राजापूर : दर तीन वर्षांनी प्रकट होण्याचा शेकडो वर्षांचा शिरस्ता मोडत राजापूरची गंगा गेल्या काही वर्षांपासून अनियमितपणे अवतरत आहे. पाच महिन्यांच्या विरामानंतर गुरुवारी गंगेचे पुनरागमन झाल्याने कोकणातील भाविकांची गंगा दर्शनासाठी झुंबड उडाली या स्थानाबद्दल भाविकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे, मात्र या दशकामध्ये काही महिन्यांतच गंगेचे पुन्हा प्रकट होण्याचे प्रमाण वाढल्याने या जागेबाबतचे गूढ, चमत्काराच्या पातळीवरील आकर्षण काहीसे ओसरत चालले आहे. राजापूरपासून सुमारे २ किलोमीटर अंतरावर असलेल्या उन्हाळे येथे गंगा गुरुवारी सकाळी ७ वाजण्याच्या दरम्यान अवतरली. त्यानंतर आसपासच्या सर्व गावांतून भाविकांनी गंगाक्षेत्रावर धाव घेतली. गुरुवार असल्याने अनेकांनी स्नानाची पर्वणी साधली. दर तीन वर्षांनी प्रकट होणारी गंगा त्यानंतर काही काळ वास्तव्याला असायची आणि नंतर ती अंतर्धान पावत असे. मात्र गेल्या काही वर्षांत गंगेच्या आगमन तसेच गमन या कालखंडाला बदल झाला आहे. या कालावधीत तिच्या वास्तव्याचा कालावधी वाढला होता. शिवाय तिचे सलग आगमन झाल्याचेही पाहावयास मिळाले होते. गंगेच्या पूजेसाठी दररोज जाणारे राहुल काळे हे पुजारी गुरुवारी तेथे गेले असता गंगा आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. झाले काय? गंगेच्या १५ नोव्हेंबर २०१८ रोजी झालेल्या गमनानंतर सुमारे एकशेसाठ दिवसांनी ती पुन्हा अवतरली असून गंगेच्या आगमन आणि निर्गमन या कालखंडाला छेद गेला आहे. गुरुवारी दिवसभरात गंगाक्षेत्रावरील सर्व कुंडे पाण्याने तुडुंब भरली आहेत. गेल्या वेळी ७ जुलै २०१८ ला गंगेचे आगमन झाले होते. तेव्हा जवळपास शंभराहून अधिक दिवस तिचे वास्तव होते. थोडा इतिहास.. राजापूर शहराच्या पुरातन काळाची ओळख सांगणाऱ्या ठळक बाबींमध्ये गंगेचा उल्लेख कायम केला जातो. दर तीन वर्षांनी अवतीर्ण होणारी गंगा इतिहास काळापासून प्रचलित आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती, काशीचे सुप्रसिद्ध गागाभट्ट, कवी मोरोपंत इत्यादींनी या गंगाक्षेत्राला भेट दिल्याची माहिती मिळते. ब्रिटिश राजवटीत १८८३ पासून गंगेच्या अवतरण्याबाबतच्या नोंदी आहेत.