धुळ्यातील दंगलीमध्ये मृत्युमुखी पडलेल्या सहापैकी चार जणांच्या पाठीवर पोलिसांनी गोळीबार केल्याचे स्पष्ट झालेय. मृतांच्या शवविच्छेदन अहवालातील माहितीवरून चार जणांच्या पाठीमध्ये पोलिसांनी गोळीबार केलाची माहिती पुढे आलीये.गेल्या जानेवारीमध्ये शुल्लक कारणावरून धुळ्यामध्ये दंगल भडकली. त्यामध्ये सहा जणांना प्राण गमवावे लागले. पोलिसांनी दंगल नियंत्रित करण्यासाठी केलेला गोळीबार वादग्रस्त ठरला. स्वसंरक्षणार्थ आम्ही दंगलखोरांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला. मात्र, पोलिसांनी ठराविक लोकांना लक्ष्य करून त्यांच्यावर गोळीबार केल्याचा आरोप मुस्लिम समाजाने केला. या घटनेतील सहा पैकी पाच जणांचा शवविच्छेदन अहवाल 'इंडियन एक्स्प्रेस'ला मिळाला असून, त्यामध्ये चार जणांच्या मृतदेहांवर पाठीवर गोळीबार झाल्याचे म्हटले आहे. या चारही मृतदेहांच्या पाठीवर गोळीच्या जखमा आढळल्या आहेत.इम्रान अली कमार अली, असिफ इक्बाल नईम अन्सारी, शेख असीम शेख नासीर आणि सईद पटेल रईस पटेल यांच्या पाठीवर गोळीबार झाल्याचे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. धुळ्यातील सरकारी रुग्णालयात या सहाही मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले.