बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या तीव्र चक्रीवादळाचा परिणाम म्हणून महाराष्ट्रात दसऱ्यासह पुढील चार-पाच दिवस मळभ कायम राहणार आहे. त्याचबरोबर, राज्याच्या अनेक भागांत पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता असून, विशेषत: विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात त्याची तीव्रता अधिक असेल, असे पुणे वेधशाळेकडून सांगण्यात आले.
या चक्रीवादळाचा तडाखा मुख्यत: पूर्व किनारपट्टीवर बसणार आहे. महाराष्ट्रात त्याचा फारसा प्रभाव नसण्याची शक्यता आहे. याबाबत पुणे वेधशाळेच्या अधिकारी डॉ. सुनीता देवी यांनी सांगितले की, चक्रीवादळाचे केंद्र आणि गुजरातमधील सौराष्ट्र किनारपट्टीदरम्यान सध्या हवेच्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचा परिणाम म्हणून येत्या गुरुवापर्यंत महाराष्ट्रात ढगाळ वातावरण असेल. अनेक ठिकाणी पाऊसही पडेल. शनिवारी आणि रविवारी पावसाचे प्रमाण जास्त असेल. त्याची तीव्रता मुख्यत: उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकण आणि विदर्भात अधिक असेल. विदर्भात काही ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी पडण्याची शक्यतासुद्धा आहे. दरम्यान, पुणे, मुंबईसह राज्यात अनेक ठिकाणी शुक्रवारीसुद्धा पावसाच्या सरी पडल्या. शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत ठिकठिकाणी पडलेला पाऊस असा (मिलिमीटरमध्ये)- सांताक्रुझ (मुंबई) ०.४, डहाणू १, रत्नागिरी ३, महाबळेश्वर १, जळगाव ४, अहमदनगर १, वर्धा ९, अमरावती ३, औरंगाबाद २.
जळगावमध्ये ५ बळी
जळगाव जिल्ह्य़ात बामणोद येथे गुरूवारी रात्री अतिवृष्टीमुळे जुन्या घराची भिंत कोसळून रहिम पिंजारी यांच्या कुटुंबातील अलिशानबी (३२), शमिनबी (१८) या दोन्ही बहिणींसह राजू (६), समीर (४) आणि अफजल (९) यांचा मृत्यू झाला.