खंबाटकी बोगद्याच्या भूसंपादनाच्या प्रक्रियेत शेतकऱ्यांना योग्य दर  देण्याची सूचना संबंधिताना देऊ, अशी ग्वाही केंद्रीय सार्वजनिक वाहतूक मंत्री  नितीन गडकरी यांनी दिली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक —४  वरील खंबाटकी बोगद्याच्या कामासाठी वाई तालुक्यातील वेळे व खंडाळा तालुक्यातील वाण्याची वाडी, पारगाव व खंडाळा या चार गावांमधील शेतकऱ्यांच्या भूसंपादनाची प्रRिया सुरू झाली आहे. मात्र, शेतकऱ्यांना अपेक्षित असलेली नुकसान भरपाई दिली जात नसल्याबाबत चारही  गावांतील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार मकरंद पाटील यांनी नितीन गडकरी यांची भेट घेवून त्यांना  निवेदन सादर केले.

आ. मकरंद पाटील म्हणाले, अनेक प्रकल्पांमध्ये जमिनी घेतल्यामुळे शेतकरी भूमिहीन होत आहेत. संपादन जमिनीचे मूल्य ठरवताना रेडिरेकनरची किंमत न धरता संपादित जमिनी या जुन्या राष्ट्रीय महामार्गाला लागून असल्यामुळे बिगरशेतीचा दर मूलभूत  मानून  त्याच्या चौपट रकमेने नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे. वेळे येथील ५०० एकर जमिनीवर एमआयडीसीचे शिक्के असल्याने मागील तीन वर्षांत वेळे गावात कोणताही व्यवहार झाला नाही. त्यामुळे पाच किमी.च्या आतील खरेदी—विक्रीचा  व्यवहार गृहीत धरण्यात यावा. वाण्याची वाडी या गावाने प्रत्येक सरकारी प्रकल्पासाठी योगदान दिले आहे. धोम बलकवडी कालव्यानंतर आता बोगद्यसाठीही गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित होत आहेत. नव्या बोगद्यामुळे राष्ट्रीय महामार्ग गावाच्या वेशीवरून जात आहे. मात्र, महामार्गावर जाण्यासाठी खंडाळ्यातून वळसा मारून जावे लागते. त्यासाठी वाण्याची वाडी या गावाला राष्ट्रीय महामार्ग जोडणारा अधिकृत पोहोचरस्ता तयार करून मिळावा. जमिनीचे संपादन करताना झालेल्या चुका तातडीने दुरूस्त कराव्यात. पारगाव येथे सातत्याने अपघात होत असल्याने तेथे उड्डाण पूल व्हावा, अशा मागण्या आ. मकरंद पाटील यांनी केल्या.

मागण्यांचे निवेदन स्वीकारल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले, की राष्ट्रहिताच्या प्रकल्पांमध्ये शेतकरी देत असलेले योगदान नाकारता येणार नाही. शेतकऱ्यांना वाढीव दर मिळावा यासाठी सूचना करू. कोणत्याही परिस्थितीत शेतकऱ्यां वर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. दिल्लीला गेल्यानंतर या निवेदनासंदर्भात अधिकाऱ्यांशी सविस्तर बोलू, अशी ग्वाहीही गडकरी यांनी दिली.