तारापूर स्फोटातील मृताचे पार्थिव घेवून जाणाऱ्या नातेवाईकांना तब्बल 14 तासानंतर पोलिसांनी सोडले आहे. अगोदरच दुखा:चा कोसळलेला डोंगर त्यात लॉकडाउनची शिक्षा यामुळे सात लोकांना राजापूर पोलिसांनी ताब्यात घेत त्यांना विलगीकर करत ग्रामीण रूग्णालयात ठेवले होते.

लॉकडाउनमध्ये झालेल्या भीषण स्फोटात तारापूर संपूर्ण हादरले होते. या स्फोटात घटनास्थळीच मृत्यू झालेले विजय सावंत यांचे पार्थिव त्यांच्या मूळ गावी सावंतवाडी तालुक्यातील कलंबिस्त येथे नेण्यासाठी त्यांचे नातेवाईक बोईसर येथून निघाले होते. मात्र कुडाळ येथे मंगळवारी सकाळी पोलिसांनी वाहन थांबवून मृतदेहासह इतर दोन जणांना पुढे पाठवले व इतर लोकांना माघारी जाण्यासाठी सांगितले.

बोईसरहुन निघालेल्या रुग्णवाहिकेसोबत असलेले वाहन बोईसरपासून कुडाळपर्यंत सर्व तपासणी नाक्यावर सोडण्यात आले होते. यातच पार्थिवा सोबत जाणाऱ्या सर्वांची वैद्यकीय तपासणी करून नंतर ते बोईसर भागातून निघाले होते. तरी देखील त्यांना कुडाळ येथे अडवून माघारी परतण्यासाठी सांगितले त्यानुसार एका वाहनामध्ये मृत्यू झालेल्या विजय सावंत यांचे नातेवाईक असलेले सात लोक माघारी परतत असताना त्यांना राजापूर मध्ये टोल नाक्यावर सकाळी 8:30 वाजता अडविण्यात आले. त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करून 14 दिवस विलगीकरण करणार असल्याचे रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने सांगितले होते. महत्त्वाचे म्हणजे वैद्यकीय तपासणी मध्ये कोणत्याही प्रकारची करोना लक्षणे नसताना अडवून केल्यामुळे त्यांना सोडण्यासाठी पालघर खासदार राजेंद्र गावित यांनी पोलिस प्रशासनाला संपर्क साधून  संबंधित नातेवाईकांना सोडण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यानुसार रात्री नऊ वाजल्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून तब्बल 14 तासानंतर राजापूर पोलिसांनी त्यांना सोडले.