राज्यात सरकार पाडण्यापासून ते सारथी संस्थेपर्यंत अनेक मुद्यांवरून वातावरण गरम आहे. पोलिसा रद्द करण्यात आलेल्या बदल्या, सरकार पाडण्याची तयारी सुरू असल्याचा शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केलेला दावा आणि मराठा आरक्षणासंदर्भात सुरू असलेल्या चर्चेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.

ठाण्यात करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी करून फडणवीस यांनी आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी करोना व्यतिरिक्त राज्यात चर्चेला असलेल्या मुद्यांवर भाष्य केलं. पोलिसांच्या बदल्या अचानक रद्द करण्याच्या प्रश्नावर फडणवीस म्हणाले,”पोलिसांकडे आस्थापना मंडळ असते. ते मंडळ बदल्या ठरवीत असतात. समन्वयाचा अभाव तर आहेच. पण विश्वासाचा सुद्धा मोठा अभाव सरकारमध्ये दिसतो आहे,” असं फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- रुग्णांची लूट थांबवा, ठाण्यातून २ ते ३ रुग्ण बेपत्ता; देवेंद्र फडणवीसांची सरकारला विनंती

“मराठा आरक्षण हा राजकारणाच्या पलीकडचा विषय आहे. आम्ही जेव्हा आरक्षण दिले, तेव्हा सर्व पक्षांना विश्वासात घेतले. मोठी टीम तयार करून आम्ही काम करीत होतो. राज्य सरकारने याकडे अधिक लक्ष देण्याची गरज आहे. राज्य सरकारला आमची जी काय मदत हवी असेल, ती द्यायला आम्ही तयार आहोत. त्याचप्रमाणे सारथी संस्था आमच्या काळात स्थापन झाली, म्हणून ती खिळखिळी करण्याचा प्रकार योग्य नाही,” असं फडणवीस म्हणाले.

आणखी वाचा- मराठा समाजाला अशा पद्धतीनं बदनाम करणं योग्य नाही – खा. छत्रपती संभाजीराजे भोसले

आमच्यासाठी १२ आमदारांपेक्षा…

राज्यातील सरकार पाडण्यासाठी पैजा लागल्याचा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी एका लेखात केला होता. त्यावर फडणवीस म्हणाले,”हे सरकार आम्ही पाडणार नाही. ते अंतर्विरोधाने पडेल. १२ आमदारांपेक्षा महाराष्ट्राची १२ कोटी जनता आमच्यासाठी महत्वाची आहे. करोनावरून लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार नव्या कपोलकल्पित कथा रचणे योग्य नाही,” असं फडणवीस म्हणाले.