पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोनामुळे देशात आलेला अंध:कार घालवण्यासाठी रविवारी पाच एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी घरातील लाईट बंद करुन दिवे पेटवण्याचं आवाहन केलं आहे. मात्र आता अनेकांनी एकाच वेळी लाईट्स बंद केल्यामुळे तांत्रिक अडचण निर्माण होऊन विजपुरवठा संपूर्ण राज्यच अंधारात जाईल अशी भीती राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच एप्रिल रोजी सर्वांना घरातील लाईट्स बंद करुन दारामध्ये किंवा बाल्कनीत दिवे अथाव बॅटरी अथवा मेणबत्ती अथवा मोबाईल प्लॅश लाइट लावून हा करोनाचा अंध:कार पळवून लावूयात असं आवाहन केलं आहे. मात्र असं केल्यास तांत्रिक अडचण निर्माण होईल अशी भीती महाराष्ट्राच्या ऊर्जामंत्र्यांनी व्यक्त केली आहे. “सर्व लाइट्स एकाच वेळी बंद केले तर त्यामुळे विजपुरवठा करणारा इलेक्ट्रीक ग्रीड निकामी होऊ शकतो. सर्व अत्यावश्यक सेवा कोलमडून पडतील. ग्रीड फेल्युअर झाल्यास पुन्हा लाईट येण्यास आठवडाभराला वेळ लागू शकतो. त्यामुळे मी लोकांना आवाहन करतो की दिवे आणि मेणबत्त्या लावा मात्र लाईट्स बंद करु नका,” असं राऊत म्हणाले आहेत.

“देशातील सर्वांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास विजेची मागणी एकदम कमी होईल. आधीच (लॉकडाउनमुळे कंपन्या बंद असल्याने) वीजनिर्मिती आणि मागणी याचं गणित बिघडलं आहे. जर सर्वांना एकाच वेळी लाइट बंद केले तर परिस्थिती अजून बिकट होईल. एवढ्या लोकांनी एकाच वेळेस लाईट बंद केल्यास राज्यातील तसेच केंद्रीय ग्रीड हाय फ्रिक्वेन्सीवर निकामी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे अशा विधानांचा पुनर्विचार व्हावा. तसेच लाईट बंद न करता दिवे लावावेत अशी माझी आपणा सर्वांना विनंती आहे,” असं राऊत यांनी म्हटलं आहे.

“सद्य परिस्थितीत महाराष्ट्राची मागणी २३ हजार मेगावॅट वरून १३ हजार मेगावॅटवर आलेली आहे. लॉकडाउनमुळे इंडस्ट्रियल लोड पूर्णतः शून्य आहे. १३ हजार मेगावॅट हे फक्त अत्यावश्यक सेवा आणि घरगुती विजेचा लोड आहे. जर सर्वांनी अचानक दिवे बंद केले तर ग्रीड फेल होऊन सर्व पॉवर स्टेशन हाय फिक्वेन्सीवर ट्रिप होतील. संपूर्ण राज्य अंधारात जाईल. महाराष्ट्रसारखे मोठे पॉवर डिमांड असलेले राज्यात जर ग्रीड फेल्युअरमुळे सर्व पॉवर स्टेशन बंद पडले तर मल्टी स्टेट ग्रीड फेल्युअर होईल आणि पूर्ण देश अंधारात जाईल. हॉस्पिटल सेवा विस्कळीत होतील. एक पॉवर स्टेशन सर्विसमध्ये यायला साधारण १६ तास लागतात याप्रमाणे सर्व परिस्तिथी नॉर्मल व्हायला साधारण एक आठवडा जाईल. म्हणून मला जनतेला सल्ला द्यायचा आहे. आपण करणाऱ्या या कृतीचा पुनर्विचार करावा आणि करोनाविरुद्धच्या युद्धामध्ये वीज हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या वीजेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण आम्हाला सहकार्य करावं,” असं आवाहन राऊत यांनी केलं आहे.

दरम्यान, अशा संदर्भात उत्तर प्रदेश वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक पार पडल्याचेही वृत्त आहे. त्यामुळेच यासंदर्भात आता केंद्राकडून किंवा केंद्रिय ऊर्जा मंत्रालयाकडून काही स्पष्टीकरण येते का हे पहावे लागणार आहे.