड्या घेतल्या गेल्या. याची चौकशी का नको? मराठा समाजाची भाजपा दिशाभूल करत आहे, परंतु ते या अफवांना बळी पडणार नाहीत. सारथी बंद तर होणारच नाही, पण समाजाच्या हितासाठी अधिक मजबूत केली जाईल,” असेही सावंत म्हणाले.

आणखी वाचा- या पुढच्या काळात लॉकडाउन झेपणार नाही : चंद्रकांत पाटील

“सत्तेवर येताच १०० दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ, असे आश्वासन दिलेल्या भाजपाने चार वर्षे सत्ता भोगल्यानंरही आरक्षणाचा निर्णय घेतला नव्हता. आरक्षणाला टाळटाळ करत सारथीचे गाजर फडणवीस यांनी दाखवले होते. पण, त्याचा कारभार कसा सुरु होता याची सर्वांना माहिती आहे. सारथीचा अहवाल देण्यासाठी सुद्धा १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता खोटी, दिशाभूल करणारी माहिती पसरवून मराठा समाजात विष कालवण्याचे उद्योग बंद करावेत,” आरोप सावंत यांनी केला.