पोलिसांकडे तक्रार करूनसुद्धा उपाययोजना नाही; व्यावसायिक चिंताग्रस्त

नीरज राऊत, लोकसत्ता

पालघर : सफाळे गावातील पश्चिमेला असणाऱ्या सुमारे साडेचार ते पाच हजार एकर क्षेत्रात पसरलेल्या साडेतीनशे कोळंबी प्रकल्पांमध्ये दिवसाढवळ्या लूटमार सुरू आहे. याबाबत अनेक वेळा पोलिसांकडे तक्रारी करूनसुद्धा उपाययोजना केली जात नसल्यामुळे कोळंबीचा व्यवसाय करणारे व्यावसायिक हतबल झाले आहेत.  त्यांना व्यवसाय करणे आव्हानात्मक ठरत आहे.

सफाळ्याच्या पश्चिम भागात दातिवरे ते जलसार दरम्यान असलेल्या वेढी, टेम्भिखोडावे, डोंगर, खार्डी, विळंगी त्याचप्रमाणे केळवे-माहीम परिसरात तीनशे ते साडेतीनशे लहान-मोठे कोळंबी प्रकल्प खाडी व समुद्रकिनाऱ्यालगत खाजण व दुर्गम भागात आहेत. अशा प्रकल्पांमधून रात्रीच्या वेळी चोरी होत असते.  प्रकल्पावर असलेल्या सुरक्षारक्षकांची नजर चुकवून एखाद्या कोळंबी तळ्यातील कोपऱ्यात खाद्यपदार्थ टाकून कोळंबींना एकत्रित कोपऱ्यात आणले जाते. नंतर लहान जाळ्याच्या माध्यमातून कोळंबी वेचल्या जातात, अशी प्रकल्प मालकांच्या तक्रारी आहेत.  १० ते १५ जणांच्या टोळीमध्ये येणारी ही स्थानिक मंडळी काही प्रसंगी शस्त्रदेखील सोबत आणतात. प्रतिकार केल्यास हल्लाही करीत असल्याचे  मालकांनी ‘लोकसत्ता’ ला सांगितले.

चोरीसाठी वापरण्यात येणारी अस्वच्छ जाळी तसेच भात, शेण, मासळीचे तेल अशा वस्तूंचा वापर होत असल्यामुळे प्रकल्पातील कोळंबी आजार होण्याची शक्यता बळावते, अशी भीती मालकांनी व्यक्त केली आहे.  अधिकतर कोळंबी प्रकल्पाने आपले उत्पादन (हार्वेस्टिंग) एप्रिल ते जून महिन्याच्या दरम्यान घेतले आहे.  टाळेबंदीत मनुष्यबळ नसल्याने उत्पादन व विक्री ठप्प झाल्याने त्याचा गैरफायदा घेतला जात आहे. याप्रकरणी मालकांनी महाराष्ट्र एक्वाकल्चर फार्मर्स असोसिएशनच्या माध्यमातून स्थानिक पोलीस ठाण्यापासून थेट उपमुख्यमंत्र्यांपर्यंत तक्रार केली आहे. मात्र, त्याबाबत काहीच कारवाई झाली नसल्याचे मालकांचे म्हणणे आहे.

गेल्या आठवडय़ात झालेल्या अशाच एका प्रकारात उत्पादन (हार्वेस्टिंग) करायला आलेल्या एका तळ्यामधील ३०० किलोपेक्षा अधिक कोळंबी शेकडोंच्या संख्येने ग्रामस्थाने पोलिसांच्या समक्ष चोरी करण्याचा प्रकार समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याने तो चर्चेचा विषय ठरला आहे.

ग्रामस्थ चोरलेल्या कोळंबी  खाण्यासाठी वापरतात. त्याचप्रमाणे सफाळे, विरार-वसई व भाईंदर येथील मासळी बाजारमध्ये ती विक्रीसाठी नेली जाते, अशी माहिती पुढे आली आहे. या लूटमारीत मोठय़ा संख्येने महिला असल्याने त्याच्या ताफ्यासमोर मालक व व्यवस्थापन कर्मचारी हतबल असल्याचे दिसून आले आहे.

पोलिसांची हतबलता

केळवा सागरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी राजू नरवडे यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता सागरी पोलीस ठाण्याची व्याप्ती व मनुष्यबळाची मर्यादा असल्याने अशा प्रकारांवर अंकुश ठेवणे कठीण होते. मोठय़ा आणि मध्यम प्रकल्पधारकांनी प्रकल्पाच्या ठिकाणी आवश्यक रोषणाई व सुरक्षा व्यवस्था ठेवणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले, या प्रकल्पांमधून अधिकतर चोऱ्या खाडीमार्गातून होत असल्याचेदेखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.

कोळंबी ६०० रुपये किलो

१५-२० ग्रॅम वजनाची कोळंबी सध्या ३५० रुपये प्रतिकिलो तर ५० ग्रॅम वजनाची कोळंबी ५५०-६०० रुपये किलो दराने सध्या मुंबईमध्ये विकली जात आहे. या भागातील अधिकतर उत्पादन निर्यात होत असून त्यापोटी देशाला हजारो कोटी रुपयांचे परकीय चलन मिळत असते.